एल.एस. रहेजा महाविद्यालयाच्या कल्पोत्सव या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नवनवीन कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये अ‍ॅनिमेशन, डिजिटल पद्धतीने चित्रपट बनविण्याचे तंत्र, फॅशन जगतातील आधुनिक तंत्रज्ञान अशा तंत्रज्ञान व त्यापासून बनविलेले कलाविष्कार या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन आजपासून सुरू झाले असून २१ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत खुले असणार आहे. कल्पोत्सव या वार्षकि महोत्सवात वर्षभर विद्यार्थ्यांनी केलेल्या नवनवीन कलाकृतींना व्यासपीठ मिळते. फॅशन क्षेत्रात रुची असणारे चाहते दरवर्षी या महोत्सवाला गर्दी करतात.

स्मार्ट शहरांबरोबर स्मार्ट महाविद्यालये
‘विवेकानंद शिक्षण संस्थे’च्या महाविद्यालयाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात भारतातील शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांची परिषद घेण्यात आली होती. याअंतर्गत भारतातील शिक्षण धोरणात बदल करण्याची गरज लक्षात घेता या बैठकीत चर्चा केली जाईल व अहवाल शासनाकडे पाठविला जाईल. शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे आणि स्मार्ट महाविद्यालयांची संकल्पना प्रत्यक्षात राबविणे या परिषदेच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जाणार आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबरोबर त्यांच्यातील मूल्यवाढीस चांगला फायदा होईल. सध्या सारे स्मार्ट सिटीचा पाठपुरावा करीत आहेत, मात्र महाविद्यालये स्मार्ट झाली तर उद्याचा नागरिकदेखील स्मार्ट होईल. असे मत विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. के. फडणीस यांनी व्यक्त केले. या वेळी या
परिषदेसाठी प्रा. अरुण निगवेकर, कुलगुरू संजय देशमुख, डी.वाय.पाटील विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. संजय ओक, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. जी.डी. यादव, आयआयटी मुंबईचे दीपक फाटक, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संचालक प्रा. परशुरामन आदी मान्यवर या वेळी
उपस्थित होते.

विकास महाविद्यालयात आतंरराष्ट्रीय परिषद
विद्या विकास शिक्षण सोसायटी संचालित विकास महाविद्यालयातर्फे विज्ञान, शाश्वतता आणि सद्य परिस्थितीतील सामाजिक आव्हाने आणि संधी या विषयावर आतंरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. शाश्वतता व विज्ञान या पूर्णत: वेगवेगळ्या विद्याशाखा विकसित झाल्या नसल्या तरी, जागतिक पातळीवर एक महत्त्वाचा विषय म्हणून पुढे येत असून संशोधक या विषयावर संशोधन करत आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानात होत असलेल्या प्रगतींमुळे समाजजीवनावर काय परिणाम होत आहेत याबद्दल आतंरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ संशोधक विस्तृत संशोधनपर शोधनिबंध सादर करणार आहेत. सदर परिषद इंडियन असोसिएशन ऑफ अ‍ॅक्व्ॉटिक बायोलॉजिस्ट हैदराबाद व नौशाद अली सरोवर संवर्धिनी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.
खबऱ्या