आंतरराष्ट्रीय स्तरावरील बिघडती युद्धजन्य परिस्थिती, जगाच्या आणि भारताच्या बाबतीत अमेरिकेकडून दिली गेलेली तीन महिन्यांच्या ‘आयात कर सुटीची’ ९ जुलैला संपत असलेली मुदत, अशा बिकट गोष्टी आपल्यापुढे सध्या आहेत.
या आणीबाणीच्या परिस्थितीत ‘ती सध्या काय करते?’ हा प्रश्न मनात येणे साहजिकच. तथापि तिचे सध्या २५,२०० च्या वेशीवरून, २४,५०० या स्तराचा आधार घेत पुन्हा २५,११२ असे हिंदोळे सुरू आहेत. युद्धाच्या परिस्थितीतही न डगमगता आपल्या या निफ्टीची धीरोदात्त, संयमी वाटचाल सुरू आहे. पण यापुढे काय? ताज्या आव्हानात्मक परिस्थितीत निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल कशी असेल ते आज आपण जाणून घेऊया.
आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर २४,८०० हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ आहे, हे यापूर्वीही याच स्तंभात सांगितलेले आहे. येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाने सातत्याने २४,८००चा स्तर राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे २५,२५० ते २५,५०० आणि द्वितीय वरचे लक्ष्य २५,८०० ते २६,१०० असे असेल. ही नाण्याची एक बाजू झाली. निफ्टी निर्देशांक २४,८०० च्या स्तराखाली सातत्याने पाच दिवस टिकल्यास. निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य हे २४,५०० ते २४,२०० आणि द्वितीय खालचे लक्ष्य २४,००० ते २३,५०० असेल.
चिकित्सा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर संकल्पनेची
अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपनी जी २०० देशात दंतनिगा आणि मौखिक देखभालासंबंधी ज्यात टूथपेस्ट, टूथब्रश, साबण अशा विविध उत्पादने घेते; १९३७ पासून भारतात कार्यरत असणाऱ्या या बहुराष्ट्रीय कंपनीचे समभाग १९७७ साली भारतीय गुंतवणूकदारांना उपलब्ध झाले. तत्कालीन जनता पार्टीच्या सरकारमधील उद्योगमंत्री जाँर्ज फर्नांडीस यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे हे घडू शकले. तो निर्णय म्हणजे आंतरराष्ट्रीय कंपन्यांना जर भारतात कार्यरत राहायचे असेल, त्या कंपनीने तिचे भागभांडवल भारतीय जनतेसाठी खुले करण्याची सक्ती करणारा होता. या निर्णयामुळे हिंदुस्थान लीव्हर, कॅस्ट्रॉल, कोलगेट अशा आंतरराष्ट्रीय कंपन्याचे समभाग भारतीय गुंतवणूकदारांना उपलब्ध झाले.
१९ मे २०२५च्या लेखात यातल्याच कोलगेट पामोलिव्ह या कंपनीच्या समभागाचे ‘निकाल पूर्व विश्लेषण’ करायची संधी मिळाली. त्या समयी शुक्रवार १६ मेचा बंद भाव २,६९० रुपये होता, तर वित्तीय निकाल २१ मेला जाहीर होणार होता. निकालानंतरचा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ हा २,६०० रुपये होता.
जाहीर झालेल्या निकालात उत्पन १,४९० कोटींवरून १,४६२ कोटींवर घसरले. निव्वळ नफा हा ३८० कोटींवरून, ३५५ कोटींवर घसरला. या निराशाजनक आर्थिक कामगिरीनंतर, २,६०० रुपयांचा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ तोडला जाणार हे अपेक्षितच होतं. झालंही तसंच निकालापश्चात २२ मेला २,६०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत, २,३५० रुपयांचे खालचे लक्ष्य आणि १३ जूनला २,३४६ रुपयांचा नीचांक समभागाने दाखविला.
कोलगेट पामोलिव्ह ही प्रतिथयश (ब्लूचीप) श्रेणीतील कंपनी, संपत्ती निर्माणामध्ये तिचा सिंहाचा वाटा. पण शेवटी निराशादायक निकाल लागल्यास, तात्पुरते त्या समभागाच्या खरेदीपासून दूर राहणे श्रेयस्कर. शुक्रवार २० जूनचा समगाचा २,४०२ रुपयांचा बंद भाव हेच सुचविणारा आहे.
आता नाण्याची दुसरी बाजू… कंपनीचे तिमाही वित्तिय निकाल नितांत सुंदर पण निकाल जाहीर झाल्यावर भांडवली बाजारात समभागाचा भाव गडगडतो या वाक्याची नव्याने प्रचीतीही हल्लीच बाजाराने दिली. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या समभागाची तिमाही निकालांनंतरची स्थिती हेच दर्शविते. ५ मे २०२५च्या लेखात इंडियन हॉटेल्सच्या समभागाचे ‘निकाल पूर्व विश्लेषण’ केलेले होते. त्या समयी शुक्रवार २ मेचा बंद भाव ८०० रुपये होता, तर वित्तीय निकाल ५ मेलाच जाहीर होणार होता. निकालानंतरचा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ हा ७७५ रुपये होता.
जाहीर झालेल्या निकालात कंपनीचे उत्पन्न २७ टक्क्यांचा वृद्धीदर, तर वार्षिक निव्वळ नफा २५ टक्क्यांचा वृद्धीदर नोंदवत ५२२.३० कोटींवर झेपावला. जाहीर झालेला वित्तीय निकाल नितांत सुंदर होता. पण घडलं विपरीतच. निकाल जाहीर झाल्यावर भांडवली बाजारात समभागाचा भाव ७७५ रुपयांचा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ तोडत, ७२५ रुपयांपर्यंत गडगडला. लेखात सूचित केलेली घसरण ९ मेला समभागाने ६९९ रुपयांचा नीचांक मारत साध्य केली. ताजा म्हणजेच शुक्रवार २० जूनचा त्याचा बंद भाव ७६६ रुपये आहे.
वरील दोन्ही उदाहरणांवरून ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना चांगल्या, वाईट तिमाही वित्तीय निकालांच्या वादळवाऱ्यात दीपस्तंभासारखी गुंतवणूकदारांना मार्गदर्शक ठरते असे म्हणायला हरकत नाही!
- आशीष ठाकूर
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीनआहेत.अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाँप लाँस’ आणी इच्छीत लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.