श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील जैवविविधता आणि पर्यावरण या घटकाची चर्चा करणार आहोत. भारत हा जगातल्या संपन्न जैवविविधता असलेल्या मोजक्या प्रदेशांपैकी एक आहे. सध्या जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्था आहे. याच्या परिणामस्वरूप भारतातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपतीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असून याचा भारतातील पर्यावरण आणि जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. याचबरोबर आधुनिकीकरणाच्या युगात नैसर्गिक साधनसंपत्तीवर मोठय़ा प्रमाणावर संकट येत आहेत. शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलाची होत असलेली तोड, नष्ट होत चाललेले वन्यजीवांचे अधिवास, जैविक संपत्तीचा अमर्याद वापर यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जैविक उत्पादने व साधनसंपत्तीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्या तसेच एकूण जैवविविधतेच्या संपत्तीवर विपरीत परिणाम होत आहे. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात खूप मोठय़ा पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागेल आणि याचे गंभीर  परिणाम जैवविविधता आणि पर्यावरण होऊ शकतात. या सर्व पैलूंचे  एकत्रित आकलन करून हा घटक समजून घ्यावा लागतो.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
Infrastructure and Real Estate Sector in Mumbai
मुंबईतील पायाभूत सुविधा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्र
Foreign investors invested more than Rs 2 lakh crore in the domestic capital market
परदेशी गुंतवणूकदारांचे दमदार पुनरागमन; सरलेल्या आर्थिक वर्षात २ लाख कोटींची गुंतवणूक

या घटकामध्ये जैवविविधता आणि पर्यावरण याचे संरक्षण, पर्यावरणीय प्रदूषण आणि होणारा ऱ्हास , पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी मुद्दे आपणाला अभ्यासावे लागणार आहेत. पर्यावरण आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास आणि या ऱ्हासासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण, नदीप्रदूषण, हवाप्रदूषण, ध्वनिप्रदूषण व यामुळे उत्पन्न झालेल्या समस्या याची तयारी करावी लागते तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, भारत सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी पास करण्यात आलेले विविध कायदे व त्यांची उपयुक्तता तसेच पर्यावरणसंबंधी करावयाचे पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन आणि हे का अनिवार्य करण्यात आलेले आहे, तसेच याची नेमकी काय उपयुक्तता आहे. यांसारख्या एकत्रित बाबींचा विचार करून या घटकाचे परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे नियोजन करावे लागणार आहे.

या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न

>   पर्यावरण संबंधित परिस्थितीची तंत्रमधील वहन क्षमता (carrying capacity)) याची परिभाषा करा. स्पष्ट करा की, कशा प्रकारे ही संकल्पना एखाद्या प्रदेशाच्या शाश्वत विकास नियोजनाच्या आकलनासाठी  महत्त्वाची आहे. (२०१९)

>   भारतात जैवविविधता कशाप्रकारे वेगवेगळी आढळून येते? वनस्पती आणि प्रजाती यांच्या संवर्धनासाठी जैविक विविधता कायदा २००२ कशाप्रकारे साहाय्यकारी आहे? (२०१८)

>    हवामान बदल ही एक जागतिक समस्या आहे. भारत हवामान बदलामुळे कशा प्रभावित होईल? हवामान बदलामुळे भारतातील हिमालयीन आणि समुद्रकिनारपट्टी असणारे राज्ये कशी प्रभावित होतील? (२०१७)

>    मोठय़ा प्रकल्पांचे नियोजन करताना मानवी वस्त्यांचे पुनर्वसन हा एक महत्त्वाचा पर्यावरणीय परिणाम आहे ज्यावर नेहमीच वादविवाद होतो. विकासाचे मोठे प्रकल्प प्रस्तावित करताना हे परिणाम सुसह्य़ करण्यासाठी सुचविलेल्या उपायांवर चर्चा करा. (२०१६)

>   नमामी गंगे आणि स्वच्छ गंगासाठीचे राष्ट्रीय मिशन (NMCG) कार्यक्रम आणि यापूर्वीच्या योजनांपासून  मिळालेल्या संमिश्र परिणामच्या कारणांवर चर्चा करा. गंगा नदीच्या संवर्धनासाठी कोणती मोठी झेप ही वाढीव योगदानाच्या अपेक्षेपेक्षा अधिक साहाय्यकारी होऊ शकते? (२०१५)

>   जरी कार्बन क्रेडिट आणि स्वच्छ विकास प्रणाली यू.एन.एफ.सी.सी.सी.च्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या असल्या तरी, यातील कार्बन क्रेडिटच्या मूल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण झालेली आहे; अशा स्थितीतही हे चालू ठेवावे का? आर्थिक वृद्धीसाठी भारताला आवश्यक असणारी  ऊर्जेची गरज या संदर्भात चर्चा करा. (२०१४)

>   अवैध्यरीत्या खाणकाम के ल्यामुळे काय परिणाम होतात? कोळसा खाणक्षेत्रासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या जा किंवा जाऊ नका (GO AND NO GO) या संकल्पनेची चर्चा करा. (२०१३)

उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारण्यात आलेले आहेत. संपूर्ण पेपर तीनचा विचार केल्यास या घटकावर  साधारणत: एक किंवा दोन प्रश्न विचारण्यात येतात. तसेच हे प्रश्न विषयाच्या पारंपरिक ज्ञानापेक्षा या घटकाशी संबंधित चालू घडामोडींचा विचार करून विचारण्यात येतात. २०२० मध्ये करोना या महामारीचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात झालेला आहे, या गोष्टीचा पर्यावरण आणि जैवविविधता यावरती कसा प्रभाव पडलेला आहे, तसेच भारत सरकारने  पर्यावरण आघात मूल्यांकन अधिसूचना २०२० जाहीर केलेली आहे या मुद्दय़ांचा  अभ्यास येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी करावा लागणार आहे. यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.  या घटकाच्या  पारंपरिक ज्ञानाची व्याप्ती अधिक विस्तृत आहे, पण उपरोक्त प्रश्नाचे विश्लेषण केल्यास आपणाला या घटकाचा अभ्यास नेमक्या कोणत्या पद्धतीने करावा याची दिशा मिळते. वरील प्रश्नामध्ये संकल्पना, तसेच संबंधित कार्यक्रम आणि त्यापासून झालेला फायदा आणि त्यांची जैवविविधता आणि पर्यावरण याचे संवर्धन करण्यासाठीची उपयुक्तता यांसारख्या पैलूंचा मुखत्वे विचार केलेला दिसून येतो. तसे या घटकाचे स्वरूप सायंटिफिक पद्धतीचे आहे आणि यात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पनाची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे.

या  घटकासाठी  एन.सी.ई.आर.टी.ची  पर्यावरणसंबंधित पुस्तके वाचावीत.  बाजारात या घटकासाठी अनेक गाईड्स स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत यातील जे पुस्तक सोप्या पद्धतीने या घटकाची माहिती देईल, असे कोणतेही पुस्तक वाचावे.  याच्या जोडीला  इंडिया ईअर बुकमधील पर्यावरणाचे प्रकरण याचाही अभ्यास करावा. चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी ‘द हिंदू’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ ही इंग्रजी दैनिके, ‘योजना’, ‘कुरुक्षेत्र’ आणि ‘डाऊन टू अर्थ’ ही मासिके, तसेच पर्यावरण आणि वन मंत्रालय, जैवविविधता प्राधिकरण यांच्या संके तस्थळांचा वापर करावा आणि याच्या जोडीला भारत सरकारच्या  आर्थिक पाहणी अहवालातील जागतिक तापमानवाढ आणि शाश्वत विकास हे प्रकरण अभ्यासावे.