नवी दिल्ली: देशातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राची वाढ वेगाने सुरू असून, मार्च २०१४ मधी ७५.५२ गिगावॉटवरून ती दशकभरात तिपटीने वाढून २३२ गिगावॉटवर पोहोचली आहे.
जागतिक पातळीवर अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात भारत आपले स्थान निर्माण करीत आहे. गेल्या दशकभरात हे स्थित्यंतर घडविण्यात सौर ऊर्जेचा वाटा मोठा आहे. देशातील सौर ऊर्जा क्षमता २०१४ मध्ये केवळ २.८२ गिगावॉट होती. ती २०२४ मध्ये १०८ गिगावॉटवर पोहोचली आहे. पवन ऊर्जेची क्षमता दशकभरात दुपटीने वाढली असून, ती २१ गिगावॉटवरून ५१ गिगावॉटवर पोहोचली आहे. मोठ्या जलविद्युत प्रकल्पांचेही या वाढीत योगदान आहे.
सौर ऊर्जेचे दर गेल्या दशकभरात ८० टक्क्यांनी कमी झाले आहेत. सध्या नीमचमध्ये हा दर प्रति युनिट १०.९५ रुपये आहे. हे दर परवडणारे असल्याने सौर ऊर्जेचा स्वीकार वाढला आहे. देशातील सौर पॅनेल निर्मिती क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. २०१४ मध्ये २ गिगावॉट असलेली ही क्षमता २०२४ मध्ये ९० गिगावॉटवर पोहोचली. ही क्षमता २०३० पर्यंत १५० गिगावॉटवर जाण्याचा अंदाज आहे. सौर घट निर्मिती क्षमता सध्या २५ गिगावॉट आणि वेफर निर्मिती क्षमता २ गिगावॉट आहे. दशकभरापूर्वी ही क्षमता नगण्य होती. सरकारने २०३० पर्यंत सौर घट आणि वेफर निर्मिती क्षमता अनुक्रमे १०० गिगावॉट आणि ४० गिगावॉटवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
जैव ऊर्जा क्षमतते वाढ
देशातील जैव ऊर्जा क्षमतेत सातत्याने वाढ सुरू आहे. गेल्या दशकभरात जैव ऊर्जा क्षमता ८.१ गिगावॉटवरून ११.५ गिगावॉटवर पोहोचली आहे. त्यात ४२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात आधी केवळ एक प्रकल्प होता आणि त्याची क्षमता प्रतिदिन ८ टन होती. आता १५० प्रकल्प सुरू असून, त्यांची एकूण क्षमता प्रतिदिन १,२११ टन आहे.