तृप्ती राणे

“आमच्या हिला गुंतवणूक वगैरे काही कळत नाही, साधं बँकेतसुद्धा जाता येत नाही”, “माझ्या नवऱ्याला पैसे साठवणं हे माहीतच नाही, मिळाले किती आणि गेले किती याचा काही हिशोब नाही”, “माझ्या घरात कोणाचं काय चाललंय हे कळतच नाही, कुणीही कधीही कसलाही व्यवहार करतं आणि सगळं माझ्या डोक्याशी येतं”, “माझ्यावर कधीच कुठलीच जबाबदारी नव्हती, मला कधीच पैशांचे व्यवहार करावे लागले नाही, म्हणून मला त्यात स्वारस्य वाटत नाही”, “सारखं पैसा-पैसा काय करत राहायचं, किती मन मारून जगायचं?” ही अशी वाक्य अनेकदा आपण आपल्या जोडीदाराकडून, आई-वडिलांकडून, भावंडांकडून, मित्र-मैत्रिणींकडून ऐकतो. माझ्याकडे येणाऱ्या अनेक जोडप्यांची आणि आई-वडिलांची अशाच प्रकारची तक्रार असते. या गोष्टीचा त्या कुटुंबाच्या आर्थिक आराखड्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि म्हणून आज मी या विषयावर लिहायचे ठरवले आहे.

आर्थिक विसंगती (Financial Incompatibility) म्हणजे दोन व्यक्तींच्या पैशांबाबतच्या धारणांमध्ये असणारा फरक. इथे गोष्टी वरकरणी नसतात. काही माणसे अत्यंत हिशोबी असतात, काही कंजूष, काहींचा हात नेहमीच ढिला, तर काही व्यवहारी! कधी कधी तर एकच व्यक्ती त्याचा वेगवेगळ्या नात्यांमध्ये वेगवेगळे आर्थिक गुण दर्शवते. मुलांसाठी पटकन खर्च करणे, स्वतःसाठी खर्च करताना कंजुषी करणे, जोडीदाराकडे हिशोब मागणे आणि मित्राने मागितले की, विचारपूस न करता पैसे देणे. अर्थात यात मूळ स्वभाव हा आलाच, परंतु अनेकदा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येणारे आर्थिक प्रसंग हे त्याच्या धारणा तयार करतात, असे लक्षात येते. लहानपणी अनुभवलेली आर्थिक तंगी एक तर माणसाला खूप व्यवहारी करते किंवा अगदी विपरीत दशा होते. म्हणजे पैसे मिळाले की, हवे तसे खर्च करून “तेवढंच काय ते समाधान” मिळवायला उद्युक्त करते. पैशांबाबतची असुरक्षितता एखाद्या व्यक्तीला प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीकडे साशंकतेने बघायला भाग पाडते. स्त्रियांच्या बाबतीत पाहायचे झाल्यास, अनेकदा आधी वडील, नंतर नवरा आणि त्यानंतर मुले हे व्यवहार करत असल्याने कधी आर्थिक जबाबदारी घ्यायची वेळच आलेली नसते. काही जणी कमावत नाही म्हणूनदेखील या बाबतीत निराश असतात, तर काही “मला काही समजत नाही, म्हणून यांच्याकडे सगळे व्यवहार सोपवते”, असे म्हणून मोकळ्या होतात. मुलांच्या आर्थिक धारणांच्या बाबतीत तर चित्रच वेगळे आहे. काही कुटुंबांमध्ये मुलांना काही कळता कामा नये म्हणून यांच्यासमोर कधीच काहीच व्यवहार न केल्यामुळे पैसे कसे येतात?, कुठे खर्च होतात? गुंतवणूक का करायची? हे काही माहीत नसते. योग्य वेळी अर्थ संस्कार न झाल्याने ही मुले पुढे जाऊन स्वतःचे पैसे कसे हाताळतील या बाबत अनेक पालक संभ्रमात असतात. अनेकदा तर “आमच्या मुलांना काही कळत नाही आणि ते आम्ही काय सांगतो ते ऐकत नाही” हे आई-वडील सांगतात तर दुसऱ्या बाजूला मुले म्हणतात की, “आमच्या लहानपणी आम्हाला काही मजा करायला नाही मिळाली, कारण गरजांपलीकडे कधीच पैसे नसायचे आणि म्हणून स्वतःच्या कमाईतून मज्जा करायची ठरवली तर त्यात चुकीचं काय आहे? बाबांच्या पैशांना तर हात लावत नाही आहोत ना, मग कशाला रोज कटकट करायची?”. नवरा-बायकोमध्येसुद्धा एक जण काटकसरी तर दुसरा खर्च करण्यात वस्ताद असेल तर घरामध्ये पैशांवरून वाद होण्याची शक्यता वाढते. लॉटरी आणि जुगाराचा छंद अपणाऱ्या मंडळींच्या बाबतीत तर जास्त काही सांगायला नको.

तर, या अशा सर्व आव्हानांमधून जर आपल्याला स्वतःला आर्थिकरीत्या तयार करायचे असेल, तर थोडी मेहनत घ्यायला लागेल. मुलांना घडवायच्या आधी, पालकांना तयार व्हावे लागेल. मुळात स्वतःच्या चुकीच्या धारणांच्या बाबतीत जागरूक होण्याची गरज आहे. “मी पैशांच्या बाबतीत असा/अशी वागते यामागचे ‘हे’ कारण आहे जे ‘रास्त नाहीये’ ही जाणीव होणे हे खूप महत्त्वाचे आहे. एकदा आपण हे स्वीकारले असेल, की दुसरी व्यक्ती अशी का वागते? तर मग या बाबतीत सुद्धा समजूतदारपणा वाढतो. मग पुढे साधावा लागतो तो आहे योग्य संवाद!खरे आव्हान तर इथेच आहे.

जोडीदाराला समजावताना, मुलांना सांगताना आणि आई-वडिलांबरोबर चर्चा करताना वेळ, शब्द आणि भावना व्यवस्थापन या सर्वांचा समतोल सांभाळावा लागतो. कधी अधिकाराने वागणे, तर कधी समुपदेशन करणे, कधी आज्ञा देणे तर कधी विश्वास ठेवून पूर्ण ताबा दुसऱ्याच्या हातात देणे हे प्रत्येक व्यक्तीने स्वतः तपासणे आणि अजमावणे आवश्यक आहे. मुळात पालकांचे एकमत असेल तर मुलांनाही योग्य वळण लावता येईल. एकाच घरात असणाऱ्या दोन मतांमध्ये ते सुद्धा गोंधळात पडू शकतात. जिथे घरी बोलायची सोय नसते तिथे एखादी व्यक्ती बाहेरच्या चुकीच्या सल्ल्याकडे आकर्षित होऊ शकते. म्हणून कुटुंबातील संवाद महत्त्वाचा आहे.

इथे एक अजून गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे, आपल्याकडे लग्न जमवताना मुला-मुलीच्या आर्थिक परिस्थितीची अगदी जुजबी माहिती सांगितली जाते. मुलगा आणि त्याच्या आई-वडिलांकडे किती संपत्ती आहे, मुलाचा आणि मुलीचा पगार किती आहे हे पाहिले जाते. मात्र याही पलीकडे थोडी माहिती घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. एकमेकांच्या पैशांबाबतच्या धारणा, कर्जबाजारीपणा, गुंतवणूक क्षमता या गोष्टींचासुद्धा विचार व्हायला हवा. हल्ली अनेकदा कर्ज काढून शिक्षण, घर आणि लग्न समारंभ होताना दिसतात. तेव्हा लग्नानंतर सर्वात पहिली जबाबदारी पडते ती कर्ज फेडण्याची. जर दोन्ही कुटुंबांना ही माहिती नसेल आणि लग्नानंतर त्यामुळे विसंवाद झाला, तर त्याचे पडसाद हे पैशांच्या पलीकडे असतील हे सांगायला नको. म्हणून मुला-मुलीने हे एकमेकांना समजून मग पुढचा निर्णय घ्यावा असा मी सल्ला देते.

आर्थिक विसंगती ही कायमस्वरूपी समस्या नाही. योग्य मार्गदर्शन, समुपदेशन, आणि स्वतःवर ताबा ठेवून आपण आपल्या आर्थिक धारणांमध्ये बदल घडवू शकतो. दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा हिणवण्यापेक्षा त्याला/तिला प्रोत्साहित केले तर त्यातून सगळ्यांना आनंद मिळेल. टोमणे मारून मागे खेचण्यापेक्षा, योग्य मार्ग दाखवून आयुष्यात पुढे जायला मदत करताना जास्त समाधान अनुभवता येईल. सुखी आर्थिक आयुष्य जगायला एवढे पुरेसे आहे ना?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तृप्ती राणे
trupti_vrane@yahoo.com
प्रकटीकरण : हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.