जगभरात वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. या सगळ्याचा परिणाम भारतातल्या नोकऱ्यांवरही होतो आहे. भारतातली सर्वात मोठी कंपनी टीसीएसने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचारी कपात होणार नाही तरीही नोकरी विश्वात मोठा प्रभाव पडणार आहे. TCS ने या वर्षी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ हवी असेल तर एक अट घातली आहे. ज्याची चर्चा चांगलीच होते आहे.
काय म्हटलं आहे टीसीएसने?
टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएसने पगार वाढ आणि बढती देण्यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांबाबतच आहे. काही महिन्यांपासून TCS ने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी कंपनीने विविध प्रकारची पावलं उचलली आहेत. मात्र कंपनीने नुकताच घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. तसंच कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय त्यांना चकीत करणारा आहे. कर्मचाऱ्यांचं ऑफिसला येणं आणि त्यांची बढती-पगारवाढ याच्याशी संबंधित हा निर्णय आहे.
रिटर्न टू ऑफिस पॉलिसीबाबत मोठा निर्णय
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार टीसीएसने रिटर्न टू ऑफिस पॉलिसी आणखी कठोर केली आहे. घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रोज ऑफिसला आलं पाहिजे अशी अट कंपनीने घातली आहेच. शिवाय ऑफिसला कर्मचारी नियमितपणे येतात की नाही? यावर त्यांची पगारवाढ आणि बढती ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
कंपनीने हे देखील स्पष्ट केलं आहे की हा निर्णय फक्त जुन्या कर्मचाऱ्यांसाठी नाही. तर नव्याने नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही लागू आहे. ज्या नवोदित कर्मचाऱ्याने वार्षिक ३ लाखांहून अधिक पगार घेतला आहे. त्यांच्यासह सगळ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला येणं टीसीएसने अनिवार्य केलं आहे. रिटर्न टू ऑफिस पॉलिसीवरच पगारवाढ आणि बढती अवलंबून असेल असं कंपनीने म्हटलंय.
हे पण वाचा-Tata-Hyundai चा गेम होणार! महिंद्रा आणतेय सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘या’ SUV कारला ६ सीटरसह नव्या अवतारात
पाच दिवस कार्यालयात येणं आवश्यक
आपल्या रिटर्न टू ऑफिस पॉलिसीमध्ये कंपनीने हे स्पष्ट केलं आहे की कर्मचाऱ्यांना पाच दिवस कार्यालयात येणं अनिवार्य असणार आहे. याचाच अर्थ हा की देशातली सर्वात मोठी कंपनी असलेल्या टीसीएसने वर्क फ्रॉम होम बंद केलं आहे. करोना काळात देशातच नाही तर संपूर्ण जगभरात वर्क फ्रॉम होम ही पद्धत राबवली गेली. आता बहुतांश कंपन्या या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवण्यावर भर देत आहेत.