डॉ. मिलिंद आपटे
माझी मुलगी सध्या आयसीएसई शाळेत दहावीत आहे. तिचे विज्ञान चांगले आहे, विशेषत: जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र. जर तिचे गणित चांगले नसेल तर शाळेनंतर तिच्यासाठी वैद्यकीय शिवाय अन्य कोणते पर्याय आहेत? अभियोग्यता चाचणी (अॅप्टिटय़ूड टेस्ट)ने फायदा होईल का? – ज्ञानेश्वर काकडे
– मी स्वत: अभियोग्यता चाचणी (अॅप्टिटय़ूड टेस्ट) ला महत्त्व देतो. त्यातून नक्कीच योग्यता कळते, त्या पर्यायाचा उपयोग करावा. जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय जास्त संशोधनाकडे जातात पण व्यावसायिक अभ्यासक्रम मध्ये वैद्यकीय, बीव्हीएससी, शेती विषयक अभ्यासक्रम, औषधी शास्त्र, व इतर पॅरामेडिकल असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
२) नमस्कार, माझा मुलगा सध्या दहावीला आहे. त्याला गणित व भौतिकशास्त्र आवडते. या विषयांमध्ये तो शाळेत नेहमी प्रथमसुद्धा येतो. त्याला पुढे जाऊन इंजिनिअरिंग करण्याची इच्छा आहे. पण सध्या इंजिनीअर झालेल्या मुलांना चांगल्या नोकऱ्या अभावाने मिळतात. पुढे जाऊन एमबीए / मास्टर्स करावेच लागते. इंजिनीअरिंगचे विषय सोडून भलत्याच विषयांमध्ये एमबीए / पीजी केले जाते. माझा प्रश्न असा आहे की चार वर्षे भरपूर अभ्यास करून मिळवलेली इंजिनीअरिंगची पदवी खरंच व्यर्थ ठरते का? बीई/ बीटेक करावे तर कोणत्या शाखेत करावे, याचे कृपया मार्गदर्शन करावे. – अमोल मोरे
– इंजिनीअरिंगबद्दल आपले बरेच गैरसमज दिसत आहेत. एकेक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो
१) पण सध्या इंजिनीअर झालेल्या मुलांना चांगल्या नोकऱ्या अभावाने मिळतात. — चांगल्या कॉलेज मधून चांगल्या गुणांनी चांगली इंटर्नशिप, खरेखुरे प्रोजेक्ट करणाऱ्यांना उत्तम संधी मिळतात.
२) पुढे जाऊन एमबीए / मास्टर्स करावेच लागते– चांगल्या इंजिनीअरला गरजेचे नाही. कोणत्या वर्क प्रोफाइलमध्ये जायचे यावर अवलंबून आहे. तरुणांना खरे इंजिनीअरिंग फॅक्टरीमध्ये जावून करायचे नसल्याने हा उपाय काढण्यात येत आहे.
३) इंजिनीअरिंगचे विषय सोडून भलत्याच विषयांमध्ये एमबीए / पीजी केले जाते. — इंजिनीअर झाल्यावर उपरती होते की मी इंजिनीअर नाही म्हणून हा मार्ग निवडण्यात येतो
४) इंजिनीअरिंगचे विषय सोडून भलत्याच विषयांमध्ये एमबीए / पीजी केले जाते– हरकत नाही. सप्लाय चैन मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, फायनान्स , इनवेस्टमेंट बँकिंग , मार्केटिंग वगैरे मध्ये एमबीए करून हा मार्ग निवडणे चूक नाही
५) चार वर्षे भरपूर अभ्यास करून मिळवलेली इंजिनीअरिंगची पदवी खरंच व्यर्थ ठरते का?– नाही. इंजिनीअरिंग हे केवळ विषयाचे शिक्षण नाही किंवा त्या विषयाची माहिती नाही तर त्यातून एक विचार करण्याची वृत्ती प्रगत होते जी त्या व्यक्तिला जास्त तार्किक आणि विश्लेषण करण्यास बाध्य करते, अर्थातच ही वृत्ती कोणत्याही व्यवसायास गरजेची असते, म्हणून हे व्यक्तिमत्व बहुतेक व्यवसायांमध्ये यशस्वी होते, त्यामुळे इंजिनीअर म्हणजे फक्त शिक्षण नसून एक वैचारिक वृत्तीचा विकास समजावा.
६) बीई/ बीटेक कोणत्या शाखेत करावे– त्यासाठी विद्यार्थ्याच्या अभिक्षमता समजून घेणे गरजेचे आहे, त्याच्या क्षमतेनुसार निर्णय घ्यावा. खूप शुभेच्छा