एम.बी.ए. अभ्यासक्रमासंदर्भात र्सवकष माहिती देणारे पाक्षिक सदर सुरू करत आहोत. एम.बी.ए.च्या प्रवेशपरीक्षा, विविध विद्याशाखा, विषयांचे स्वरूप, अभ्यासाची तयारी याबाबतची माहिती यात प्रसिद्ध होईल. सदराच्या प्रारंभीच्या भागात यंदाच्या प्रवेशपरीक्षेचे स्वरूप नेमके कसे असेल, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे, हा प्रश्न अनेकांना पडत असतो. आजच्या काळामध्ये पदवीनंतर विविध विद्याशाखांमध्ये नवनवे आणि उत्तम असे पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांची माहिती करून घेऊन त्या त्या क्षेत्रामध्ये चांगले करिअर करणे शक्य असते. एम.बी.ए. हा पदवीनंतर असणारा दोन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्या करिअरला चांगली दिशा देता येते. मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायला हवे की, केवळ या अभ्यासक्रमाची पदवी संपादन केली म्हणून चांगले करिअर होते असे नाही तर अभ्यासक्रम योग्य प्रकारे पूर्ण करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना कोणत्या प्रकारची तयारी आवश्यक आहे, या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया कशी आहे, इ. गोष्टींची माहिती करून घेणे हेही तितकेच आवश्यक आहे. याचाच अर्थ असा की एम.बी.ए. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करायचा असेल तर त्याची सुरुवातीपासूनच तयारी असणे आवश्यक आहे. या दृष्टीने आजचा लेख बेतलेला आहे. यात एम.बी.ए.ला प्रवेश घेण्यासाठी कुठली तयारी करावी लागेल, याचा विचार या लेखामध्ये करण्यात आला आहे.
एम.बी.ए. अभ्यासक्रम हे व्यवस्थापन क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याचे प्रवेशद्वार आहे. हा व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यामुळे अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांना संबंधित प्रवेशप्रक्रियेमधून जावे लागते. या प्रवेशप्रक्रियेचे नियंत्रण आपल्या राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत केले जाते. या संचालनालयाच्या वतीने दिनांक १७.१०.२०१३ रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकाप्रमाणे (परिपत्रक क्र. २३१) एडीएम/२०१३/१४०६) २०१४-१५ मध्ये एम.बी.ए./ एम.एम.एस. (मुंबई विद्यापीठामध्ये एम.एम.एस. हा व्यवस्थापन क्षेत्रातील दोन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. इतर विद्यापीठांत पदवीचे नाव एम.बी.ए. आहे.) या अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्य सरकारच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेशपरीक्षेद्वारे करण्यात येणार आहेत. या प्रवेशपरीक्षेमधून शासकीय व अनुदानित संस्थांमधील ८५ टक्के व विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक दर्जाच्या संस्थांमधील ६५ टक्के जागा भरल्या जाणार आहेत.
१५ टक्के जागा या अखिल भारतीय कोटय़ातून भरण्यात येतील. या १५ टक्के जागांसाठी CAT/ JMET/ MAT/ ATMA/ XAT/ CMAT यापैकी कोणत्याही एका परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्यात येतील.
राज्य सरकारतर्फे घेतली जाणारी सामायिक प्रवेश परीक्षा यावर्षी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. ही परीक्षा शनिवार, १५ मार्च २०१४ व रविवार, १६ मार्च २०१४ या दोन दिवशी घेतली जाईल. यासंबंधीचे खुलासेवार वेळापत्रक तसेच परीक्षा केंद्रे अद्याप जाहीर झालेली नाहीत. त्याचप्रमाणे परीक्षेस बसण्यासाठी अर्ज करण्याची तारीख व मुदत अद्याप जाहीर झालेली नाही. ही माहिती  लवकरच जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.
या प्रवेश परीक्षेचे स्वरूप मात्र जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा संपूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह अर्थात बहुपर्यायी स्वरूपाची असून विद्यार्थी-विद्याíथनींना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेल्या पर्यायांमधून द्यायचे आहे. एकूण २०० प्रश्न या परीक्षेत विचारले जाणार आहेत आणि त्यासाठी अडीच तासांचा वेळ देण्यात आलेला आहे. प्रत्येक बरोबर उत्तराला १ गुण आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने समाधानाची बाब म्हणजे चुकीच्या उत्तराला उणे गुण (निगेटिव्ह मार्किंग) दिले जाणार नाहीत. त्यामुळे एखादे उत्तर चुकले तरी गुण वजा होण्याची शक्यता नाही.
प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तीन भागांवर प्रश्न विचारले जातील. यातील पहिला भाग म्हणजे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाची चाचणी. यामध्ये Verbal Ability आणि Reading Comprehension याविषयक प्रश्नांचा समावेश असेल. यामध्ये इंग्लिश व्याकरण, वाक्य पूर्ण करणे, शाब्दिक क्षमता, समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द, परिच्छेद वाचून उत्तरे लिहिणे इ.चा समावेश होतो. तसेच योग्य शब्दांचा वापर वाक्प्रचारांचा वापर इ. मुद्दय़ांचाही समावेश होतो. इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी या प्रश्नांचा वापर या ठिकाणी केलेला आहे. नियमित सरावाने या भागाची तयारी चांगल्या पद्धतीने करता येईल.
प्रश्नपत्रिकेचा दुसरा भाग म्हणजे तुमची गणितीय क्षमता. अर्थात गणितीय क्षमता म्हणजे नुसतेच अंकगणित नसून वेगवेगळय़ा प्रक्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, टक्केवारी काढणे, गुणोत्तर काढणे, (Ratio and proportion) इ. सर्व गोष्टींमधील तुमचे प्रावीण्य मोजण्यासाठी विविध प्रश्न विचारले जातील. याशिवाय वेगवेगळय़ा आकडेवारीचे विश्लेषण, आलेखांचे विश्लेषण इ. बाबतही प्रश्न विचारले जातील. तिसऱ्या भागामध्ये लॉजिकल/ अ‍ॅबस्ट्रॅक्ट रिझनिंग यावर प्रश्न असतील. यामध्ये परीक्षार्थी किती कमी वेळामध्ये विचार करू शकतात, याची चाचणी होते. यामध्ये आकडेवारी तसेच विविध आकृत्यांवर आधारित प्रश्न असू शकतील.
सारांश, या प्रवेशपरीक्षेमध्ये तुमच्या कौशल्याची तसेच कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेची परीक्षा होईल. १५० मिनिटांच्या कालावधीमध्ये २०० प्रश्न सोडवणे हे एक आव्हान आहे. हे आव्हान यशस्वीपणे पेलणे शक्य आहे. मात्र त्यासाठी पाहिजे पुरेसा सराव व जिद्द. या दोन्ही गोष्टी असतील तर प्रवेश परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवणे अवघड नाही. प्रवेश परीक्षेची तयारी कशी करावी, याचा विचार पुढील लेखामध्ये करू.                                            
nmvechalekar@yahoo.co.in