लेखातून मिळाला धडा

‘आभासी जाळ्यातलं बाल्य’ हा मेघना जोशी यांचा लेख वाचला. मोबाइल ही काळाची गरज आहे हे सगळेच मान्य करतात, परंतु त्याच्या किती आहारी जायचे हे आपणच ठरवायचे आहे, हे हा लेख वाचल्यावर नक्कीच लक्षात आले. लेखात पालकांना दिलेल्या टिप्स खरोखर लक्षात घेऊ न कृतीत आणणे गरजेचे आहे. आजकाल सुट्टीत मैदानी खेळ खेळणे जवळजवळ बंदच झालेले आहे. पालकांना आपल्या पाल्याला कुठल्या तरी शिबिरात, मुख्यत: क्रिकेटला पाठवले म्हणजे आपले कर्तव्य पार पाडल्यासारखे वाटते. त्याऐवजी मुलांना मैदानात खोखो, कबड्डी, मल्लखांब आदीसारखे खेळ खेळायला दिल्यास त्यांचा शारीरिक व मानसिक विकास अधिक होईल. मोबाइलच्या आहारी जाऊन व विविध प्रकारचे गेम्स खेळून, त्यांचे बालपण तर हिरावले जातेच आहे त्याचबरोबर ही ‘आभासी दुनिया’च त्यांना खरी वाटू लागली आहे. त्याचा त्यांच्या मनावर, शरीरावर, बौद्धिक क्षमतेवर, समरणशक्तीवर होणारा परिणाम हा त्यांचे भावी आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे. वेळीच पालकांनी या ‘मोबाइल फीवर’ला आळा न घातल्यास बालकांचे बालपण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, हाच मेघना जोशी यांच्या लेखातून घ्यायचा धडा आहे.

– मिलिंद यशवंत नेरलेकर, डोंबिवली

पालकांनी पुढाकार घेणे गरजेचे

‘आभासी जाळ्यातील बाल्य’ हा लेख (२७ एप्रिल) वाचला. अतिशय सुरेख व उपयुक्त मांडणी केली आहे. लेख वाचून माणूस विचार करणार नाही तर नवलच.. आजच्या युवा पिढीला जर या संकटापासून वाचवायचे असेल तर पालकांनी या बाबतीत पुढाकार घेणे गरजेचे आहे असे मला वाटते. मीही एक विद्यार्थी असल्यामुळे मला या गोष्टींचा अनुभव आहे व जाणीवसुद्धा आहे. मी सगळ्यांना एक विनंती करेन की, आपण आणि ‘लोकसत्ता’ मिळून या विषयास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करू या.. पुन्हा एकदा धन्यवाद.

– अमोल बोरसे

पत्रं पाठवण्यासाठी आमचा पत्ता :

ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई – ४००७१० किंवा chaturang@expressindia.com अथवा chaturangnew@gmail.com यावर लेख पाठवावेत.