मागील लेखामध्ये आम्ही म्हटलं होतं की प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये होणाऱ्या गमती-जमतींबद्दल पुढच्या लेखात काही उदाहरणे पाहू. त्यानुसार आजच्या लेखात बोर्ड सदस्य काहीवेळा कसे गमतीशीर, गोंधळात टाकणारे, आपली सजगता आणि सावधपणा आजमावणारे प्रश्न विचारतात याबद्दल आम्ही लिहिणार आहोत.
गेली अनेक वर्षे आम्ही नागरी सेवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मार्गदर्शन करत आहोत. त्यातून प्रत्यक्ष मुलाखतीत काय आणि कसे प्रश्न विचारले जातात याबद्दल खूप मोठा डेटा आमच्याकडे तयार झाला आहे. त्यातल्याच काही रंजक गोष्टी आजच्या लेखात मांडत आहोत. तत्पूर्वी भारतीय वन सेवेचा २०२४ च्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा टक्का निश्चितच वाढला आहे. १४३ जणांच्या निवड यादीत १८ मराठी उमेदवार आहेत. ३०० गुणांच्या भारतीय वन सेवा परीक्षेच्या मुलाखतीमध्ये २३१ गुणांचा प्रथम क्रमांक रँक १२ ला, २३० हे द्वितीय क्रमांकाचे गुण येङ्गुरी ऐश्वर्या (रँक १३ ) या आम्ही मार्गदर्शन केलेल्या उमेदवाराने संपादन केले आहेत. या वर्षी भारतीय वन सेवा परीक्षेत आनंद खंडेलवाल (रँक २) आणि सिद्धार्थ जैन (रँक ४) हे दोघे मराठी विद्यार्थी आहेत. मागील वर्षी देखील प्रतीक्षा काळे (रँक २) व शिरीन पंडित (रँक ४) हे मराठी उमेदवार होते. भारतीय वन सेवेतील मराठी वाढीव टक्का निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.
व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये अचानक समोर आलेल्या प्रश्नाला किंवा समस्येला तुम्ही कसे तोंड देता हे पाहिले जाते. एकदा एका उमेदवाराला बोर्ड सदस्याने सांगितले, ह्यया रूमची खिडकी उघडा’. उमेदवाराने तत्परतेने जाऊन खिडकी उघडली. त्यानंतर सदस्यांनी म्हटले, ह्यआता उडी मारा’… अशा या प्रसंगात, उमेदवार कशा पद्धतीने प्रतिक्रिया देऊ शकतो? उमेदवार मुळातच ताणाखाली असेल तर तो अशा सूचनेने आणखीनच गोंधळून जाईल. त्याला काय करावं हेच कळणार नाही. तो सदस्यांकडे गोंधळून बघेल किंवा , ह्यमाफ करा सर, मला काही समजलं नाही’ असं काहीतरी म्हणेल. उमेदवार जर शांतचित्ताने विचार करत असेल तर त्याच्या लक्षात येईल की उडी मारायला सांगितली आहे, खिडकीतून बाहेर उडी मार असं सांगितलेलं नाही, त्यामुळे जागच्या जागीच उडी मारावयाची आहे.
एका उमेदवाराला एकदा सदस्यांनी , ‘’ Life is not a tempest but comedy of errors so live it as you like it ‘’ हे काय आहे असा प्रश्न विचारला. उमेदवाराने सुरुवात केली, ‘’आयुष्य जसं आपल्यासमोर येईल तसं, आपल्याला हवं तसं जगावं ‘’ यावर सदस्यांनी काय प्रतिक्रिया दिली? सदस्य म्हणाले, ‘’हा तर या विधानाचा अर्थ सांगितला तुम्ही. मी विचारलं, हे काय आहे? ‘’ शेक्सपियरच्या मिडसमर नाईट्स ड्रीम या नाटकातलं हे विधान होतं. प्रश्न खरंतर सरळ होता पण आपण असाच विचार करतो की एखादं विधान आपल्याला सांगितलं म्हणजे त्याचा अर्थच विचारला असणार.
या लेखमालेतील सहलेखक महेश भागवत यांना तर १९९५ च्या यूपीएससीच्या त्यांच्या व्यक्तिमत्त्व चाचणी परीक्षेत एक वेगळाच अनुभव आला. मराठी भाषेतून मुलाखत देणारे उमेदवार हे एकाच दिवशी बोलावले होते. महेश भागवत जेव्हा उमेदवार म्हणून मुलाखतीसाठी गेले तेव्हा त्यांना सुरुवातीला विचारलेले ४ ते ५ प्रश्न नंतरच्या उमेदवाराच्या ऊआ (डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म) शी निगडित होते आणि तो उमेदवार महेश भागवत यांचा मित्र असल्याने त्यांना ते लक्षात आले. त्यांनी डोके शांत ठेवत त्वरित पॅनेलला मुलाखतीदरम्यानच पॅनलकडून होत असलेली चूक निदर्शनास आणून दिली आणि तद्नंतर नव्याने मुलाखत सुरू झाली.
या पुढच्या लेखांमधून व्यक्तिमत्त्व चाचणीच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल माहिती घेतच राहू.
देवानंद तेलगोटे याची जिद्द
● २०२१ साली कोविडमुळे यूपीएससीने काही उमेदवारांच्या मुलाखती झाल्यानंतर उर्वरित मुलाखती साधारणत: तीन महिन्यानंतर घ्यायच्या ठरवल्या. देवानंद तेलगोटे हा अकोला जिल्यातील तेल्हारा गावचा विद्यार्थी कोविड लागण झाल्यामुळे दिल्लीवरून अकोल्यात घरी परतला, पण त्याची प्रकृती खालावली आणि ८० फुफ्फुस निकामे झाल्याने त्याला हवाई रुग्णवाहिकेद्वारे अकोल्यावरून हैद्राबादच्या किम्स रुग्णालयात दाखल केले गेले.
चार महिने Ecmo मशीन द्वारे उपचार केले. दोन वेळा हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला, पण या सर्वांवर देवानंदने मात केली.
● यूपीएससीने ऑगस्ट मध्ये मुलाखती पुन्हा सुरू केल्या पण प्रत्यक्ष दिल्लीला विमानाने वा रेल्वे रुग्णवाहिकेने प्रवास करत मुलाखतीसाठी उपस्थित राहणे देवानंदला शक्य नव्हते. तसे यूपीएससीला कळविल्यानंतर प्रथमच यूपीएससी ने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्यक्तिमत्त्व चाचणी घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला पण त्यासाठी किमान काही वेळ उमेदवाराला बोलता यावे यासाठी वैद्याकीय तपासणी केली असता देवानंद तेलगोटेची शारीरिक क्षमता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मुलाखतीला सामोरे जाण्याची नसल्याचे निष्पन्न झाले. शेवटी ‘सर सलामत तो पगडी पचास’ म्हणत या मुलाखती ला हजर न होण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यानंतर चिकाटीने यूपीएससीच्या सिव्हिल सर्विसेस आणि भारतीय वन सेवेची तयारी देवानंदने सुरू ठेवली आणि २०२४ च्या भारतीय वन सेवा परीक्षेत ११२ रँक संपादन करून विजय मिळवला.
● देवानंद तेलगोटे च्या जिद्दीला निश्चितच सलाम करायला हवा. हैद्राबादच्या उपचारासाठी आणि मुलाखत मार्गदर्शनासाठी हैद्राबाद स्थित तेलंगणा राज्याचे (मूळ गाव पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र ) अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश मुरलीधर भागवत यांच्या मदतीचा देवानंद तेलगोटे याने आवर्जून उल्लेख केला आहे. आम्हाला एका गोष्टीचा विशेष आनंद आणि अभिमान वाटतो आहे.
mmbips@gmail.com , supsdk@gmail.com