आर. सी. भार्गव मारुती सुझुकीचे अध्यक्ष आहेत. ३० जुलै १९३४ ला जन्मलेले. म्हणजेच वयाच्या ८९ व्या वर्षीसुद्धा ते कार्यरत आहेत. गेली ४२ वर्षे मारुती सुझुकी नावाशी ते जोडले गेले आहेत. सुझुकीशी बंध जुळण्याअगोदर ‘मारुती’मधील निवडक काही कर्मचाऱ्यांपैकी ते आहेत. एक आयएएस अधिकारी २५ वर्षे प्रशासकीय सेवेत नोकरी करतो. खासगी क्षेत्रात मारुतीचा विपणन संचालक होतो, पुढे मुख्य अधिकारी होतो आणि त्यानंतर कंपनीचा अध्यक्षसुद्धा होतो. ही कंपनी बाजारात असलेल्या वाहन उद्योगातील इतर कंपन्यांना मागे टाकून प्रथम क्रमांकावर येते. प्रथम क्रमांकावर येणे महत्त्वाचे नाही तर त्या स्थानावर टिकून राहणे महत्त्वाचे आहे. वि. स. खांडेकर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की – “शिखर ही एक अशी जागा आहे की, तेथे फार काळ राहता येत नाही.”

इलॉन मस्क भारतात टेस्लाचे उत्पादन सुरू करणार का? खरोखर, ते केव्हा सुरू होईल? अशा प्रश्नांना आज तरी उत्तर नाही. नोकिया कंपनीच्या अध्यक्षांनी कंपनी जेव्हा अडचणीत आली तेव्हा आपल्या कर्मचाऱ्यांसमोर बोलताना, “आपल्या कंपनीने काहीही चुकीचे केलेलं नाही, परंतु आपण संपलो,” असे विधान केले होते. मारुतीने इलेक्ट्रिक वाहने आणली नाहीत, तर काही वर्षांनंतर मारुतीचे त्यावेळेचे जे कोणी अध्यक्ष असतील, त्यांना नोकियाच्या अध्यक्षांनी जे वाक्य वापरले तेच वापरावे लागेल का? या प्रश्नाला आज उत्तर नाही. परंतु आजपर्यंत तरी आर. सी. भार्गव यांचे विचार योग्यच ठरले आहेत. वाहन उद्योगाची बाजू सरकारच्या समोर यशस्वीपणे मांडण्याचे काम हा माणूस वर्षानुवर्षे करीत आहे. त्यांचे बोलणे इतके रोखठोख असते की, समोर कोण आहे याची कोणतीही भीडभाड ते ठेवत नाहीत.

हेही वाचा – निर्देशांकाची अविरत उच्चांकी झेप कायम; नवीन उच्चांकी पातळीला गवसणी

वाहन उद्योगाला ५० टक्के कराचे ओझे वागवावे लागते. या उद्योगात चीनशी बरोबरी करायला भारताला आणखी कमीतकमी ४० वर्षे लागतील. चीनमध्ये १००० व्यक्तींकडे २२१ वाहने आहेत. भारतात १००० व्यक्तींच्या मागे ३० वाहने आहेत. अजूनसुद्धा भारतात वाहनांकडे चैनीची वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आहे. मोठे वाहन असले, जास्त किमतीचे असले की मग ते वाहन वापरणाऱ्याची प्रतिष्ठा, बाजारातील पत वाढते, असा चुकीचा दृष्टिकोन भारतात आहे.

काही वर्षांपूर्वी अगदी अचानकपणे नाशिकला भार्गव यांची भेट झाली. अंबड औद्योगिक वसाहतीत डॉ. पोफळे यांची फेमकेअर नावाची कंपनी होती. कंपनीने खूप आर्थिक चढ-उतार बघितलेले होते, परंतु तरीसुद्धा कंपनीच्या उत्पादनाने बाजारात आपले एक नाव निर्माण केले होते. हिंदुस्तान लिव्हर ही कंपनी (फेमकेअर) ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु डॉ. पोफळे यांनी त्या वेळेस हिंदुस्तान लिव्हरला स्पष्ट नकार दिला. परंतु नंतर डॉ. पोफळे यांच्या मुलाने कंपनीला वारसदार नाही म्हणून कंपनी विकण्याचा निर्णय घेतला. सौंदर्य प्रसाधने निर्माण करणारी शाखा डाबरला विकली. आर सी भार्गव डाबरचे संचालक असल्याने ते नाशिकच्या फेमकेअरच्या वार्षिक सभेला आले. आम्ही फेमकेअरचे भागधारक असल्याने दरवर्षी वार्षिक सभेला उपस्थित राहत होतो. अशाच एका सभेला भार्गव यांना भेटण्याची संधी मिळाली. जेवण करत असताना भरपूर गप्पा झाल्या. त्यांनी आपले कार्ड दिले. “मारुतीचा कारखाना बघायचा असेल तर जरूर या, माझ्या लायक काही काम असेल तर हक्काने सांगा,” असेही सांगितले.

हेही वाचा – हृदयी वसंत फुलताना!’

एका मोठ्या कंपनीचा अध्यक्ष एवढ्या मोकळेपणाने गप्पा मारतो. वाहनांची विक्री कशी करायची याची माहिती नाही, पण त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी सांगितले – ‘‘आपले निरीक्षण चांगले हवे, आपल्याला एखाद्या गोष्टींचे ज्ञान नसेल तर ते ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून समजावून घेण्यात कसलाही कमीपणा मानण्याचे कारण नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्ष १९८१ मध्ये कंपनीच्या हजेरी पटावर तिसरे कर्मचारी म्हणून नियुक्त झालेले आर सी भार्गव शेअर बाजारात उलाढाल करत नाहीत. पण तरीसुद्धा बाजाराशी संबंधित आहेत. त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव शेअर्सची खरेदी विक्री करणाऱ्यांवर पडतो. त्यांचे म्हणणे खरे मानायचे तर, इलेक्ट्रिक वाहनांची अजून तरी तेवढी आवश्यकता नाही. पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहने आणखी काही वर्षे भारतीय रस्त्यांवर धावतीलच. उगाचच २०३० पर्यंत ही वाहने नामशेष होतील, असा विचार करण्याची गरज नाही. बघू या पुढे काय होते ते!

  • प्रमोद पुराणिक
    ९८२२०७८८२९
    pramodpuranik5@gmail.com