48th Annual General Meeting of Reliance Industries: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांची प्रतिक्षा अखेर संपणार असून, जिओचा IPO पुढच्या वर्षी म्हणजेच २०२६ च्या पहिल्या सहामाहीत येणार आहे. याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित करताना अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली.

मुकेश अंबानी म्हणाले, “मला अभिमान आहे की जियो आयपीओसाठी अर्ज करण्याच्या तयारीत आहे. आमचे लक्ष्य २०२६ च्या पहिल्या सहामाहीत जिओ सूचीबद्ध करणे आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की, जिओ आपल्या जागतिक प्रतिस्पर्ध्यांप्रमाणेच मूल्यनिर्मिती करेल. ही गुंतवणूकदारांसाठी अत्यंत आकर्षक संधी ठरेल, याची मला खात्री आहे.”

यावेळी अंबानी यंनी स्पष्ट केले की, रिलायन्स जिओने आज आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या ग्राहकसंख्येने ५० कोटींचा आकडा पार केला आहे. भागधारक आणि ग्राहकांचे आभार मानताना मुकेश अंबानी म्हणाले की, “जिओने अनेक अकल्पनीय गोष्टी केल्या आहेत. ज्यामध्ये व्हॉईस कॉल मोफत करणे, डिजिटल पेमेंटच्या पद्धती बदलणे, आधार, यूपीआय, जनधनसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना वाव देणे आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या स्टार्टअप इकोसिस्टमचा कणा बनणे यांचा समावेश आहे.”

मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, “जियो ट्रू ५जी ने डिजिटल कनेक्टिव्हिटीचा वेग, विश्वासार्हता आणि नेटवर्कने इंटरनेटची नव्याने व्याख्या लिहिली आहे. मी अनेक लाकांना ‘जिओने माझे जीवन बदलले’ किंवा ‘मला जिओ आवडते’, असे म्हणताना ऐकले आहे. पण मी मनापासून सांगतो की, प्रत्यक्षात प्रत्येक भारतीयाने आपल्या जीवनाचा भाग बनवून जिओला उभे केले आहे.”

जिओ लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारात

या सर्वसाधारण सभेत बोलताना रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी सांगितले की, “५जी सुरू झाल्यापासून देशात जियोच्या ग्राहकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. देशातील २२ कोटींपेक्षा अधिक ग्राहक आता जियो ट्रू ५जी नेटवर्कचा वापर करत आहेत.” त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, जिओ लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारातही उतरणार आहे.