UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

१) दिल्लीत स्वित्झर्लंडच्या महिलेचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये स्वित्झर्लंडची नागरिक असलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेचे नाव नीना बर्जर (३०) असून तिचा मृतदेह पश्चिम दिल्लीमधील एमसीडी शाळेच्या परिसरात आढळला. मृतदेह आढळला तेव्हा या महिलेचे हात आणि पाय बांधलेले होते. तसेच तिच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा होत्या.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषयी यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील शासन धोरण या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोणत्याही परदेशी व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पोलिस तपास कसा करतात? त्यासाठी काय नियम असतात? यासंदर्भातील माहिती असणे गरजेचं आहे.

तुमच्या माहितीसाठी :

जर एखाद्या परदेशी नागरिकाने आत्महत्या केली असेल किंवा त्याची हत्या झाली असेल तर अशा प्रकरणांत तपास करण्याची एक निश्चित प्रक्रिया असते. सर्वप्रथम मृत्यू झालेल्या व्यक्तीची पासपोर्टच्या मदतीने ओळख पटवण्याचा पोलिस प्रयत्न करतात. त्यानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यासाठी संबंधित देशाच्या दूतावासाशी संपर्क साधला जातो.

दूतावासाकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जातो. तसेच मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी कुटुंबीयांना भारतात बोलावले जाते. मृत व्यक्तीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचीही कुटुंबीयांकडून परवानगी घेतली जाते. शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाणपत्र, शवविच्छेदनाचा अहवाल, अंत्यसंस्कार केल्याचे प्रमाणपत्र, पोलिसांनी तपास केलेली कागदपत्रे अशा सर्व माहितीच्या आधारे संबंधित देशाच्या दूतावासाकडून मृत्यूसंदर्भात एक अहवाल तयार केला जातो.

मृत व्यक्तीचे नातेवाईक जोपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह जपून ठेवला जातो. मृतदेहाची ओळख पटावी यासाठी पोलिस काही आठवडे वाट पाहतात. मृतदेहाची ओळख पटावी यासाठी पोलिस नोटीस जारी करतात. मात्र, शेवटपर्यंत मृतदेहाची ओळख पटू न शकल्यास तपास अधिकाऱ्याच्या समक्ष नियमानुसार मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) वाघांच्या मृत्यूची वाढती संख्या

महाराष्ट्रात गेल्या १० महिन्यांत ४२ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक महिन्याच्या बछड्यांपासून प्रौढ वाघांचाही समावेश आहे. नुकताच गडचिरोलीतील चातगाव वनपरिक्षेत्रातील अमीरगा परिसरात जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शामुळे वाघाचा मृत्यू झाला. तर मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या बफर झोनमधील परतवाडा विभागातील सुसर्डा वनक्षेत्रात वाघ मृतावस्थेत आढळून आला.

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर ३ मधील पर्यावरण आणि जैवविविधता या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

२०२३च्या पहिल्या दहा महिन्यांत देशात १५०हून अधिक वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही ४० पेक्षा अधिक वाघ मृत्युमुखी पडले आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरील आकडेवारी मात्र वेगळेच चित्र दाखवत आहे. या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार देशात आणि महाराष्ट्रात अनुक्रमे १४८ आणि ३२ वाघांचा मृत्यूची नोंद आहे. जागतिक व्याघ्रदिनी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार वाघांच्या संख्येत महाराष्ट्र ४४४ वाघांसह चौथ्या क्रमांकावर आहे, पण मृत्यूचा विचार केला तर महाराष्ट्रात वाघांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

मानव-वन्यजीव संघर्षाचा आलेख राज्यात कमी होण्यास तयार नाही. याउलट वीजप्रवाह, विषप्रयोग यांसारखी कारणे आणि शिकारीचे धोके वाढत आहेत. त्यामुळे भारतातील वाघांच्या संख्येवर त्याचा परिणाम होण्याची वन्यजीव अभ्यासकांच्या वर्तुळात व्यक्त केली जाणारी भीती खरी ठरू पाहात आहे. याशिवाय व्याघ्र प्रकल्पाच्या बफर आणि कॉरिडॉरमध्ये येणाऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असून हे अडथळे देखील वाघांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहेत.

यासंदर्भातील इतर महत्त्वाचे लेख :

३) इस्रायल-हमास युद्धावरील ठरावावर भारताची तटस्थ भूमिका

इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये हे युद्ध शमविण्यासाठी ठराव मांडण्यात आला होता. या ठरावाच्या बाजूने तब्बल १२० देशांनी कौल दिला, तर इस्रायल-अमेरिकेसह १४ देशांनी ठरावाविरोधात मतदान केले. तसेच भारतासह ४५ सदस्य तटस्थ राहिले.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना याबरोबरच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

गाझा पट्टीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचविण्यासाठी काही काळ युद्धविराम करावा आणि संघर्ष सुरू असतानाही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचे पालन व्हावे’, अशा रास्त मागण्यांसाठी संयुक्त राष्ट्रांनी बोलाविलेल्या आपत्कालीन आमसभेमध्ये ठराव मांडण्यात आला होता. जॉर्डनने मांडलेल्या या ठरावाला इजिप्त, ओमान, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यासारख्या अरब-मुस्लिम देशांसह रशियानेही पाठिंबा दिला होता. गाझा पट्टीमध्ये अडकलेल्या सर्वसामान्य नागरिकांना पुरेशी मदत विनाखंड मिळत राहावी अशी अपेक्षाही या ठरावात व्यक्त करण्यात आली आहे. १२० विरुद्ध १४ मतांनी हा ठराव स्वीकारण्यात आला असताना भारताने घेतलेल्या भूमिकेबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.