ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची ओळख भक्ती मायाळू यांचा ‘आभाळमाया’मधील लेख वाचला. काही वर्षांपूर्वीच आम्हाला भेटलेले राजदत्तजी डोळ्यांसमोर उभे राहिले. आज जगात अशा ऋषितुल्य व्यक्ती आहेत, यावर विश्वास बसावा असेच हे थोर व्यक्तिमत्त्व. भक्ती यांनी एक एक प्रसंग आपल्या लेखणीने वाचकांसमोर जिवंत केलाय. अशा ऋषितुल्य बाबांच्या पोटी आपला जन्म झाला आणि सार्थकी लागला, असेच म्हणावे लागेल. आपलंही पाऊल बाबांच्या विचारांच्या सावलीसोबत असेच अखंड चालत राहो, एवढीच प्रार्थना. उन्मेष शहाणे, सोलापूर. मनाला स्पर्शून जाणारा लेख ‘वृषाली मगदूम’ यांचा ‘दोन पिढय़ांतील वाढतं अंतर’ हा ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक व शारीरिक छळाच्या कहाण्यांविषयीचा लेख मनाला स्पर्शून गेला. त्यांनी आपले मनोधैर्य खचू दिले नाही आणि लढाई अर्ध्यावर सोडली नाही. त्याचे फळ त्यांना मिळाले. या लेखामुळे ज्येष्ठांना मिळत असलेल्या सवलतींबद्दल माहिती मिळाली. याच पुरवणीतील रती भोसेकर यांच्या ‘शाळेतील आजोळ’ ही संकल्पना मनाला खूपच छान वाटली. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे अनेक मुलांना आजी-आजोबांचा सहवास मिळणे कमी झाले आहे. शाळेतील प्रयोगाने शाळेचे प्रेमळ आजोळ कसे झाले याचे सुंदर वर्णन लेखिकेने केले आहे. मीनाक्षी सावरकर यांचा ‘स्वदेशी सवंगडी’ हा अनुभवही छान वाटला. अमेरिकेत भौतिक सुखाची चंगळ असते पण एकटेपणावर लेखिकेने शोधलेला उपाय आवडला. एकंदरीत २० जुलैची संपूर्ण पुरवणीच वाचनीय आहे. सुहासिनी पांडे, नांदेड. सजीव पाऊस ‘गच्च पाऊस’ हा नीरजा यांचा लेख (२० जुलै) आवडला. त्या लेखात एके ठिकाणी म्हणतात, ‘सर्जनशील लेखकांच्या अनेक कथांचं कादंबऱ्यांचं एक पात्र झाला आहे हा पाऊस.’ नुकताच पाहिलेला सुमित्रा भावे यांचा ‘दिठी’ हा चित्रपट आठवला. केवळ ८९ मिनिटांच्या या चित्रपटात पाऊस सतत बरसत राहतो. एक अनोखं गंभीर वातावरण तयार करणारा हा पाऊस या चित्रपटातलं एक पात्रच आहे. मिलिंद कुलकर्णी, पणजी.