नवी दिल्ली : देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादन वाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या औद्याोगिक उत्पादन निर्देशांकातील (आयआयपी) एप्रिलमध्ये २.७ टक्क्यांवर मर्यादित राहिली. ही आयआयपीची गेल्या आठ महिन्यातील नीचांकी पातळी आहे. मुख्यत: निर्मिती क्षेत्र, खाणकाम आणि वीज क्षेत्राच्या सुमार कामगिरीने औद्योगिक उत्पादन निर्देशांकात घसरण झाल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीतून समोर आले.
केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. उद्याोग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील वाढ गेल्यावर्षी म्हणजेच एप्रिल २०२४ मध्ये ५.२ टक्के होती. त्याआधीच्या मार्च महिन्यात निर्देशांकातील वाढ ३.९ टक्के तर फेब्रुवारीमध्ये ही वाढ २.७ नोंदवली गेली होती. वीजनिर्मिती क्षेत्राच्या वाढीचा दर एप्रिलमध्ये १ टक्क्यांपर्यंत खाली घसरला, गेल्या वर्षी याच कालावधीत तो १०.२ टक्के होता. तर खाणकाम उत्पादनात ०.२ टक्के घट झाली, ती गेल्या वर्षी एप्रिलमधील ६.८ टक्क्यांच्या तुलनेत यंदा मोठी घसरण नोंदविण्यात आली.
भांडवली वस्तू क्षेत्राने मात्र दमदार कामगिरी करत २०.३ टक्के दर गाठला, जो गेल्या वर्षी फक्त २.८ टक्के नोंदवला गेला होता. तर प्राथमिक वस्तूंचे उत्पादन एप्रिल २०२५ मध्ये ०.४ टक्के नोंदवले गेले, जे गेल्या वर्षी ७ टक्के होते.
आयआयपी म्हणजे काय?
ज्याप्रमाणे आपण व्यवहारात वापरतो त्या वस्तू आणि सेवांचे मूल्य कमी अथवा जास्त झाले हे समजून घ्यायचे असेल तर आपण महागाई निर्देशांक विचारात घेतो, त्याचप्रमाणे देशात ठरावीक कालावधीत औद्याोगिक उत्पादनात वाढ किंवा घट झाली हे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शन म्हणजेच ‘आयआयपी’ या निर्देशांकातून समजते. देशाच्या दीर्घकालीन प्रगतीचा कणा म्हणजेच देशातील द्वितीयक (सेकंडरी) क्षेत्र अर्थात कारखानदारी उद्याोग! कोणत्याही कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर करणे, वस्तूचे मूल्य वाढवणे हे काम कारखानदारी उद्याोगात केले जाते.
उद्योग हे रोजगारनिर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असतात. उद्याोगात तयार होणाऱ्या वस्तू या अधिकाधिक प्रमाणात तयार झाल्या याचा अर्थ औद्याोगिक क्षेत्राला सुगीचे दिवस आले असे आपण म्हणू शकतो.