नियती ही क्रूर असते असं म्हणतात, मात्र ती संजू सॅमसन इतकी क्रूर कधीच असू नये. उगाच नमनाला घडाभर तेल कशाला…थेट विषयालाच सुरुवात करुया. तर महेंद्रसिंह धोनीच्या तथाकथित सक्तीच्या विश्रांतीमध्ये ऋषभ पंतकडे भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी आली. २०१९ विश्वचषकाच्या वर्षभरआधी धोनीची फलंदाजी संथ झाली होती, त्यामुळे धोनीने आता निवृत्ती घ्यावी अशी चर्चा सुरु झाली होती. त्यातच विश्वचषकात उपांत्य फेरीतला पराभव, या चर्चेवर काहीतरी ठोस पाऊल उचलण्यासाठी कारणीभूत ठरला. एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने यापुढे पंत हा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल असं सांगत, धोनीचा यापुढे विचार केला जाणार नाही असं अप्रत्यक्षपणे जाहीर केलं.

भारतीय क्रिकेट चाहते हे जरा वेगळेच असतात. त्यांना पी हळद हो गोरी, प्रमाणे पहिल्याच फटक्यात १०० टक्के निकाल हवा असतो. ऋषभ पंतच्या बाबतीतही नेमकं हेच झालं. २०१९ साली भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यापासून ऋषभ पंतला संघात सातत्याने संधी मिळत आलेली आहे (काही ठराविक सामने वगळता)…आणि ऋषभही सातत्याने आपल्याला मिळालेली संधी वाया घालवत आलेला आहे (काही ठराविक सामने वगळता). पंतचं हे सततचं अपयश भारतीय चाहत्यांना रुचलं नाही आणि त्यांना परत एकदा धोनीची आठवण झाली. मग सोशल मीडियावर पुन्हा एकदा, धोनीला संघात घ्या…अशी मागणी सुरु झाली.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी

सुदैवाने निवड समितीने जनमताच्या दबावाला बळी न पडता धोनीला संधी न देता केरळचा युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला संधी दिली. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये निवड समिती आणि बीसीसीआय ऋषभ पंतचा जटील प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्यामुळे सातत्याने अपयशी होऊनही, ऋषभ पंत हा केवळ धोनी आणि रवी शास्त्री यांच्या गोटातला असल्यामुळे त्याला संधी मिळतेय का?? असा प्रश्न विचारला जात असेल….तर तो रास्तच आहे.

निवड समितीची पहिली चूक –

धोनीने गेली अनेक वर्ष भारतीय संघाची कमान यशस्वीपणे सांभाळली. आताच्या घडीलाही त्याच्या तोडीचा यष्टीरक्षक तुम्हाला सापडणार नाही. मात्र धोनी हा देखील एक माणूस आहे आणि प्रत्येक माणूस हा कधीतरी थकतो हे बीसीसीआय आणि धोनीच्या चाहत्यांना कधी लक्षात आलंच नाही. २०१७ साली झालेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत पहिल्यांदा धोनीच्या संथ फलंदाजीची हळु आवाजात का होईना पण चर्चा सुरु झाली. अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झाला.

या दौऱ्यात ऋषभ पंतची संघात निवड झाली होती, मात्र एकाही सामन्यात पंतला संधी मिळाली नाही. खरंतर बीसीसीआयकडे, विंडीजविरुद्ध मालिकेत पंतला संधी देऊन त्याचा खेळ तपासण्याची संधी होती….मात्र पाच सामन्यांच्या मालिकेत केवळ पंतला बाकावर बसवून ठेवण्यात संघ व्यवस्थापनाने धन्यता मानली. याच मालिकेतील एका वन-डे सामन्यात धोनीच्या संथ खेळीमुळे भारताला सामना गमवावा लागला होता, त्यानंतर धोनीचा रडवेला चेहरा सर्वांनी पाहिला होता. त्यामुळे साहजिकच २०१७-२०१९ या काळात पुरेशा संधी न मिळाल्यामुळे पंतमध्ये त्या तोडीचा आत्मविश्वास तयार झाला नाही. त्यातच प्रत्येकवेळी मैदानात उतरताना चाहत्यांकडून असणारं अपेक्षांचं ओझं हे वारंवार तो अपयशी होण्यास कारणीभूत ठरतंय.

त्याच चुकीची पुनरावृत्ती –

ज्यावेळी तुम्ही ठरवता की धोनी आता हा भविष्याच्या दृष्टीने तुमची पहिली पसंती नसणार आहे, त्यावेळी एका खेळाडूला योग्यवेळी पर्याय निर्माण करणं आणि त्याला संधी देणं हे निवड समितीचं काम असतं. ऋषभ पंतचं फलंदाजीतलं सततच अपयश आणि यष्टींमागची सुमार कामगिरी यामुळे त्याचं संघातलं स्थान धोक्यात आलं. आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता, यष्टीरक्षक आणि मधल्या फळीतला फलंदाज मजबूत असणं गरजेचं असतं.

मग ज्यावेळी पंत हा अपेक्षेप्रमाणे खेळ करत नाहीये, त्यावेळी त्याच्या तोडीचा दुसरा पर्याय असलेला सॅमसनला एका मालिकेत संधी का मिळत नाही. आपल्या सर्वांना माहिती असेल, की संजू सॅमसनची गेल्या हंगामातली स्थानिक क्रिकेटमधली कामगिरी ही उल्लेखनीय होती. मग पंतला एका मालिकेत विश्रांती देऊन सॅमसनचा पर्याय तपासण्याची सुवर्णसंधी निवड समितीकडे होती, जी वाया गेली आहे.

२०१५ साली संजू सॅमसन आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला, यानंतर तब्बल ५ वर्षांनी श्रीलंकेविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात त्याला संधी मिळाली. मात्र या सामन्यात फलंदाजीत तो अपयशी ठरला आणि आगामी न्यूझीलंडविरुद्ध दौऱ्यात त्याला संघातून वगळण्यात आलं. मग जी निवड समिती एका सामन्यातील अपयशाच्या जोरावर सॅमसनला वगळू शकते ती समिती पंतची सततची अपयशी कामगिरी कशी काय नजरेआड करु शकते??

आता पुढे काय??

पंतला विश्रांती द्या, अशी जेव्हा मागणी होत असते तेव्हा त्याला कायमची विश्रांती द्या असं कोणालाच अपेक्षित नाहीये. धोनीच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरताना अपेक्षांचं ओझं…फलंदाजीतले बेजबाबदार फटके, यष्टीरक्षणातलं सदोष तंत्र या सर्व गोष्टी पाहिल्या की लक्षात येतं की पंतला अजुन बऱ्याच तयारीची गरज आहे. अशावेळी विराट-रवी शास्त्री किंवा निवड समितीतील सदस्याने तू काही काळ विश्रांती घे…स्थानिक क्रिकेट खेळून पुनरागमन कर असं का सांगत नसतील?? का कितीही खराब कामगिरी झाली तरी पंत संघात कायम रहावा अशी कोहली आणि शास्त्री जोडगोळीची इच्छा आहे.

निवड समितीचा हा धोरणलकवा संघाला विश्वचषकात घातक ठरु शकतो. वारंवार अपयशी होऊनही पंतचा खेळ सुधारला नाही…तर मग निवड समिती पुन्हा एकदा दबावाखाली येऊन काही अनेपक्षित निर्णयही घेऊ शकेल. त्याऐवजी पंतला संघाबाहेर करत सॅमसनला एका मालिकेत संपूर्ण संधी देत त्याचा खेळ तपासण्याची संधी निवड समितीला होती. मात्र केवळ एका सामन्यात संधी देऊन सॅमसनला संघाबाहेर करणं हे क्रूर आहे. त्याचसोबत पर्याय असतानाही दुसरा पर्याय न वापरणं हे निवड समितीचं पाऊलही अनाकलनिय आहे. म्हणूनच…पंत, कोहलीचा आवडता आहे का?? दिल्लीकर असल्यामुळे पंतला संधी मिळतेय का?? सोशल मीडियावर सुरु असलेल्या अशा एक ना अनेक शंका खऱ्या मानण्यास पूर्णपणे वाव आहे. यामधून संघ वेळेत सावरला तर चांगलच, नाहीतर….

  • prathmesh.dixit@indianexpress.com