लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: खासगी क्षेत्रातील देशातील पाचव्या क्रमांकावर असलेल्या इंडसइंड बँकेने बुधवारी स्थापनेनंतरच्या १८ वर्षांत पहिल्यांदाच तिमाही तोटा नोंदविला. हिशेबातील त्रुटींचा उलगडा झाल्याने अडचणीत सापडलेल्या या बँकेने तिच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या फसवणुकीत मोठी भूमिका बजावल्याची आणि त्याचाच बँकेच्या आर्थिक कामगिरीवर विपरित परिणाम झाल्याची कबुली दिली.

सरलेल्या जानेवारी-मार्च २०२५ तिमाहीत, इंडसइंड बँकेने २,२३६ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे, गतवर्षी याच तिमाहीत बँकेने २,३४६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. हिशेबात राहून गेलेल्या विसंगती पाहता, बँकेला तोटा होणे अपेक्षित असले तरी तो अपेक्षेपेक्षा खूपच जास्त असल्याचे बुधवारी जाहीर झालेल्या प्रत्यक्ष निकालांतून दिसून आले. लेखाविषयक विसंगतींचा बँकेनेच केलेला खुलासा, त्यासंबंधाने त्रयस्थ संस्थेकडून लेखा-परीक्षण आणि छाननी सुरू झाल्यानंतर, मुख्याधिकारी सुमंत कठपालिया, उप-मुख्याधिकारी अरुण खुराणा यांनी गेल्या महिन्यांत दिलेला राजीनामा अशी संकटांची मालिका इंडसइंड बँकेबाबत सुरू आहे.

बँकेने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या तिमाही/१२ महिन्यांच्या आर्थिक निकालांना अंतिम रूप देताना, त्रयस्थ लेखापरीक्षक संस्थेने निर्धारीत केलेल्या सर्व विसंगतींचा योग्य हिशेब जुळविला आहे आणि त्याचे परिणाम निकालात पूर्णपणे प्रतिबिंबित झाले आहेत, असे इंडसइंड बँकेने ही कामगिरी जाहीर करण्यापूर्वी शेअर बाजारांना दिलेल्या निवेदनांत नमूद केले आहे.

बँकेने अलीकडेच, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तीन तिमाहींमध्ये ६७४ कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न चुकीने नोंदवण्यात आले असा खुलासा केला आहे. या आधी डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमधील अनियमिततेबद्दल १० मार्च रोजी दिलेल्या कबुलीनंतर पुढे आलेली ही दुसरी चूक आहे. डेरिव्हेटिव्ह व्यवहारातील अनियमितेतून बँकेला जवळपास २,००० कोटींचा आर्थिक फटका बसू शकेल, असा त्यावेळी अंदाजले गेले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँकेची फसवणूक झाल्याचा आणि लेखा आणि आर्थिक अहवालातील या लबाडी व अनियमितते काही कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका राहिली असल्याचा संचालक मंडळाला संशय आहे, असे इंडसइंड बँकेने निवेदनात म्हटले आहे.