रिझर्व्ह बँकेने दोन हजार रूपयांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर वितरणात असलेल्या दोन हजारांच्या एकूण नोटांपैकी निम्म्या नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरूवारी दिली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक गुरूवारी संपली. यानंतर पत्रकार परिषदेत दास यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मार्चअखेर वितरणात दोन हजार रूपयांच्या ३.६२ लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. त्यातील १.८ लाख कोटी रुपयांच्या नोटा बँकांमध्ये आता परत आलेल्या आहेत. दोन हजारांच्या परत आलेल्या नोटांपैकी ८५ टक्के नोटा खात्यावर जमा करण्यात आलेल्या आहेत. हे आमच्या अपेक्षेप्रमाणे घडले आहे.

दोन हजारांच्या नोटा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी वितरणातून चलनात त्यांचे प्रमाण १०.८ टक्के होते. हे प्रमाण २०१८ मध्ये ६.७३ लाख कोटी रुपये होते. रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. तोपर्यंत नागरिकांना या नोटा बँकांमध्ये खात्यावर जमा करता येतील अथवा बदलून मिळतील.

हेही वाचाः Repo Rate : सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कोणताही बदल नाही, महागाईबाबत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मोठी घोषणा

बँकांना दोन हजारांच्या नोटांचा फायदा

रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याचा निर्णय मे महिन्यात घेतला . यामुळे बँकांच्या ठेवींमध्ये दोन लाख कोटी रुपयांची वाढ होईल, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, बँकांचे ठेवींमध्ये वाढ झाल्यास त्यांचा ठेवींवरील खर्च कमी होणार आहे. कर्जाची मागणी स्थिर राहिली तरी यामुळे बँकांच्या निव्वळ व्याज नफ्यात वाढ होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचाः ५०० च्या नोटा बंद करण्याचा किंवा १०००च्या सुरू करण्याचा सरकारचा विचार नाही – शक्तिकांत दास