या लेखात आपण २५ मे रोजी झालेल्या यूपीएससी पूर्वपरीक्षा २०२५ च्या जीएस पेपरचे विश्लेषण बघणार आहोत. यूपीएससी ही दरवर्षी आपल्यासाठी काही विशेष ‘सरप्राइज’ घेऊन येते. या वर्षी ३-३ विधानांच्या प्रश्नांचा पाऊस आयोगाने पाडला व त्याच बरोबर अर्थशास्त्रात गणितेही विचारली. पण आयोगाला समजून घेणाऱ्या उमेदवारांसाठी हे नवीन नाही. ते शांतपणे या परीक्षेला नक्कीच सामोरे गेले असणार. जानेवारी २०२५ पासून यूपीएससीची तयारी या सदरात आपण जे लेख घेऊन आलो त्यातील ट्रेंड व अपेक्षित प्रश्नही आपल्याला या पेपरमध्ये दिसून आले.

जीएसपेपरमधील १०० प्रश्नांचे विषयानुसार वर्गीकरण

विषय                   १०० पैकी प्रश्नसंख्या

अर्थशास्त्र                                                  १६

भारतीय राज्यघटना                                १५

भूगोल                                                      १५

पर्यावरण                                                    ११

आधुनिक भारताचा इतिहास                         ७

प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास      ९

विज्ञान व तंत्रज्ञान                                      १६

चालू घडामोडी                                              ९

शासकीय योजना                                            २

जीएस पेपर मधील प्रमुख निरीक्षणे:

वेळखाऊ पेपर: या पेपरमधील प्रश्न हे लांबलचक होते. त्यामुळे उमेदवारांना त्यांचा वेळ प्रभावीपणे व्यवस्थापित करावा लागला. बहुतेक विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन करण्यात आले नाही त्यामुळे त्यांचा अटेम्प्ट कमी झाला.

संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर:

पेपरमध्ये संकल्पनात्मक स्पष्टता आणि विश्लेषणात्मक कौशल्यांवर भर देण्यात आला, ज्यामुळे उमेदवारांना त्यांचे ज्ञान व्यावहारिक परिस्थितीत लागू करावे लागले. अशा वेळी संयम ठेवून मानसिकरित्या उमेदवार स्थिर असणे अपेक्षित असते. विचारपूर्वक प्रश्नांना सामोरे जावे लागते. संकल्पनात्मक खोलीमुळे बहुतेक प्रश्न सोडविण्यासाठी सोपे राहत नाहीत.

उपयोजित प्रश्नांची संख्या अधिक:

राज्यघटना, अर्थशास्त्र व विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील अनेक प्रश्न हे उपयोजित (अप्लाइड) होते. ज्यामुळे उमेदवारांना त्यांचे ज्ञान वास्तविक-जगातील परिस्थितींमध्ये लागू करावे लागले. उदा. अर्थशास्त्रातील खालील प्रश्न बघा –

प्र. समजा महसूल खर्च ८०,००० कोटी आहे आणि सरकारच्या महसुली प्राप्ती ६०,००० कोटी आहेत. सरकारी अर्थसंकल्पात १०,००० कोटींचे कर्ज आणि ६,००० कोटींचे व्याज देयके देखील दाखवली आहेत. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

I. महसूल तूट २०,००० कोटी आहे.

II. राजकोषीय तूट १०,००० कोटी आहे.

III. प्राथमिक तूट ४,००० कोटी आहे.

खाली दिलेल्या कोडचा वापर करून योग्य उत्तर निवडा.

(अ) फक्त I आणि II

(ब) फक्त II आणि III

(क) फक्त I आणि III

(ड) फक्त I, II आणि III

आजवर आयोगाने केवळ संकल्पना विचारल्या होत्या परंतु आता आयोगाने त्यावरील वरीलप्रमाणे गणित विचारले. प्रश्न तसा सोपा आहे परंतु अचानक असे प्रश्न समोर आले की बहुतेक उमेदवार घाबरतात.

गतवर्षीच्या प्रश्नांचे महत्त्व

यूपीएससीमध्ये गतवर्षीच्या प्रश्नांचे महत्त्व ट्रेंड समजून घेण्यासाठी तर आहेच परंतु कधीकधी गतवर्षीचे प्रश्न जसेच्या तसे विचारले जातात. तसाच हा एक प्रश्न या वर्षीही विचारला गेला.

प्र. ‘अरघट्टा’ नावाचे सिंचन उपकरण होते त्याचे वर्णन ओळखा –

(अ) पुलीवरून ओढलेली चामड्याची पाण्याची पिशवी.

(ब) मातीचे भांडे असलेले एक मोठे चाक ज्याच्या स्पोकच्या बाहेरील टोकांना बांधलेले असते.

(क) बैलांनी चालवलेले एक मोठे मातीचे भांडे.

(ड) दोरीने थेट हाताने वर खेचलेली मोठी पाण्याची बादली.

वरील प्रश्न यूपीएससीने २०१६ मध्ये विचारला होता. तसेच हा प्रश्न २०१३ मध्ये उत्तराखंड लोकसेवा आयोगाने देखील विचारलेला आहे.

नवीन प्रश्न पद्धती : आजवर विधानांचे प्रश्न विचारताना आयोग दोन विधानांच्या आधारे प्रश्न विचारत असे परंतु २०२५ मध्ये मात्र तीन विधानांचा वापर करून प्रश्न विचारण्याकडे आयोगाचा ओघ दिसून आला. या प्रश्नांची मांडणी खालीलप्रमाणे होती.

प्र. खालील विधाने विचारात घ्या:

विधान १: वर्तुळाकार अर्थव्यवस्था हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करते.

विधान २: वर्तुळाकार अर्थव्यवस्था कच्च्या मालाचा इनपुट म्हणून वापर कमी करते.

विधान ३: वर्तुळाकार अर्थव्यवस्था उत्पादन प्रक्रियेतील अपव्यय कमी करते.

वरील विधानांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर आहे?

(अ) विधान २ आणि विधान ३ दोन्ही बरोबर आहेत आणि ते दोन्ही विधान १ चे स्पष्टीकरण देतात.

(ब) विधान २ आणि विधान ३ दोन्ही बरोबर आहेत परंतु त्यापैकी फक्त एक विधान १ चे स्पष्टीकरण देते.

(क) विधान २ आणि ३ पैकी फक्त एकच बरोबर आहे आणि ते विधान १ चे स्पष्टीकरण देते.

(ड) विधान २ किंवा विधान ३ दोन्ही बरोबर नाहीत.

असे प्रश्न सोपे वा कठीणपेक्षा वेळखाऊ अधिक असतात.

एलिमिनेशन तंत्र : आयोगाद्वारे असेही काही प्रश्न विचारण्यात आले ज्यात या तंत्राचा वापर प्रभावीपणे करता येवू शकत होता. ज्यात एखादे विधान हे चुकीचे असून ते पर्यायात तीनही ठिकाणी आहे. उदा. जागतिक बँकेचा प्रश्न वा वित्त आयोगाचा प्रश्न होय.

कट-ऑफ : रिक्त पदांच्या संख्येत घट झाल्यामुळे, यूपीएससी प्रिलिम्स २०२५ साठी कट-ऑफ गतवर्षीपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे.

या बाबी लक्षात घेतल्यास परीक्षेचा अभ्यास करताना संकल्पना समजून त्यासंबंधीचे अधिकचे प्रश्न तुम्ही सोडविणे अपेक्षित आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करण्यात अडचण येते त्यांनी वेळेचे नियोजन करण्यावर भर द्यायला हवा. अशा परीक्षेसाठी व्यापक आणि सुव्यवस्थित तयारीची आवश्यकता असते हे आयोग आपणास नियमितपणे जाणीव करून देत असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sushilbari10@gmail.com