समाजातल्या वंचित आणि गरजू लोकांमध्ये राहून दिवाळीचा आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आज अनेक जण खारीचा वाटा उचलत आहेत. त्यांच्या या उपक्रमांनी दु:खे, उपेक्षा पूर्णपणे नाहीशी होणार नसली तरी काहींच्या आयुष्यात तरी आनंदाचा दिवा प्रज्वलित होत राहील. पणती मर्यादित प्रकाश देत असली तरी एका पणतीने दुसरी, दुसरीने तिसरी पणती लावली तर आसमंत नक्कीच तेजोमय होईल यात शंका नाही. समाजातल्या अशा अनेक विधायक कार्याविषयी..दिवाळी मांगल्याचा आणि आनंदाचा उत्सव. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेक लोक, संस्था आपले सामाजिक भान जागवत दिवाळीचे स्वागत करतात. समाजातल्या वंचित, गरजू लोकांमध्ये राहून त्यांच्याबरोबर दिवाळीचा आनंद साजरा करतात. दिवाळीच्या या आगळ्यावेगळ्या साजरीकरणाच्या मनोहारी रूपांमधून मिळते एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळेच समाधान! दिवाळी म्हटले की, भाऊबीज असेच समीकरण माहेरवाशिणींच्या मनात असते. सीमेवर आपले जवान डोळ्यात तेल घालून भारतमातेचे रक्षण करतात. अनेकांना त्यात वीरमरण येते. अशा जवानांच्या घरच्या लोकांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी आणि जवानांच्या कार्याचे स्मरण म्हणून पुण्यातील ‘सैनिक मित्र परिवारा’तर्फे दर वर्षी शहीद जवानांच्या वीरमातांचा व शहीद जवानांच्या विधवा पत्नी अर्थात वीरपत्नींचा सन्मान केला जातो. त्यांना अनोखी भाऊबीज दिली जाते. २००२ सालापासून साजऱ्या होणाऱ्या या भाऊबीजेचा सोहळा नयनरम्य असतो.पुण्यातील प्रसिद्ध कसबा पेठेतील गणपती मंदिरात वीरमातांना सन्मानपूर्वक आणले जाते. तर नारद मंदिरात वीरपत्नींना सन्मानित करण्याचा कार्यक्रम संपन्न होतो. त्यांच्या आगमनानंतर त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते. गणपतीची आरती, पूजा अशा षोडशोपचारांनंतर या साऱ्या जणींना साडी-चोळी दिली जाते. त्यांना बांगडय़ा भरल्या जातात. या मंडळाचे कार्यकर्ते म्हणजे पुण्यातील २०-२२ सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते. ते स्वत:हून आपल्या या बहिणींसाठी भेटवस्तू आणतात. कुणी मिठाई आणते कुणी आणखी काही.. पण सख्ख्या बहिणीला ज्या प्रेमाने भाऊबीजेसाठी माहेरी आणले जाते त्याचपद्धतीने अगदी परगावच्या माता-भगिनींनाही इथपर्यंत आणण्याची व्यवस्था केली जाते. विशेष म्हणजे कार्यकर्ते स्वत:हूनच ही जबाबदारी घेतात. सर्वात हद्य क्षण असतो, जेव्हा या वीरमाता आणि वीरपत्नी या कार्यकर्त्यांना औक्षण करतात, त्या वेळी एका शहीद जवानाला जन्माला घालणारी माता वा ते स्वीकारणारी वीरपत्नी यांच्याकडून टिळा लावताना कार्यकर्त्यांचे चेहऱ्यावरचे भाव शब्दातीत असतात. अनेकांना आनंदाश्रू आवरणं कठीण असतं. हा क्षण भारावून टाकणारा असतो. सोहळ्याचा उत्तरार्धही तितक्याच जोरदारपणे साजरा होतो. या माता व पत्नींसाठी शाहीर मावळेंच्या घरी पुरणपोळीचा बेत असतो. सनई-चौघडय़ांच्या सुरावटीच्या पाश्र्वभूमीवर हा बेत अधिकच खुलतो. जवानांच्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रम शेवटाकडे येतो तेव्हा जड पावलांनी या माहेरवाशिणीही निरोप घेतात. त्यांना पुण्याच्या वेशीपर्यंत कार्यकर्ते सोडायला जातात. गाडी दिसेनाशी होईपर्यंत दोन्हीकडचे निरोपासाठीचे हात हलत असतात.याच मंडळाच्या माध्यमातून पुण्यातल्या एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानातून सीमेवरील जवानांसाठी १० हजार किलो मिठाई पाठवली जाते. अनेक शाळा, महाविद्यालये यांच्याकडून बनवून घेतलेली भेटकार्डे व संदेशही या मिठाईबरोबर पाठवले जातात. अशी सुमारे १०-१२ हजार भेटकार्डे सरहद्दीवर पोहोचतात. ऐन दिवाळीत ती सैनिकांच्या रेजिमेंटपर्यंत पोहोचतात. त्यांच्या प्रेरणाहॉलमध्ये वर्षभर ही चित्रे दिमाखात विराजमान होतात. जवानांप्रती आपला आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करणारी ही छोटीशी कृती त्यांना मायेचा ओलावा देऊन जाते, असे खुद्द सैनिकच कळवतात तेव्हा पुढील वर्षी अधिक जोमाने हे कार्य सुरू होते, असे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आनंद सराफ सांगतात.पुण्याच्याच ‘विधायक ग्रुप’तर्फे एक कौतुकास्पद उपक्रम गेल्या वीस वर्षांपासून होतो, तो म्हणजे शनिवारवाडय़ाच्या प्रांगणात केली जाणारी दीपप्रार्थना. ऐतिहासिक वास्तूत, दिवाळी संध्येच्या या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने संपन्नतेचा अनुभव येतो. या प्रार्थनेसाठी जी मुले येतात, ती ‘विशेष’ असतात. पुण्यातील अनाथ, अपंग, गतिमंद अशा विविध संस्थांच्या साधारण साडेचारशे मुलांना घेऊन ही प्रार्थना केली जाते. या शनिवारवाडय़ावरील दीपप्रार्थनेसाठी हजेरी लावून त्यांचेही चेहरे उजळतात. या कार्यक्रमात मुलांना नवे कपडेही दिले जातात. ‘सैनिक मित्र परिवारा’तर्फे आणखी एक भाऊबीज साजरी केली जाते ती असते वेश्यांसह. या भाऊबीजेलाही आपल्याच समाजातील या उपेक्षित स्त्रियांना सन्मानपूर्वक साडी-चोळी देऊन त्यांच्या पायावर डोके ठेवले जाते. ‘आजच्या एका दिवसामुळे आम्ही उर्वरित ३६४ दिवसांच्या लढाईला सामोरं जाऊ शकतो.’ अशी बोलकी प्रतिक्रिया एका वारांगनेने दिली. तेव्हा समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते देतात.वाईचे भास्कर व मृणालिनीताई खरे हे एक उत्साही दाम्पत्य. निवृत्तीनंतरही त्यांचा दिवस व्यस्त असतो, अनेक सामाजिक कामांत. गेली १२ वर्षे हे दाम्पत्य येथील प्रसिद्ध ढोल्या गणपती मंदिराच्या परिसरातील कातकरी, गोसावी, गोंधळी या समाजाच्या मुलांसाठी दिवाळी अभ्यंगस्नानाचा छोटेखानी सोहळा पार पाडतात. या मुलांच्या कुटुंबीयांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. त्यांना कसले आलेत सण आणि उत्सव? मग या दाम्पत्याने १५ वर्षांखालच्या मुला-मुलींना गरम पाण्याने आंघोळ घालून, उटणे लावून अभ्यंगस्नान घालण्याचा शिरस्ता पाडला. त्या स्वत:च मुलांना बोलवत. त्यांना अभ्यंगस्नान घालत. मग जमेल तसे मुलांना कपडेही घेत. मुलांना व त्यांच्या आयांच्या हातावर फराळाची एक एक पुडी ठेवत. आता हा उपक्रम इतका लोकप्रिय झाला आहे की, मदतीचे अनेक हात येऊन मिळालेत. चक्क हॉल घेऊन कार्यक्रम पार पडतो. कातकरी समाजातील मुला-मुलींना शिकवण्याच्या दृष्टीने त्यांच्या वस्तीत गेलेल्या मृणालिनी ताई वस्तीच्या लाडक्या झाल्या आहेत. तर कोल्हापुरातही गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने असाच एक कार्यक्रम पार पडतो, अनाथाश्रम, रिमांड होममधील मुला-मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारा. कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध २५ फुटी महागणपतीच्या मंडळाकडून ‘बालसंकुला’तील एक दिवसाच्या मुलापासून ते २० वर्षांच्या मुलापर्यंत प्रत्येकाला नवे-कोरे कपडे घेऊन दिले जातात, तेही त्यांच्या पसंतीने. मुलांना दुकानात नेले जाते व मुलं बोट ठेवतील तो, त्यांच्या आवडीचा ड्रेस त्यांना घेतला जातो. या उपक्रमासाठी जवळपास ५-६ लाख रुपये खर्च येतो. येथे काम करणाऱ्या आया, सफाई कामगार यांनाही साडय़ा घेतल्या जातात. या विधायक कामासाठी मंडळाच्या वर्गणीसह महागणपतीचरणी अर्पण होणाऱ्या रोख रकमेचाही वापर केला जातो. या मुलांची दिवाळी कोण साजरी करणार, या भावनेने आम्ही पुढाकार घेतला व यंदा या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होते आहे, हे सुखद औचित्य असल्याचे कोल्हापूरचे माजी महापौर नंदकुमार वळंजू म्हणाले.सामाजिक बांधीलकी जपण्याच्या या व्रतामध्ये तरुणाईसुद्धा मागे नाही. अगदी विशीच्या उंबरठय़ावर असणाऱ्या मुलांनी एखादा सामाजिक उपक्रम राबवायचा म्हटले तर कोण देणार त्यांना पैसे? यावर गिरगावच्या ‘युवा मोर्या’ या ग्रुपने एक शक्कल लढवली. परिचितांकडून रद्दी गोळा करायची व ती विकून आलेला पैसा सत्कारणी लावायचा. या संकलित निधीतूनच त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यातूनच गेली आठ वर्षे जव्हारच्या चार आदिवासी पाडय़ांमध्ये दिवाळी साजरी केली जातेय. पाडय़ावरील लोकांना चकली, चिवडा असे फराळाचे पदार्थही माहीत नव्हते त्या वेळी. त्यांच्या चंद्रमौळी घराच्या दारापुढे कधी पणत्या पेटल्या नव्हत्या की दारापुढे रांगोळी घातली गेली नव्हती. त्यांना या सगळ्याचे अप्रूप वाटतेय आणि ‘युवा मोर्या’च्या कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ येते, असे युवा कार्यकर्ती तन्वी पराडकर हिने सांगितले. कर्जत-कशेळी या भागात काम करणाऱ्या ‘शबरी सेवा समिती’च्या उपक्रमांमधून प्रेरणा घेतल्याचं तिने आवर्जून सांगितले. अनेक स्वयंसेवी संस्था समाजाच्या उपेक्षित घटकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवण्यात यशस्वी होत आहेत. वनवासी कल्याण आश्रम संस्था ही त्यापैकींच एक. संस्थेचे आता मुंबई आणि परिसरात अनेक गट तयार झाले आहेत. गेली १२-१३ वर्षे संस्थेचे कार्यकर्ते दिवाळीच्या आदल्या आठवडय़ात वर्गणी काढून दिवाळीचा फराळ डहाणूच्या आदिवासी पाडय़ांपर्यंत पोहोचवतात. लाडू, चकली, चिवडा अशा खमंग पदार्थानी या पाडय़ांमध्ये सणासुदीची लगबग चालू होते. तर दिवाळीच्या एखाद्या दिवशी कार्यकर्ते स्वत: पाडय़ांवर जाऊन घरोघरी पणत्या लावतात. मुलांना एकत्र गोळा करून त्यांच्याबरोबर फराळाचा आनंद लुटतात , फटाके उडवतात. या ‘दिवाळी जल्लोष’प्रमाणे त्यांचा आणखी एक स्तुत्य उपक्रम म्हणजे या आदिवासी व दुर्गम भागातील कलाकारांनी बनवलेल्या वस्तू एकत्र करून ठाणे, पनवेल, नवी मुंबई येथील विविध प्रदर्शनांमध्ये विक्रीसाठी ठेवतात. दिवाळीच्या महिनाभर आधी ही प्रदर्शने लागतात. यातून या उपेक्षित कलाकारांच्या सृजनतेला प्रोत्साहन मिळते व दोन पैसे त्यांच्याही पदरी पडतात व खऱ्या अर्थाने त्यांना समृद्धतेची दिवाळी अनुभवता येते. यासाठी दिवाळीच्या चार-पाच महिने आधी त्यांच्याकडून वस्तू तयार करून घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे व प्रत्यक्ष का उत्तर.. सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांचं? त्या अंधार प्रकाशाच्या सावल्यांमध्ये ती दीपमाळ हळूहळू एखाद्या झाडासारखी भासायला लागली होती. ती मुलगी जणू त्या झाडाच्या फांद्याफांद्यांवर एक एक दिवा ठेवत एक एक प्रकाशफूल उमलवत होती. प्रकाशफुलांनी लगडलेलं तेवणारं झाड..मी आणि माझ्या एका जिवलगानं माथेरानच्या जंगलात एका किर्र्र रात्री एक काजव्यांनी लगडलेलं झाड पाहिलं होतं. चमचमणारं. समोरच्या दीपमाळेचं तसंच काहीसं होत चाललेलं होतं. मी तिच्या दिव्यांकडे टक लावून पाहात होते. त्या सगळ्या अंधारप्रकाशानं माझ्याभोवती हळूहळू एक शांत सोनेरी कोष विणायला घेतला. मोतीया रंगाची साडी नेसलेली, गजरा माळलेली, कपाळावर लालबुंद पिंजर कुंकू असलेली माझीच एक शांत छबी मला माझ्या आत जाणवली. ती माझ्या आतल्या एका हिरव्या वाटेनं चालत माझ्या आतल्या एका दगडी कोनाडय़ापाशी पोचली. त्या कोनाडय़ात एक दिवा होता. त्याची ज्योत सैरभैर होती. त्या माझ्या छबीनं वळून दीपमाळेच्या असंख्य शांत ज्योतींकडे टक लावून पाहिलं. जणू त्यांच्याकडून काहीसं मिळाल्यासारखी ती शांत वळली. तिनं माझ्यातल्या फडफडणाऱ्या दिव्याला तिच्या हातांचा आडोसा केला आणि आतली ज्योत स्थिर झाली. माझी एक तंद्री लागत चालली होती. मी चराचराचा, आसमंताचा एक भाग आहे असं वाटायला लागलं. आतल्या गाठी सुटत सुटल सैल होत चालल्या होत्या. त्या गाठी फक्त जिवाभावाचं कुणीसं या जगातून निघाल्याच्या दु:खाच्या नव्हत्या. किंबहुना त्या फक्त दु:खाच्या होत्या असंही नव्हतं. त्या रागाच्या होत्या, भित्यांच्या होत्या, आणखीही कशाकशाच्या माहीत असलेल्या, नसलेल्या.. त्या सगळ्या गाठींचं उत्तर त्या माझ्यातल्या शांत दिव्यात आहे असं वाटत होतं. माझ्यातला तो दिवा. तो मूळ आहे माझ्या असण्याचं. तो सैरभैर झाला की मीही सैरभैर होते. ग्रेसांच्या ओळी आठवल्या, ‘अंधारात मोठय़ा संयमानं दिवा ठेवावा लागतो. एक दिवा ठेवायचा तर आयुष्य पुरत नाहीये मला आणि इथे तर झुंबरेच्या झुंबरे शोभेला लावण्याची अहमहमिका सुरू आहे..’ हेच तर मूळ आहे माझ्यातला दिवा फडफडण्याचं. या अहमहमिकेत मी उतरले की आतला दिवा फडफडतो. आसपासचा झगमगाट पाहिला की मलाही त्या झगमगाटात माझं एक झुंबर लटकवण्याचा मोह होतो. त्याशिवाय आपल्याकडे बघणारच नाहीत कुणी, अशी भीती वाटते. त्या भीतीनं मी जी नाही ती बनू पाहते. खोटी होते. लहान होते. त्या संध्याकाळी त्या दीपमालेत तेवणाऱ्या असंख्य शांत ज्योतींनी मला सांगितलं, ‘मला माझ्या दिव्याची जपणूक करायला हवी..’ त्या प्रत्येक तेवणाऱ्या दिव्यापासून एक अदृश्य सोनेरी रेषा माझ्या असण्यापर्यंत येऊन मिळते आहे, असे वाटायला लागलं. मला त्या निराकार भवतालापासून वेगळं काढून कुठल्याशा आकारात बांधणारी ‘शरीर’ नावाची आकृतीरेषाही हळूहळू त्या भवतालात विरत चालली आहे, असं वाटत होतं. माझं सगळं ‘असणंच’ म्हातारीच्या पिसासारखे इकडे तिकडे संथ पसरत तंरगायला लागलं आहे असं वाटत होतं. कधी हवेत, कधी कुठल्या सांदरीत.. कधी कुठे.. आकारहीन वाटत होतं पण सैरभैर नव्हे.. वाटत होतं, आपण पसरतो आहोत, पण विखुरलेले नाही, निराकार आहोत, पण वेडेवाकडे नाही.ती दीपमाळ आता कायमची माझ्या असण्याचा भाग होऊन गेली आहे. माझ्या कित्येक अंधाऱ्या वेळांना जेव्हा माझ्या आतल्या दगडी कोनाडय़ातला दिवा थरथरतो. तेव्हा मला ती दीपमाळ आठवते. त्या दीपमाळेत एकेक पणती ठेवणारी ती गूढ मुलगी आठवते. महेश एलकुंचवारांची नंदिनी.. मी माझ्या आतल्या मोतीया साडी नेसलेल्या मला बोलावते.‘असं का? तसं का?’ विचारत माझ्या अंधाराचं खापर दुसऱ्यांवर फोडण्यासाठी उचललेल्या माझ्या हट्टी बोटाला हळूच स्वत:कडे वळवते आणि मनातल्या त्या दीपमाळेकडे टक लावून पाहात ‘सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपणच’ व्हायच्या वाटेवर नव्यानं पाऊल टाकते. amr.subhash@gmail.com