फारुक नाईकवाडे

व्यवस्थापकीय अभिवृत्ती हा बोजड पारिभाषिक शब्द सोपा करून पाहिला की लक्षात येते हा आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. आवश्यक असेल तिथे आपल्या अधिकारांचा वापर करून परिस्थिती आणि त्यातील संबंधित लोकांना हाताळणे आणि समोरची समस्या सोडविणे म्हणजे व्यवस्थापन. घरी भाजी शिल्लक नसेल तर गृहिणी एखादी उसळ बनवते; कागदपत्रांची तातडीने गरज असेल तर ती पोस्टाने पाठविण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाठविली जातात आणि त्याआधी ई-मेल किंवा व्हॉट्स अ‍ॅप केली जातात; पावसाळा सुरू होण्याआधी शेतकरी जमिनीची मशागत करून ठेवतात ही सगळी त्या त्या व्यक्तींची आपापल्या क्षेत्रातील व्यवस्थापन कौशल्येच आहेत. हे वरकरणी लहानशी पण अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेतली तर या घटकाची तयारी सोपी होते.

यामध्ये एखाद्या सुजाण नागरिकाचे हक्क आणि त्याची एखाद्या प्रसंगातील नागरिक या नात्याने किंवा हितसंबंधीय म्हणून असलेली कर्तव्ये यांच्याशी संबंधित दैनंदिन जीवनातील पेचप्रसंग आणि त्यावरील तोडगा विचारला जातो, याचबरोबर संस्थेत किंवा प्रशासनात अधिकारपदावर असताना येणारी आव्हाने व त्यावरील तोडगा किंवा नतिकदृष्टय़ा द्विधा मन:स्थितीत अडकविणाऱ्या समस्यांवर आधारित प्रश्न यामध्ये विचारले जातात. उमेदवारांचा महिलांबाबतचा दृिष्टकोन व संवेदनशीलता तपासणारा किमान एक तरी प्रश्न विचारला जातो. असे प्रश्न सोडविताना पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

*     प्रश्न लक्षपूर्वक वाचून नेमकी समस्या समजून घ्यावी.

*     या प्रसंगातील तुमची नेमकी भूमिका कोणती आहे ते लक्षात घ्यावे. कोणतीही भूमिका स्पष्टपणे तुम्हाला दिलेली नसेल तर एक सुजाण नागरिक म्हणून योग्य निर्णय घेणे तुमच्याकडून अपेक्षित आहे हे समजून घ्यावे.

*     प्रसंगातील सर्वात कच्चा व मजबूत पक्ष कोणता ते लक्षात घ्यावे. राज्यघटनेतील तरतुदी व तत्त्वज्ञान, सर्वसाधारण नतिकता व नसíगक न्याय, निर्बल समाजघटकांविषयी तसेच पर्यावरणीय संवेदनशीलता यांच्या आधारे समतोल दृष्टिकोन व तटस्थता ठेवून याबाबतचे मूल्यमापन करावे.

*     दिलेले सर्व पर्याय व्यवस्थित वाचून घ्यावेत. वरील मूल्यमापनाच्या आधारे पूर्णपणे असंवेदनशील, बेजबाबदार, टोकाचे पर्याय बाद करावेत.

*     यानंतर योग्य वाटणाऱ्या पर्यायांच्या योग्यतेची श्रेणी ठरवावी. अशी श्रेणी ठरवताना तुमच्या भूमिकेच्या अनुषंगाने पर्यायामधील आवश्यकता, व्यवहार्यता विचारात घ्यावी. आवश्यक वाटू शकला तरी व्यवहार्य नसलेला पर्याय बाजूला ठेवावा. त्यानंतर असा पर्याय अमलात आणण्याचे अधिकार तुमच्याकडे आहेत का हे तपासावे. अशी अधिकारिता नसेल तर तो पर्याय योग्य असला तरी तुम्ही अमलात आणू शकत नसल्याने त्याची श्रेणी त्या भूमिकेपुरती कमीच गृहीत धरायला हवी. अशा श्रेणीकरणातून जास्तीत जास्त योग्य पर्यायांपर्यंत पोचण्यास मदत होते.

*     उरलेल्या पर्यायातून जास्तीत जास्त सकारात्मक आणि बहुतांश हितसंबंधीयांना मान्य होऊ शकेल असा पर्याय शोधावा. असे दोन पर्याय आढळले तर जास्त दूरगामी परिणाम करणारा, कायमस्वरूपी तोडगा सांगणारा पर्याय निवडावा.

हे प्रश्न सोडवताना एकच पर्याय निवडायचा आहे. मात्र निवडलेल्या पर्यायाला ०, १, १.५ की २.५ गुण मिळतील याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यायांचे श्रेणीकरण करण्याची सवय असल्यास आपण निवडलेल्या उत्तराला तुलनात्मकरीत्या किती गुण मिळू शकतील याचा अंदाज येत जातो. काही वेळेला उत्साहाच्या भरात एकदम आदर्शवादी पर्याय निवडला जातो. पण तो अमलात आणण्याचा अधिकार आपल्याकडे नसू शकतो किंवा त्यातून एखादा ‘साईड इफेक्ट’ उद्भवण्याची शक्यताही असते. त्यामुळे सर्वात योग्य पण व्यवहार्य आणि उपलब्ध असल्यास दूरगामी परिणाम साधणारा पर्याय निवडणे हे २.५ गुण मिळण्यासाठी आवश्यक आहे. यासाठी सराव हिच गुरुकिल्ली आहे.

सर्वसाधारण व्यवहारज्ञान, नतिकदृष्टय़ा योग्य अयोग्य मुद्दय़ांची जाण आणि भारतीय संविधानाचे भान असल्यास कमीत कमी वेळेत हा विभाग जास्तीत जास्त गुण मिळवून देऊ शकतो. हा घटक पेपरच्या सुरुवातीला सोडवून आत्मविश्वास बळकट करायचा की शेवटच्या दहा मिनिटांत किंवा खूपच अवघड प्रश्नांमध्ये वेळ गेल्यावर ताण दूर करण्यासाठी अशा प्रश्नांनंतर सोडवायचा हे तुम्ही स्वत:च ठरवायचे आहे. पण हे प्रश्न सोडविताना मन शांत ठेवून पर्यायांचा विचार करणे आणि जास्तीत जास्त समर्पक उत्तर शोधणे शक्य करायचे असेल तर सराव आणि सरावाचे विश्लेषण यांना पर्याय नाही!

निर्णयक्षमता व व्यवस्थापन कौशल्य हा घटक हमखास गुण मिळवून देणारा घटक आहे. एकूण १२.५ गुणांसाठी ५ प्रश्न या विभागात विचारले जातात. या प्रश्नांना नकारात्मक गुण दिले जात नाहीत. त्यामुळे चांगली गुणसंख्या मिळवायची असेल तर अधिकाधिक समर्पक उत्तरे देऊन जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. या पाच प्रश्नांसाठी एकूण १० मिनिटे वापरली तर किमान ५ गुणांची आणि योग्य अभिवृत्ती विकसित केली तर १० गुणांपर्यंत नक्कीच पोचता येते.

मागील लेखाचे (४ मार्च) शीर्षक ‘उतारे-वाचन आणि आकलनाची चाचणी’ असे वाचावे. कारण राज्यसेवेच्या परीक्षेत उतारे वाचन असा घटक नसून उताऱ्यावरील प्रश्न असा घटक अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.