छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात रझाकारांबरोबर मराठवाड्यातील अनेकांना शस्त्र हातात घ्यावी लागली. यात महिलांचाही समावेश होता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हत्यार पुरवण्याचे काम महिला करत असत. अगदी पोलीस चौकी जाळण्यापर्यंतचेही शौर्य मराठवाड्यातील महिलांनी दाखवले आहे.

रझाकारांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या रणरागिणी तथा मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई असा गौरव ज्यांचा केला जायचा त्या दगडाबाई देवराव शेळके यांचे स्मारक मात्र, आश्वासन देऊनही कागदावरच राहिले.  बदनापूर तालुक्यातील (जि. जालना) धोपटेश्वर येथे हे स्मारक उभारण्याची घोषणा २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. परंतु दोन वर्षांमध्ये ना निधी मिळाला ना स्मारकाची जागा ठरली.

जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कोलते टाकळी येथे जन्मलेल्या दगडाबाईंचा विवाह धोपटेश्वर येथील देवराव शेळकेंसोबत वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षाच झाला होता. परंतु त्या काही त्याकाळी शाळेत जात नव्हत्या. पण स्वभाव धाडसी. मुलांप्रमाणेच त्या निडरपणे वागत. झाडावर चढणं, झाडावरून उड्या मारणे, असे त्या करायच्या. खरं तर तेव्हा मुलींना घराबाहेर पडण्यास परवानगी नव्हती. परंतु दगडाबाई त्याला अपवाद होत्या.

शेतीतही त्या काम करायच्या. त्यांच्या गावामध्ये हरिभाऊ नावाचे गृहस्थ होते. ते मुलामुलींना हैदराबाद मुक्तिसंग्रामातील युद्धाच्या कथा ऐकवायचे. त्या कथांचा दगडाबाईंवर खोलवर परिणाम झाला. त्यांना कथा एेकताना लढण्याचे स्फुरण चढायचे. आपणही लढायला बाहेर पडले पाहिजे, असा विचार दगडाबाईंच्या मनी रुजला. परंतु पुढे त्यांचे लग्न झाले.

बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील देवराव शेळके यांच्यासोबत दगडाबाईंचा विवाह झाला. परंतु पुढे पतीने दुसरे लग्न केले. मात्र, दगडाबाई काही त्यांच्या पतीच्या दुसऱ्या लग्नावरून नाराज झाल्या नाहीत. उलट ‘त्यांना संसार करण्यासाठी नवऱ्याने दुसरं लग्न केलं आणि मी देश सेवेचे काम करायला आता मोकळी झाले’ असे बाणेदार उत्तर आणि ठणकावून सांगत दगडाबाईंनी स्वत:ला मुक्तिसंग्रामाच्या लढाईत पूर्णपणे झोकून दिले होते.

दगडाबाई या पिस्तुलासह अनेक शस्त्रे चालवायच्या, हातबाॅम्ब फेकायच्या, रेल्वे रुळ उखडून टाकलेला आहे. पोलीस चौकी जाळण्यापर्यंतचेही धाडसी काम करून त्यांनी मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात शौर्य दाखवले होते. हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलिन झाल्यानंतर दगडाबाईंनी पुढे राजकीय मैदानही गाजवले होते. पंचायत समिती सदस्या, जिल्हा परिषद सदस्या म्हणूनही त्यांनी सामाजिक कार्याचा ठसा उमटवला होता.

२०१३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिंची प्रेरणा घेण्यासाठी दगडाबाईंचे स्मारक करण्याचा निर्णय १६ सप्टेंबर २०२३ रोजीच्या छत्रपती संभाजीनगरमधील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी पाच कोटींची घोषणा केली होती. परंतु दोन वर्षांमध्ये स्मारकाच्या कामाच्या संदर्भात कुठलीही हालचाल झालेली नाही. प्रशासकीय स्तरावरून निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

धोपटेश्वर येथे आई दगडाबाई शेळके यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. परंतु अद्याप त्यावर काही कार्यवाही झाल्याचे ऐकण्यात आले नाही. स्मारकाबाबत बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्याशी भेट झाली तर चर्चा होते. स्मारक उभं करायचं आहे, एवढे ते आठवणीने सांगतात. – मनोहर शेळके, दगडाबाईंचे चिरंजीव.