मुख्यमंत्र्यांचा घणाघात; भाजपची ‘औकात’ दाखविण्याचा निर्धार दुर्योधनाच्या बाजूने अनेक शकूनी मामा आहेत, भाजपाची औकात काय ते लवकरच शिवसेनेला २१ फेब्रुवारीला दाखवून देऊ, आता हे धर्मयूद्ध होऊनच जाऊ द्या! अशा काहीशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर घणाघात घातला. शिवसेना उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याची घोषणा केल्यानंतर मुंबईतील गोरेगांवमधील विजय संकल्प मेळाव्यात झालेल्या भाजपाच्या पहिल्याच सभेत देवेंद्र फडणवीस भाषण करत होते. सभेत भाषणादरम्यान त्यांनी शिवसेनेवर जोरदार टिका केली. शिवसेनेशी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर युती केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी हिंदूत्वाच्या आणि शिवाजी महाराजांच्या एका विचाराने युती केली होती. शिवसेना आणि आम्ही विचाराने एकत्र असलो तरी त्यांचा आचार आम्हाला मान्य नाही. शिवसेना आमचा वैचारिक शत्रू नाही, पण आचार व भ्रष्टाचाराविरोधात लढाई होईल. पारदर्शी कारभार हाच आमचा अजेंडा असून कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन होणारच, जे बरोबर येतील, त्यांना घेऊन किंवा येणार नाहीत, त्यांच्याशिवाय ते घडवू आणि धर्मयुध्दात भ्रष्टाचारी कारभार संपवू. शेवटी अंतिम विजय सत्याचाच व पारदर्शी कारभाराचाच होईल, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लगावला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा दोन वेळा उल्लेख केला असला तरी त्यांचा सारा रोख हा शिवसेनेवरच होता. पालिकेचा कारभार आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर शिवसेनेला जास्तीत जास्त बदनाम करण्यावरच मुख्यमंत्र्यांनी भर दिला होता व प्रचारात हाच मुद्दा राहील हे अधोरेखित केले. या सभेनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत. या वेळी आपण शिवसेनेवर मात करीत एक हाती सत्ता खेचून आणू अशा काहीशा आवेगात भाजप कार्यकर्ते आपल्या प्रतिक्रीया देत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रीया मुख्यमंत्रयाच्या जोशपूर्ण भाषणामुळे भाजपच्या कार्यकत्यामधील आत्मविश्वास वाढला आहे. शिवसेनेला विधानसभेत जागा वाढवून हव्या होत्या त्यामुळे त्यांनी युती तोडली. युती कशी तुटली याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्रयानी दिले. मुख्यमंत्रयानी शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिली. - अमित पालांडे, वॉर्ड महामंत्री शिवसेनेने जशास तसे उत्तर देण्याचे काम मुख्यमंत्रयानी केले. त्यांच्या भाषणामुळे आम्हा कार्यकत्यांना स्फुर्ती आली आहे.. -निलेश फाळके वॉर्ड अध्यक्ष 225 आजपर्यत मुख्यमंत्रयाची मी अनेक भाषण ऐकली, पण आजच्या भाषणात वेगळाच जोश होता. भाजपला युती तोडायची इच्छा आमची नव्हती त्यांनीच युती तोडली हे मुख्यमंत्रयानी स्पष्ट केलं. मुंबईकरांसमोर त्यांनी विकासाचा अजेंडा ठेवला आहे. मुख्यमंत्रयाच्या भाषणाने कार्यकर्ते चार्ज झाले आहे. - दिलीप पटेल नगरसेवक भाजप शिवसेनेने पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत युती तोडली आधी कोणी युती तोडली त्याचा इतिहासच मुख्यमंत्रयानी आज उलगडल्याने त्यांचे पितळ उघडं पडल. मुख्यमंत्रयानी आपल्या भाषणातून उध्दव ठाकरेंच्या उत्तराला तोडीस तोड उत्तर दिले आहे भाजपला ६० जागा देण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून ठेवण्यात आला होता त्या अपमानाचा बदला आज घेतला. -कमलाकर दळवी, मुंबई सचिव