आनंदी जगण्याचा मार्ग

‘अपयशाची‘वाइल्डकार्ड’एन्ट्री’हा ‘अपयशाला भिडताना’ या मालिकेतील योगेश शेजवलकर यांचा चार जानेवारीला प्रसिद्ध झालेला पहिला लेख वाचला. ‘केलेल्या प्रयत्नाचं उत्तर मनासारखं मिळालं की नाही? एवढय़ा एकाच निकषावर त्या संपूर्ण प्रयत्नाचं, त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं यश किंवा अपयश ठरत नाही.’ ,‘ऑल वेल इफ एन्ड इज वेल’ हे एकमेव सत्य नाही, अपयशाला पूर्ण ताकदीनं भिडावं लागतं,   अपयश सहन करण्याची, त्यात दडलेले अर्थ समजून घेण्याची, मिळणारा धडा शिकण्याची तयारी नसणं हे परिस्थिती गंभीर होण्यामागील कारण आहे.’, ‘जे जे चांगलं ते माझं आणि ‘जे जे फसेल ते इतरांचं,’ आदी लेखातील अभ्यासू निरीक्षण म्हणजे अपयशाने खचून जाणाऱ्यांसाठी व काही वेळा आत्महत्येपर्यंत टोक गाठणाऱ्यांसाठी कानमंत्रच आहेत. सर्वच क्षेत्रांतील वाढती स्पर्धा आणि स्वत:ला सिद्ध करण्याच्या नादात पदरी येणारे अपयश यामुळे खचून न जाता त्याला कसे भिडावे व वयाच्या कुठल्याही टप्प्यावर, कुठल्याही बाबतीत येणाऱ्या अपयशाकडे जर, अपयश म्हणजे यशाची पहिली पायरीच,या सकारात्मक नजरेने बघितल्यास आयुष्यात निराशा येणार नाही. तसेच केवळ यशाच्या मागे न लागता आपल्याला आवडेल त्या विषयात,कामात जास्तीतजास्त प्रावीण्य मिळवण्याचा व त्यातून आनंदी जीवन जगण्याचा मंत्रच लेखकाने पहिल्याच लेखातून दिला आहे.

– मिलिंद नेरलेकर, डोंबिवली

समृद्ध करणारी २०१९ ची सदरे

मी ‘चतुरंग’चा  नियमित वाचक आहे. दरवर्षीप्रमाणेच २०१९ मधील सर्वच सदरांमधील लेख संपूर्ण वर्षभर नियमितपणे वाचले. प्रत्येक लेखात आणखी काय नवीन शिकायला, अनुभवायला आणि वाचायला मिळेल याची उत्सुकता असायची. एकूणच सर्व लेख, त्यांचे विषय, आवाका आणि महत्त्व त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी खरोखरच प्रभावीपणे अधोरेखित केले आहेत. या सर्व सदरांपैकी ‘सृजनांच्या नव्या वाटा’, ‘सर्वासाठी शिक्षण’, ‘आभाळमाया’, ‘सरपंच’, ‘तळ ढवळताना, ‘आव्हान पालकत्वाचे’, ‘नात्याची उकल’ ही सदरे खूप आवडली आणि भावली. या सर्व लेखांमधून या विषयांच्या अनुषंगाने असलेल्या समस्या, त्यासाठी अवतीभवती होत असलेले भरीव कार्य, वंचितासाठी असलेली तळमळ आणि त्यासाठी केलेला संघर्ष जवळून समजला व अंतर्मुख झालो आणि यामुळे स्वत:चेही आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली. एकंदरीतच या वर्षीच्या ‘चतुरंग’च्या विविध लेखमाला खूप अनुभव समृद्ध करणाऱ्या, विचारांना चालना व दिशा देणाऱ्या आणि सर्वसमावेशक अशा होत्या.

२०२० मधील लेखमालासुद्धा अशाच मार्गदर्शक, प्रेरक आणि विचारांना बळ व सजग बनविणाऱ्या असतील, अशी आशा करतो, किंबहुना खात्री बाळगतो.

– हेमंत मोरे, सातारा</p>