गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नवी दिल्लीत धावत्या बसमध्ये एका युवतीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. या घटनेत संबंधित युवतीचा मृत्यू झाला. तिला श्रद्धांजली म्हणून अर्थसंकल्पात ‘निर्भया’ निधी उभारण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ठेवला आहे. त्यासाठी एक हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
महिला सशक्तीकरण आणि सुरक्षेसाठी हा निधी उभारण्यात आल्याचे चिदंबरम यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना या आपल्यासारख्या प्रगतीशील देशासाठी काळजी निर्माण करणाऱया आहेत. जास्तीत जास्त महिला शिक्षणासाठी, रोजगारासाठी घराबाहेर पडताहेत. मात्र, त्याचबरोबर महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही वाढताहेत. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय पुढील काळात योजले जातील.