जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वारे वाहत असताना देशांतर्गत भांडवली बाजारात सूचिबद्ध आघाडीच्या ५०० कंपन्यांचा वार्षिक निव्वळ नफा १५ लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या तिमाहीत कंपन्यांच्या महसुलात घट झाली असली तरी सरलेल्या आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांनी दमदार आर्थिक कामगिरी केल्याचे दर्शवतो.
ॲक्सिस सिक्युरिटीजने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध आघाडीच्या ५०० (एनएसई ५०० गटातील) कंपन्यांचा एकत्रित नफा आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १०.६६ लाख कोटी रुपयांवरून, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १५.०७ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच सरलेल्या आर्थिक वर्षात एनएसई ५०० कंपन्यांचा नफा २९.४ टक्क्यांनी वधारला.
बाजार भांडवलाच्या दृष्टीने अव्वल ४५८ कंपन्यांची आर्थिक कामगिरीचा आढावा ॲक्सिस सिक्युरिटीजने घेतला आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात कृषी आणि रसायने, दूरसंचार या क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली. दूरसंचार कंपन्यांच्या नफ्यात ४५.७ टक्के वाढ झाली, तर आरोग्यसेवा आणि कृषी आणि रसायन क्षेत्रातील कंपन्यांचा नफा १०.८ टक्के ते १३.१ टक्क्यांनी वधारला. बँकिंग क्षेत्राचा नफा ४.८ टक्के, तर तेल आणि वायू क्षेत्राचा नफा १०.२ टक्क्यांनी कमी झाला.
आर्थिक वर्ष २०२०-२१ ते आर्थिक वर्ष २०२३-२४ पर्यंत, एनएसई ५०० कंपन्यांच्या नफ्यात वार्षिक सरासरी २६ टक्के चक्रवाढ दराने वाढ झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे करोनाच्या काळात तोट्यात असलेली क्षेत्रे आता सकारात्मक झाली आहेत. सरलेल्या तिमाहीत मंदीसदृश वातावरण असले तरी नफ्याचे इंजिन थांबलेले नाही. लार्ज कॅप कंपन्यांच्या कमाईमध्ये सुधारणा होत आहे. आर्थिक वर्षाच्या अंतिम अर्थात मार्च तिमाहीत एनएसई ५०० गटामधील ८१ टक्के कंपन्यांची अपेक्षेनुरूप कामगिरी केली, असे मत ॲक्सिस सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख नीरज चडावार यांनी व्यक्त केले.
निफ्टी ५० निर्देशांकातील सर्व कंपन्यांचा एकूण निव्वळ नफा मार्च तिमाहीत ११.१ टक्क्यांनी वाढला. निर्देशांकांतील फेरबदलामुळे ही कामगिरी काहीशी प्रभावित झाली आहे. निर्देशांकात झोमॅटो आणि जिओ फायनान्शियलने बीपीसीएल आणि ब्रिटानियाची जागा घेतली आहे, ज्यामुळे निर्देशांकाच्या नफ्याच्या कामगिरीतही बदल झाला. व्यापार धोरण अनिश्चितता, रुपयाचे अवमूल्यन आणि तुलनेने जास्त मूल्यांकन हे नजीकच्या काळातील बाजारात परताव्याच्या गुणाकारांसाठी प्रमुख धोके आहेत, असे चडावार म्हणाले.