नवी दिल्ली : निर्मिती उद्योगात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ (एफडीआय) २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या कालावधीत ६९ टक्क्यांनी वाढून १६५ अब्ज डॉलर म्हणजेच १३.६८ लाख कोटींवर पोहोचला आहे, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी संसदेत दिली. उत्पादन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीसाठी भारत हा सर्वाधिक पसंतीचा देश म्हणून उदयास येत असून, त्याचे प्रतिबिंब एफडीआयमध्ये वेगवान वाढीतही दिसत आहे.

हेही वाचा >>> Gold-Silver Price: घसरणीनंतर सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या दहा आर्थिक वर्षांमध्ये या क्षेत्रातील एफडीआय प्रवाह त्या आधीच्या दहा वर्षातील (२००४ ते २०१४) ९७.७ अब्ज डॉलरच्या तुलनेत, ६९ टक्क्यांनी वधारला आहे. मागील पाच आर्थिक वर्षांमध्ये (२०१९ ते २०२४) देशात एकूण परकीय गुंतवणुकीचे प्रमाण ३८३.५० अब्ज डॉलर असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले. मोबाईल निर्मितीत आघाडी सरकारने घेतलेल्या पुढाकारांमुळे मोबाईलसह अनेक क्षेत्रातील आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे. मोबाईल फोनची आयात २०१४-१५ मधील ४८,६०९ कोटी रुपयांवरून २०२३-२४ मध्ये ७,६७४ कोटी रुपयांवर घसरली आहे. दुसरीकडे, निर्यात २०१४-१५ मधील १,५६६ कोटी रुपयांवरून, २०२३-२४ मध्ये १,२८,९८२ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.