तृप्ती राणे

गुंतवणूक करताना आपण म्हणतोच ना जोखीम रास्त आणि परतावे मस्त असणारा गुंतवणूक पर्याय उत्तम असतो. व्यावसायिकांसाठी कुठलीही आर्थिक गुंतवणूक त्यांना उद्योगातून मिळणाऱ्या परताव्यांसारखे खात्रीशीर परतावे देऊ शकत नाही; परंतु व्यावसायिकांचा प्रश्न फक्त परताव्यांपुरता मर्यादित नाही, तर त्यांनी जोखीमदेखील समजून घ्यायला हवी.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सत्तेच्या राजकारणात व्यवसायाचे नुकसान
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
The Reserve Bank kept the repo rate steady in its monetary policy meeting for the fiscal year
कर्जदारांचा पुन्हा हिरमोड; व्याजदर कपात नाहीच! रिझर्व्ह बँकेकडून सलग सातव्या बैठकीत ‘जैसे थे’ धोरण

काही दिवसांपूर्वी माझ्याकडे वयाच्या पन्नाशीत असणारे एक गृहस्थ आले होते, जे गेली अनेक वर्षे एक अतिशय यशस्वी आणि फायदेशीर व्यवसाय चालवत होते. त्यांचा नफा साधारणपणे ३५ ते ४० टक्के होता. व्यवसायाची घडी इतकी छान बसली होती की कधी तोटा झाल्याचे त्यांना आठवत नव्हते. त्यांना त्यांच्या मित्राने आर्थिक नियोजन करायचा सल्ला दिला आणि म्हणून ते माझ्याकडे आले होते. त्यांची सगळी माहिती त्यांनी व्यवस्थित दिली आणि मग आम्ही गुंतवणुकीच्या विषयाकडे वळलो. त्यांनी माझ्याकडून निरनिराळे गुंतवणूक पर्याय कोणते आहेत? किती परतावे देतात? किती नुकसान होऊ शकते? आणि हे सर्व करायला किती मेहनत घ्यावी लागते हे समजून घेतले. थोडा विचार करून म्हणाले, “हे आर्थिक नियोजन वगैरे ठीक आहे; पण गुंतवणूक पर्याय काही खास वाटत नाही. आज माझा व्यवसाय मला इतके चांगले परतावे देत आहे आणि तेसुद्धा बऱ्यापैकी खात्रीशीर, तर मग मी तिथेच पैसे लावून वाढवतो. तिकडे जास्त लवकर संपत्तीनिर्मिती होईल. दुसऱ्याकडे पैसे देऊन नाही तरी कमी, बेभरवशी परतावे मिळणार. त्यापेक्षा माझ्या उद्योगात पैसे राहू द्या. बरोबर की नाही?” त्यांचा प्रश्न गुंतवणुकीचे परतावे आणि जोखीम या मुद्द्यावर अगदी योग्य होता.

गुंतवणूक करताना आपण म्हणतोच ना जोखीम रास्त आणि परतावे मस्त असणारा गुंतवणूक पर्याय उत्तम असतो. कुठलीही आर्थिक गुंतवणूक त्यांना उद्योगातून मिळणाऱ्या परताव्यांसारखे खात्रीशीर परतावे देऊ शकत नाही; परंतु त्यांच्यासारख्या व्यावसायिकांचा प्रश्न फक्त परताव्यांपुरता मर्यादित नाही! आजच्या लेखातून आपण हे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा >>> ‘एसडब्लूपी’ : नियमित उत्पन्नाचा मार्ग

कुठलाही व्यावसायिक जेव्हा आपले पैसे व्यवसायात गुंतवतो त्या वेळी साधारणपणे किती नफा मिळाला याचे गणित मांडत नाही आणि पैसे तिथेच ठेवतो. व्यवसायाच्या विस्तारासाठी हे करणे साहजिक आहे. त्यात जर ३० ते ४० टक्के परतावे मिळत असतील तर मग कोणाला अशी वाढ नको असेल. घरातील गरजांसाठी लागतील तेव्हा आणि तसे पैसे बाहेर काढतो; परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, जोखीम व्यवस्थापन हे आर्थिक नियोजनाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आपली सगळी पुंजी जर एकाच ठिकाणी गुंतवलेली असेल तर त्या व्यावसायिकाची जोखीम खूप जास्त आहे. विशेषतः जेव्हा उद्योग संपूर्णपणे एखाद्याच्या वैयक्तिक कौशल्यावर आधारित आहे किंवा घरातील पुढची पिढी तो व्यवसाय पुढे नेण्यात स्वारस्य दाखवत नाही. तसेच उद्योग काही मोजक्या ग्राहकांवर विसंबून आहे, अशा सर्व वेळी जर फटका बसला तर संपूर्ण कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत होऊ शकते. अनेक जणांनी याचा अनुभव करोनाकाळात घेतला आहे. या काळात अनेक कुटुंबे जी फक्त एकाच व्यवसायावर अवलंबून होती, ज्यांची इतर गुंतवणूक नव्हती, त्यांच्यातील अनेकांना कर्ज घेऊन घर चालवावे लागले.

यापलीकडेसुद्धा जेव्हा जेव्हा घरातील मोठे खर्च भागवायची वेळ येते, तेव्हा व्यवसायातील पैसे काढणे सहज असेल असे नाही. विशेषतः जेव्हा व्यवसाय खासगी कंपनीतून केला जात असेल. एखाद्या व्यक्तीची खासगी कंपनी असेल आणि त्याच्या मुलीला परदेशी शिक्षणासाठी कर्जाची आवश्यकता आहे. मात्र जर त्याने कंपनीकडून साजेसा पगार आणि लाभांश नियमितपणे घेतला नसेल, तर त्या व्यक्तीला कर्ज मिळविणे अवघड होईल.

उद्योग-व्यवसायात दिसणाऱ्या नफ्यामध्ये बाजारभावानुसार व्यावसायिकाचा पगार काढलेला नसतो, असे बऱ्याचदा निदर्शनास येते. म्हणून तो नफादेखील जास्त दिसतो. मग हा हिशोब केला की तो नफा बऱ्यापैकी कमी होतो. तेव्हा गुंतवणूक पर्यायांचा परतावा आणि व्यवसायाच्या परताव्याची तुलना करताना ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी. कधी कधी तर पगार बाजूला काढल्यावर लक्षात येते की, इतके वर्षे चालवलेला उद्योग हा खरं तर फायदा देत नव्हता. फक्त गुंतवलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे मिळून घराचे नियमित खर्च भागत होते. अशा उद्योगातून पुढचे मोठे खर्च कसे भागणार याचे गणित अनेक जण मांडत नाही.       

हेही वाचा >>> Money Mantra: डेकोय प्राइसिंग आणि चॉइस आर्किटेक्चर काय असतं?                 

काही ठिकाणी तर पुढची पिढी व्यवसाय पुढे नेण्यात कोणतेच स्वारस्य दाखवत नाही. मग अशा वेळी जेव्हा उद्योग विकावा लागतो, तेव्हा एकाच वर्षात भरपूर कर भरण्याची वेळ येऊ शकते. जर मूळ कर्त्याला अचानक काही झाले तर कुटुंबातील इतरांनासुद्धा त्याच्या व्यवसायातून हवे तसे किंवा हवे तेवढे पैसे बाहेर काढता येत नाही. कधी कधी तर चांगल्या उद्योगामध्ये अवाजवी जोखीम घेतल्याने किंवा घेतलेले निर्णय चुकीचे ठरल्याने कमी कालावधीमध्ये भरपूर नुकसान सोसावे लागले आहे. मग अशा वेळी जर कुटुंबाबतची आर्थिक गरज पुरवता आली नाही, तर एवढा सगळा खटाटोप करून नक्की काय मिळविले, हा प्रश्न मनात येतो.

यासाठी मुळात स्वतःला व्यवस्थित आणि योग्य पगार देऊन प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या उद्योगाची खरी कामगिरी तपासावी. स्वतःचा आणि उद्योगाचा ताळेबंद योग्य पद्धतीने आणि नियमित ठेवावा. वैयक्तिक गरजांसाठी वैयक्तिक गुंतवणूक करावी आणि पूर्णपणे एकाच उद्योगावर विसंबून न राहता, तिथली जोखीमदेखील कमी करावी. उद्योगाचा पसारा मोठा असेल तर कर व्यवस्थापन आणि गुंतवणुकीसाठी योग्य सल्ला घेऊन मग त्यानुसार पुढे काम करावे. उद्योग पुढे नेता येत नसेल तर वेळीच त्यांचे मूल्यांकन करून एक तर पूर्णपणे बाहेर पडावे किंवा दुसरा भागीदार निवडून, त्याला प्रशिक्षण देऊन व्यवसायातून काही काळानंतर निवृत्ती घ्यावी.

तेव्हा आर्थिक नियोजन हे कुटुंबाचे वेगळे आणि व्यवसायाचे वेगळे ठेवायचा सल्ला मी देते. दोन्ही ठिकाणी वेगळी जोखीम, वेगळी आर्थिक उद्दिष्टे आणि त्यानुसार वेगळे गुंतवणूक पर्याय हे समीकरण राखावे लागते. यासाठी लागणारा वेळ हा व्यावसायिकाने नियमितपणे दिल्यास दोन्ही ठिकाणी त्याला फायदा होऊ शकतो.

trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.