औरंगाबाद : पैठणच्या नाथसागरातील पाण्याचा साठा यंदा ४ ऑगस्ट रोजी ४०.२८ टक्के होता. गतवर्षी याच दिवशीपर्यंत ५३.७८ टक्के पाणीसाठा होता. या वर्षी सर्वत्र जून-जुलै महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला असला तरी जिल्ह्य़ातील पैठणच्या नाथसागराच्या पाणीपातळीत गतवर्षीच्या तुलनेत १३ टक्क्य़ांनी घट असल्याचे दिसत आहे. गतवर्षी नाशिक परिसरात जोरदार पाऊस झालेला होता. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत नाथसागरात ८५ टक्क्य़ांवर पाणीसाठा झालेला होता. १५ ऑगस्टच्या दरम्यान, नाथसागराचे काही दरवाजेही उघडण्यात आलेले होते. गतवर्षी ४ ऑगस्टपर्यंत मराठवाडय़ातील बहुतांश प्रकल्पांमध्ये ५० टक्क्य़ांपर्यंतचा जलसाठा झालेला होता. यंदा मात्र, जून-जुलै महिन्यातील सरासरीपेक्षा पाऊस झालेला असला तरी प्रकल्पांमधील जलसाठय़ात फारशी वाढ झालेली दिसत नाही. औरंगाबाद जिल्ह्य़ात जून-जुलै महिन्यामध्ये सर्वसाधारण २७७.४ मिमी पावसाची सरासरी आहे. मात्र, पाऊस ३३३.१ मिमी एवढा पडूनही नाथसागरात ४ ऑगस्ट रोजी ४०.२८ टक्केच पाणीसाठा होता. याच दिवसापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा १३ टक्क्य़ांनी कमी आहे. ४ ऑगस्ट रोजी नाथसागरात १५०८.९२ फुटापर्यंत पाणीपातळीची नोंद होती. तर प्रकल्पात एकूण १६१२.७०७ दलघमी पाणीसाठा असून त्यात जिवंत पाणीसाठय़ाचे प्रमाण ८७४.६०१ दलघमी एवढे होते. गतवर्षी ४ ऑगस्ट रोजी ११६७.५५ दलघमी पाणीसाठा नाथसागरात होता.