जी २० बैठकीसाठी येणाऱ्या जागतिक नेत्यांच्या स्वागतासाठी दिल्ली सज्ज झाली आहे. रस्ते, चौक आणि उद्याने ते भारत मंडपम या मुख्य स्थळापर्यंत संपूर्ण देश उत्सवाच्या मूडमध्ये पाहायला मिळतो आहे. कृष्ण जन्माष्टमीसारख्या शुभ मुहूर्तावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक जागतिक नेते भारतात पोहोचू लागले आहेत. खरं तर जी २० हा ५ दिवसांचा कार्यक्रम असला तरी गेल्या एका वर्षात भारताला अध्यक्षपद मिळाल्यापासून देशाच्या अर्थव्यवस्थेतही बदल झाला आहे. भारताने जी २० चे अध्यक्षपद हे जागतिक स्तरावर आपली आर्थिक शक्ती तसेच सॉफ्ट पॉवरचे प्रदर्शन करण्याचे साधन बनवले असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. म्हणूनच देशाच्या कानाकोपऱ्यात जी २०शी संबंधित सुमारे २२० बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील ६० शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि जगातील विविध देशांमधून पाहुणे भारतात यायला लागले आहेत.

पंतप्रधान मोदींनी जगाला ‘भारत’ दाखवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २० कार्यक्रमाला भारतातील प्रत्येक राज्याशी जोडले आहे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर भारताच्या ‘विविधतेतील एकता’ या संस्कृतीची ओळख जगाला करून दिली आहे. अलीकडेच जेव्हा जी २० अंतर्गत डिजिटल अर्थव्यवस्था मंत्रीस्तरीय बैठक बंगळुरूमध्ये झाली, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘डिजिटल इकॉनॉमी’वर चर्चा करण्यासाठी बंगळुरूपेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. तिची स्वतःची सांस्कृतिक ओळख आहे, वेगळा दर्जा आहे. जगातील सर्वात जुने सांस्कृतिक केंद्र आहे. तसेच त्यांनी गांधीनगर, जयपूर ते गंगटोक आणि इटानगरच्या संस्कृतीचीही ओळख त्यांना झाली.

सांस्कृतिक समृद्धी दाखवण्यावर भर

पीटीआयला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले की, जेव्हा त्यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी जी २० संदर्भात चर्चा केली, तेव्हा त्यांनी त्यांना संबंधित प्रदेशातील सांस्कृतिक वारसा दाखविण्यास सांगितले. जी २० च्या एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुपची बैठक मध्य प्रदेशमधील इंदूर येथे पार पडली. ती पूर्णपणे ‘झिरो वेस्ट’ बैठक होती. येथे प्लास्टिकच्या बाटल्या आणण्यास मनाई करण्यात आली होती. लेखनासाठी वापरलेले पॅड पुन्हा वापरता येण्याजोग्या कागदाचे बनवण्यात आलेले होते. भारताच्या ‘स्वच्छ भारत’ उपक्रमाचे प्रदर्शन करण्याचा हा एक मार्ग होता. गेल्या ६ वर्षांपासून इंदूर देशातील सर्वात स्वच्छ शहर राहिले आहे.

हेही वाचाः Money Mantra : SBI सह ‘या’ ६ बँकांमध्ये तुम्ही डिजिटल रुपयाने UPI पेमेंट करू शकता, काय आहे प्रक्रिया?

तसेच जी २० ची जागतिक व्यापार बैठक जयपूर येथे झाली, तर गोव्यात ९ बैठका झाल्या. अशा प्रकारे मोदी सरकारने या कार्यक्रमाला देशातील विविध क्षेत्रांतील चांगल्या पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेशी जोडण्याचे काम केले. पंतप्रधानांच्या या उपक्रमाबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते की, हे सरकार वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करते. एक प्रकारे पंतप्रधान मोदींना ‘मुत्सद्देगिरीचे लोकशाहीकरण’ करायचे आहे. संपूर्ण देशाला आपण जी २० मध्ये सहभागी होत आहोत, असे वाटावे अशी त्यांची इच्छा आहे.

हेही वाचाः SRK चा ‘जवान’ रिलीज होण्याच्या पार्श्वभूमीवर PVR INOX चा शेअर वाढला, उद्योगविश्वाचे चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीड कोटी लोकांना लाभ झाला

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले की, विविध शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या जी २० बैठकांमध्ये सुमारे १.५ कोटी लोकांनी या ना त्या मार्गाने संबंधित कामात भाग घेतला. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाशी निगडीत राहिल्याने त्यांच्यात एक वेगळाच स्वाभिमान निर्माण होतो. नॉन मेट्रो शहरांतील लोकांना हा अनुभव पूर्वी मिळत नव्हता. या बैठकांमध्ये १२५ राष्ट्रांतील १ लाखाहून अधिक लोकांनी भारताचे वैविध्य पाहिले. याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि ज्या शहरांवर आणि राज्यांवर हे प्रतिनिधी गेले त्यावर नक्कीच झाला आहे. या सर्व संधी पर्यटनातून उत्पन्न वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.