सध्या बरेच मराठी कलाकार राजकारण, इतिहास, स्वातंत्र्यलढा याविषयी उघडपणे बोलताना आणि बाजू मांडताना दिसतात. एकाअर्थी ही गोष्ट चांगलीच आहे, पण त्यापैकी फार कमी कलाकार या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करतात. बरेच कलाकार हे अत्यंत उथळपणे यावर भाष्य करताना आपल्याला आढळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरंतर यामध्ये नावं घ्यायची झाली तर बऱ्याच कलाकारांची नावं घेऊ शकतो. पण सध्या मराठी चित्रपटसृष्टीतली एक आघाडीची अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता माळी यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. त्यामुळे मी फक्त त्या पोस्टबद्दल मत व्यक्त करतो. प्राजक्ता या त्यांच्या कामानिमित्त लंडनला गेल्या आणि तिथल्या एकूण कारभारावर आणि त्यांच्या संस्कृतीवर त्यांनी यथेच्छ तोंडसुख घेतलं आहे, निदान असं त्यांच्या फेसबुक पोस्टवरुन तरी मला जाणवलं.

या पोस्टमधून प्राजक्ता माळी यांनी लंडन हे शहर किती आणि का वाईट आहे याचं कारणासह स्पष्टीकरण दिलं आहे, त्यांच्या या पोस्टखालील लोकांच्या कमेंट बघता बहुतांश लोकांना ती पोस्ट अजिबात पटलेली नाही असंच दिसत आहे. बरं ही पोस्ट करताना त्यांनी शेअर केलेले फोटोज, त्यातले त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्यांच्या या पोस्टमधला प्रत्येक शब्द याचा दुरान्वये संबंध लागत नाही ही गोष्ट वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकते, पण असो आपण त्याकडे त्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर ‘कलात्मक’ अंगाने बघून सोडून देऊया. पण या पोस्टमध्ये प्राजक्ता यांनी लंडन या शहराला नावं ठेवायची एकही संधी सोडली नाहीये. मला लंडन या शहराबद्दल मनात कसलाच सॉफ्टकॉर्नर नाहीये पण प्राजक्ता यांची ही पोस्ट अगदी उत्तमरित्या भाषांतर करून जर त्यांच्या एम्बसी मध्ये त्याचं जाहीर वाचन केलं तर त्यांना पुढच्या वेळी कामासाठी व्हिजादेखील मिळायची समस्या उद्भवू शकते असा माझा अंदाज आहे.

एक भारतीय म्हणून आपल्या संस्कृतीबद्दल प्रत्येकानेच अभिमान बाळगायला हवा पण तो इतरांसमोर मांडताना आपण कोणा इतर देशाच्या नागरिकांच्या संस्कृतीला त्यांच्या विचारधारेला ठेच पोहोचवत नाही आहोत याची काळजी सेलिब्रिटीच नव्हे तर प्रत्येक सामान्य माणसाने घ्यायला हवी. उगा उचलली जीभ हा प्रकार कुणीच करू नये असं माझं प्रांजळ मत आहे. बरं आपण एखाद्या देशावर, त्यांच्या भूमिकांवर टीका करत असतो किमान ती टीका एकसुरी होऊ नये याची काळजीदेखील टीकाकाराने नक्कीच घ्यायला हवी.

या पोस्टमध्ये प्राजक्ता यांनी लंडनच्या क्षेत्रफळ आणि लोकसंख्येचा मुद्दा काढला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ही त्यांची प्रमुख समस्या नसल्याने तिथे अधिकाधिक उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देता येतात आणि त्यामुळेच त्यांची प्रगती झाली आहे. माझंदेखील काही वर्षांपूर्वी या प्रगत राष्ट्रांबद्दल हेच मत होतं, की तिथे लोकसंख्या कमी असल्याने एवढी डेवलपमेंट सहज शक्य आहे. पण जसजसा मी आणखीन यावर अभ्यास केला तेव्हा माझ्या विचारातला फोलपणा मलाच जाणवू लागला. माझ्यामते एखाद्या चर्चेदरम्यान आपल्याकडे कोणताच पर्याय उरत नाही तेव्हा आपण भारतीय लोकसंख्येचं व्हिक्टिम कार्ड पुढे करतो. इतर प्रगत देशांच्या बाजूने विचार केला तरी त्यांच्यासाठीसुद्धा वाढती लोकसंख्या ही एक समस्याच आहे, कदाचित आपल्याएवढी मोठी नसेल पण त्यांच्यापुरती ती समस्या आहेच. शिवाय ड्रग अॅडिक्शनसारख्या तिथल्या तरुणाईला पोखरून काढणाऱ्या अनेक गंभीर समस्या त्या देशांमध्येही आहेत. म्हणून त्यांच्या प्रगतीमध्ये कुठे अडथळा आला का? त्यामुळे देशाची प्रगती, उन्नती ही केवळ देश चालवणाऱ्या यंत्रणेची जबाबदारी नसून तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांचीही आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवणं सोप्पं आहे पण उरलेल्या ४ बोटं आपल्याकडे आहेत याचा आपण भारतीय कधी फारसा विचार करत नाही हे दुर्दैव आहे.

आणखी वाचा : “आपल्या मुलांना इंग्रजी…” मातृभाषेविषयी बोलताना मनोज बाजपेयींनी व्यक्त केली खंत

बरं हे माझं मत मांडून मला लंडनचं सरकार नागरिकत्व देणार नाहीये. पण एकंदरच सामान्य लोकांच्या आणि याबरोबरीने कलाकारांच्याही राष्ट्रवादाबद्दलच्या संकल्पना फारच बोथट आणि संकुचित झाल्या आहेत असं मला प्राजक्ता माळी यांची ही पोस्ट वाचताना वाटलं. बरं या पोस्टची सुरुवात त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अजरामर ‘ने मजसी ने’ या काव्यापासून केली आहे. पण एवढ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला सावरकरांच्या एका वाक्याची आठवण कशी झाली नाही याचं मला आश्चर्य वाटतं. सावरकर ब्रिटीशांना म्हणायचे की “तुम्ही आमचे मूलभूत हक्क पायदळी तुडवून आमच्यावर जबरदस्ती राज्यं करताय म्हणून तुम्ही आमचे शत्रू आहात. ज्यादिवशी तुम्ही आम्हाला आमचं स्वातंत्र्य परत द्याल त्यादिवशी हे शत्रुत्वही संपेल.” सावरकरांसारख्या प्रखर राष्ट्रभक्तानेही जर ब्रिटिशांशी शत्रुत्व संपवू असं जाहीररित्या सांगितलं होतं तर तिथे आपल्याच देशातल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने कोहिनूर हिरा आणि काही क्षुल्लक गोष्टीवरुन एखाद्या देशाबद्दल असं वक्तव्य करणं हे माझ्यामते तरी बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. कुठे अवकाशात जाऊन देशांचं नाव मोठं करणारे आणि ‘सारे जहाँसे अच्छा’ असं सांगणारे राकेश शर्मा यांच्यासारखे थोर वैज्ञानिक आणि कुठे बेगडी राष्ट्रवाद उराशी बाळगून इतर राष्ट्रांबद्दल आणि त्यांच्या संस्कृतीबद्दल आकस बाळगणारे हे सो कॉल्ड सेलिब्रिटीज!

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why marathi actress have so much hatred about london and its culture and history avn
First published on: 30-09-2022 at 14:58 IST