केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्यात श्रेयवादाची लढाई रंगली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलणार की फक्त औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजी नगर होणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दावने यांच्या या प्रश्नानंतरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार तथा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी औरंगाबाद शहराच्या नामांतराला याआधीही विरोध केला होता. भविष्यातही आम्ही याला विरोधच करणार, असे जलिल म्हणाले. ते आज ( २५ फेब्रुवारी) ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा >>> “यापुढे तालुका ‘छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद’ असं लिहावं लागेल का?”, फडणवीसांचं दानवेंना प्रत्युत्तर, म्हणाले…

आम्ही भविष्यातही विरोध करत राहणार

“नामांतराला आमचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. आमचा विरोध फक्त नामांतराला आहे. आमचा छत्रपती संभाजी महाराज यांना विरोध नाही. भविष्यताही त्यांच्या नावाला विरोध करणार नाही. आम्ही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचाच आदर करतो. मात्र या महापुरुषांचे नाव घेऊन आम्ही कधीही राजकारण केलेले नाही. ते राजकीय स्वार्थासासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करत आलेले आहेत. आम्ही नावाचा विरोध केला, भविष्यातही विरोध करत राहणार. कारण सरकारकडे लोकांना दाखवण्यासाठी काहीही नाही. त्यामुळे अशा प्रकारचे मुद्दे ते पुढे आणतात. लोकांना भावनिक मुद्द्यांमध्ये कसे अडकवायचे, हे त्याचेच एक उदाहरण आहे,” अशी भूमिका जलील यांनी मांडली.

हेही वाचा >>> ‘‘मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाची नशा चढली, ते व त्यांचे ४० लोक…’’ ठाकरे गटाचे टीकास्र!

जिल्ह्याचे नाव अजूनही औरंगाबदच

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारने फक्त औरंगाबाद शहराचेच नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आहे की, संपूर्ण जिल्ह्याचेच नाव बदलणार आहे? प्रश्न उपस्थित केला होता. यावरही जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अंबादास दानवे काय बोलले, यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. मात्र अंबादास दानवे यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. त्यांनी शहराचे नाव बदलले आहे. मात्र जिल्ह्याचे नाव अजूनही औरंगाबदच आहे. ते बदलता येत नाही. म्हणूनच आमची कही खुशी कही गम अशी स्थिती आहे,” अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिली.

हेही वाचा >>> “नामांतर झालं याचा आनंद आहे, मात्र भाजपाने याचा असुरी आनंद घेऊ नये हे श्रेय…” अमोल मिटकरीचं विधान!

संविधानाने मला अधिकार दिला आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यांच्याकडे बहुमत आहे. सरकार त्यांचे आहे. उद्या ते कोणाचेही नाव बदलू शकतात. कारण त्यांच्याकडे सध्या ती ताकद आहे. मात्र संविधानाने मला अधिकार दिलेला आहे. सरकारने घेतलेला निर्णय मला पटत नसेल, तर त्याला मी विरोध करू शकतो. माझा तो अधिकार आहे. आणि मी विरोध करणार आहे,” असेही जलील यांनी सांगितले.