श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ या मुख्य घटकातील ‘प्राचीन भारत’ या उपघटकाची पूर्व परीक्षेसाठी तयारी कशी करावी, यावर चर्चा करणार आहोत. या घटकावर २०११ ते २०१९ मध्ये एकूण थेट २५ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यातील बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड यावर सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या विश्लेषणामध्ये कला आणि संस्कृती संबंधित प्रश्न ग्रा धरलेले नाहीत.

मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांचे स्वरूप

* २०१९ मध्ये राजा अशोक असा उल्लेख असणारे शिलालेख, बौद्ध धर्मातील महायान पंथ, गुप्त काळातील विष्टी हा प्रकार काय होता, हडप्पा संस्कृतीतील ठिकाणे इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आले आहेत.

* २०१८ मध्ये भारतातील धार्मिक प्रथांच्या संदर्भात ‘स्थानकवाशी’ संप्रदायाचा संबंध कशाशी आहे? हा प्रश्न विचारण्यात आलेला होता व यासाठी बौद्ध धर्म, जैन धर्म, वैष्णव धर्म आणि शैव धर्म हे चार पर्याय देण्यात आलेले होते.

* २०१७ मध्ये भारताच्या धार्मिक इतिहासाच्या संदर्भात खालील विधाने ग्रा धरा व यासाठी अनुक्रमे सौत्रान्तिका आणि सम्मितीय (Sautrantika and Sammitiya) हे जैन धर्माचे संप्रदाय होते. (विधान पहिले) आणि सर्वस्तीवादिन (Sarvastivadin) यांचे असे मत होते की आविष्काराचे घटक (constituents of phenomena) हे पूर्णत: क्षणिक नाहीत पण ते सदैव अव्यक्त स्वरूपात अस्तित्वात असतात. (विधान दुसरे)आणि यापैकी कुठले विधान/विधाने योग्य आहे/आहेत, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

* २०१६ मध्ये सर्वप्रथम अशोकाच्या शिलालेखाची उकल कोणी केली आणि यासाठी जॉर्ज बुहलर, जेम्स प्रिन्सिप, मॅक्स मुल्लर आणि विल्लिअम जोनेस असे चार पर्याय दिलेले होते. याव्यतिरिक्त प्राचीन भारतातील श्रेणी व्यवस्था, परकीय प्रवेशाद्वारे प्राचीन भारताचे केलेले वर्णन यासारख्या बाबींवरही प्रश्न विचारण्यात आलेले होते.

* २०१३ मध्ये बौद्ध धर्माशी संबंधित निर्वाण या संकल्पनेवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. खालीलपैकी कोणत्या गणराज्याचा बौद्ध जीवनाशी संबंध होता? आणि यासाठी अवंती, गांधार, कोशल आणि मगध असे चार पर्याय होते. हाच प्रश्न २०१४ आणि २०१५मध्ये लागोपाठ विचारण्यात आलेला होता.

वैदिक संस्कृतीवर २०१२ मध्ये प्रारंभीच्या वैदिक आर्याचा धर्म कोणता होता, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता. तसेच याच परीक्षेमध्ये प्राचीन भारताच्या संदर्भानुसार जैन व बौद्ध धर्म यांना काय एकसारखे होते? दु:ख आणि आनंद या दोन्ही भावनांचा अव्हेर, वेदांबाबत अनास्था अथवा विरक्ती आणि कर्मकांडाचे महत्त्व अमान्य, असे तीन पर्याय दिलेले होते.

२०११च्या परीक्षेमध्ये सिंधू अथवा हडप्पा संस्कृतीवर दोन विधाने देऊन प्रश्न विचारण्यात आलेला होता. यातील पहिले विधान धार्मिक गोष्टीचे अस्तित्व असूनही एक धर्मनिरपेक्ष संस्कृती होती आणि दुसरे विधान या काळात कापूस वस्त्र निर्मितीसाठी वापरले जात होते, असे होते.

उपरोक्त नमूद केलेल्या काही गतवर्षीच्या प्रश्न विश्लेषणावरून या विषयाची तयारी कशी करावी याची एक स्पष्ट दिशा आपणाला निर्धारित करता येते. यातील बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड यावर सर्वाधिक प्रश्न विचारले गेलेले आहेत. यातील जवळपास सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत. प्राचीन भारताचा अभ्यास करताना याचे विविध टप्प्यांनुसार अथवा कालखंडानुसार विभागणी करून संबंधित कालखंडातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींचे व्यवस्थित आकलन करणे गरजेचे आहे. या विषयाची एक व्यापक समज तयार करून अचूक पद्धतीने अभ्यास करावा लागतो. या विषयावर सर्वसाधारणपणे कमी प्रश्न विचारले जातात, हे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून दिसून येते त्यामुळे या विषयाची तयारी करण्यासाठी किती वेळ द्यावा हे आधीच निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच याची तयारी आपण फक्त पूर्व परीक्षेसाठी करत असतो म्हणून पहिल्या प्रथम या विषयाचा सर्वागिण अभ्यास करून स्वत: काढलेल्या टिपणांची वारंवार उजळणी करणे गरजेचे आहे. या घटकावर तुलनेने कमी प्रश्न विचारले जात असले तरी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न अचूक सोडविणे गरजेचे आहे.

या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा. या घटकाचे स्वरूप हे पारंपरिक असल्यामुळे अचूक माहिती अभ्यासणे गरजेचे आहे. आपणाला एनसीईआरटीची इयत्ता ८वी ते १२वीची इतिहासाची पुस्तके वाचावी लागतात ज्यामध्ये विशेषकरून इयत्ता १२वीचे Themes in Indian History part- I हे पुस्तक वाचावे लागते. तसेच आर. एस. शर्मा लिखित प्राचीन भारत यावरील एनसीईआरटीचे जुने पुस्तक वाचणे आवश्यक आहे. शिवाय Early India (रोमिला थापर) आणि A History of Ancient and Early Medieval India (उपेंद्र सिंग) या पुस्तकांचा अभ्यास करणे उपयुक्त ठरेल.