‘झोप’ प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असली तरी ही देणगी ‘फुकट’ मिळाल्याने आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो.  ‘उत्तम झोप’ हा आपल्या शरीराच्या देखभालीचाच एक महत्त्वाचा भाग आहे. का बरे आपण दुर्लक्ष करतो? याची कारणे निद्रेबद्दलच्या अनेक गैरसमजात आहेत.

व र्षभराच्या लेखमालिकेतील हा शेवटचा लेख. निद्राविज्ञान हा विषयच मुळी नावीन्यपूर्ण आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे असे कितीही लेख लिहिले, तरी मला वाटते काहीतरी राहून जाईलच. वर्षभर लोकसत्ता-चतुरंगच्या वाचकांनी मात्र तुडुंब प्रतिसाद दिला. सर्वच वाचकांना इंटरनेट आणि    ई-मेल उपलब्ध असतीलच असे नाही त्यामुळे सगळ्यांच्याच प्रतिक्रिया पोहोचल्या नसतील. पण, वाचकहो तुमच्या प्रश्नांमुळे, कुतूहलामुळे माझा एक फायदा असा झाला की एकंदरीतच लिखाणाचा कंटाळा (आणि गप्पांची तल्लफ) असलेल्या मला आळस झटकून लिहावे लागले आणि पुढेही लिहीत राहीन असो.. या सदरातून गेले वर्षभर ज्या विषयांची चर्चा आपण केली त्यांची उजळणी या लेखात करणे महत्त्वाचे वाटते.
‘झोप’ प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असली तरी ही देणगी ‘फुकट’ मिळाल्याने आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. जशी विकत घेतलेली गाडी ‘मेन्टेन’ करायला आपण प्रचंड उत्सुक असतो, पण ‘शरीर’ नावाच्या गाडीची देखभाल सर्वच जण करतातच असे नाही. ‘उत्तम झोप’ हा या देखभालीचाच एक महत्त्वाचा भाग आहे. का बरे आपण दुर्लक्ष करतो? याची कारणे निद्रेबद्दलच्या गैरसमजात आहेत.
  गैरसमज
 १) झोप म्हणजे ‘काही न करणे’, मेंदूची निष्क्रिय अवस्था आहे. गाढ झोपेत मेंदू अगदी शून्य झालेला असतो वगरे. यावर हे समजून घ्यायला हवं की झोप हीसुद्धा जागेपणाइतकीच सचेतन अवस्था आहे. तुमच्या मेंदूतील काही भागांना मेहनत करावीच लागते आणि तरच तुम्हाला झोप येऊ शकते आणि टिकते. किंबहुना ज्याला आपण ‘साखरझोप’ समजतो, त्या वेळेला मेंदू रेमझोपेत असतो. अशा वेळी जागेपणापेक्षा दीडपटीने जास्त जोरात मेंदूचे काम चालू असते. आपल्याला ते समजत नाही याचे कारण मी, माझे वगरे समजण्याचे काम हा मोठय़ा मेंदूचा केवळ एक भाग (प्रीफ्रंटल लोब) करत असतो. बाकी मेंदूचे भाग (जसे ऐकणे, पाहणे वगरे) हे त्यापेक्षा वेगळे असतात. जागेपणी हे भाग प्रीफ्रंटल लोबकडून सूचना घेत असतात. झोपेमध्ये हा संवाद कमी होतो अथवा पूर्णपणे थांबतो. या पहिल्या चुकीच्या समजुतीमुळे दुसऱ्या गैरसमजाचा आरंभ होतो.

गैरसमज २) मला झोपेची समस्या नाही. कारण मी दिवसा कधीही, कुठेही झोपू शकतो. यामुळे परिचित लोक काय ‘सुखी माणूस’ आहे असेही म्हणतात. या एका गैरसमजामुळे जागेपणीचे काही सुवर्णक्षण आपण गमावतो आणि सृजनशीलता कितीपटीने कमी होते. मागे सांगितल्याप्रमाणे निद्रेची केंद्रे अॅक्टिव्ह झाल्याखेरीज तुम्हाला झोपच येणार नाही. म्हणजे रात्री झोप  झाल्यावरही जर दिवसा झोप येत असेल तर ही केंद्रे उगीचच ओव्हरटाइम करत आहेत. तुमच्या नकळत जर हे होत असेल तर जागेपणीच्या कुठल्याही कामामध्ये त्यांचा अडथळा येणारच. हळूहळू आज करे सो कल, कल करे सो परसो अशी टाळाटाळीची वृत्ती निर्माण होते. अगदी आणीबाणीची वेळ नसेल तर ‘घरचे काम नंतर करतो’ असा कंटाळा येतो.
गैरसमज ३) मी एकदा झोपलो की क्वचितच उठतो. माझी झोप अगदी सलग आहे. त्यामुळे मला निद्राविकार असणे शक्यच नाही. वास्तविक आपल्या कुणाचीच झोपही सातत्याची (कंटिन्युअस) नसते. दरतासाला कमीतकमी चार-पाच वेळेला जाग येतेच. आपल्याला या जाग येण्याची स्मृती नसते, कारण ही बाब लक्षात राहण्यासाठी कमीतकमी ती जाग साठ सेकंदांची तरी असली पाहिजे. तर तुमची जाग वीस, तीस सेकंदांची असेल तर तुमच्या हे लक्षात राहणार नाही. परिणामी रात्री शंभर वेळेला जाग आली तरी सकाळी उठल्यावर त्याचे स्मरण होणार नाही. एवढे झोपलो तरी फ्रेश का नाही वाटत? असा प्रश्न मात्र पडेल. याचे उत्तर झोपेतच आहे हे लक्षात घ्या! तंत्रज्ञानाशिवाय ही बाब उघडकीस आलीच नसती. निद्राविकारांबाबत एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्याला ते असतात त्याला त्याची जाणीव असेलच असे नाही. यामुळे ही वैद्यकीय गोष्ट असून, डॉक्टरचा सल्ला घ्यावा हे त्या व्यक्तीला कसे सुचणार? बरे डॉक्टरकडे गेल्यावर त्याला याची काही माहितीच नसेल तर तोदेखील काय सल्ला देणार? याच कारणामुळे निद्राविज्ञानाचा विकास हा इतर वैद्यकीय शास्त्रांपेक्षा (कार्डियोलॉजी, नेफ्रॉलॉजी वगरे) खूपच उशिरा झाला. आजही आपल्या वैद्यकीय शिक्षणात एक टक्क्यापेक्षा कमी वेळ याला दिला जातो. (आपण आयुष्याच्या एकतृतीयांश भाग झोपेत घालवतो.)
गैरसमज ४) एक-दीड तासाची झोप कमी झाली तरी काय फरक पडतो? किंबहुना कमी झोप घेणारा माणूस हा कामसू आणि सात तास झोप घेणारा आळशी असतो, असे मानले जाते.
पण ते चुकीचे आहे, झोपेमध्ये दिवसभर शिकलेल्या गोष्टी आणि झालेले शारीरिक तसेच भावनिक आघात यांवर दुरुस्तीचे काम चालू असते. मुंबई लोकल्स ट्रेनमध्ये मेगा ब्लॉक हे गरसोयीचे वाटले तरी दुरुस्ती झाली नाही तर प्राणघातक अपघात होतातच हे सत्य सर्वाना माहीत आहे. कमी झोप म्हणजे दुरुस्तीला कमी वेळ. आत्तापर्यंतच्या संशोधनात कमी झोपेने जाडी वाढते, वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अडथळे येतात. पोटाचा घेर वाढतो हे संशयातीत सिद्ध झाले आहे. आपल्या देशात याचे महत्त्व विशेष आहे कारण जितका पोटाचा घेर वाढला तितके डायबिटिसचे प्रमाण जास्त! आहार, व्यायाम याच्याइतकेच पुरेशा झोपेचे महत्त्व ओळखूनच ‘अमेरिकन डायबिटिस असोसिएशन’ने कमी झोप, स्लीप अॅप्निया आदी निद्रेसंदर्भातील त्रुटी एक स्वतंत्र धोकादायक गोष्टी मानल्या आहेत. रोज एक तास कमी झोप घेतल्याने तुमच्या गुणसूत्रांवरदेखील परिणाम होतो. यावर आमच्या संस्थेमधून एक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे जगामध्ये सर्वात पहिल्यांदा प्रत्यक्षरीत्या (डायरेक्ट इंटरव्हेंशन करून) कमी झोपेचे आपल्या गुणसूत्रांवर होणारे परिणाम यावरचे संशोधन आमच्या संस्थेने केले आहे. आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेले याबाबतचे संशोधन हे अप्रत्यक्ष रीतीने केलेले समूहाचे निरीक्षण आहे. ज्यांना या संशोधनाबद्दल उत्सुकता आहे त्यांनी ६६६.२’ीस्र्२्रूील्लूी२.्रल्ल या वेबसाइटला भेट द्यावी.
गैरसमज ५) घोरणे हे गाढ झोपेचे लक्षण आहे. याबद्दल सविस्तर माहिती मागील लेखांमध्ये आली आहेच. हे सगळे लेख इंटरनेटवर उपलब्ध आहेत. घोरणाऱ्या व्यक्तीला बऱ्याच वेळेला आपल्या घोरण्याबद्दल फारशी माहिती नसते हे विशेष! अगदी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात घोरणे आणि स्लीप अॅप्नियामुळे आपण वृद्धत्वाकडे किती लवकर झुकतो हे प्रसिद्ध झाले आहे. घोरणे आणि विशेष करून त्याबरोबर असलेला स्लीप अॅप्निया यामुळे वजनवाढ, मधुमेह, रक्तदाब, ब्लडप्रेशर, हृदयविकार आणि पक्षाघात, प्रसंगी अकाली मृत्यू इतके भयंकर विकार होऊ शकतात. आशादायी बाब म्हणजे ह्य़ांच्यावरती शंभर टक्के यशस्वी उपाय आहेत.
गैरसमज ६) माझे वय झाले आहे, त्यामुळे माझी झोपेची निकड आणि वेळ कमी झाली आहे. या एका गैरसमजामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या दिवसाचे नुकसान करून घेतात. वास्तविकता आपल्या झोपेची गरज अजिबात कमी होत नाही. एकगठ्ठा रात्रीची झोप येण्याची क्षमता मात्र कमी होते. म्हणजे रात्री सात ते आठ तास झोप येण्याऐवजी चार ते पाच तास झोप लागते. पण मग दिवसभरात अनेक वेळेला पेंग येते. या बाबींकडे नीट लक्ष देऊन, व्यवस्थित नियमन केले नाही तर मात्र अनेक समस्या उद्भवतात. एक तर रात्री दोन, तीन वाजताच जाग येते. इतर लोक गाढ झोपेत असल्याने काही खुडबुड करता येत नाही, मग अंथरुणावरच पडून राहावे लागते आणि निद्रेची आराधना करावी लागते. इथेच पहिली चूक होते! त्यानंतर दिवसा पेपर वाचताना, टीव्ही बघताना झोप येते, थकवा जाणवतो. त्यामुळे चीडचीड, व्यायाम न होणे अशा नकारात्मक गोष्टी घडतात. यशस्वीरीत्या पॉलिफेजिक झाल्यास तुमच्या निद्रासमस्या सुटतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने हे करता येणे शक्य आहे.
गैरसमज ७)-  तुम्हाला निद्रानाश (इनसॉम्निया) आहे म्हणजे तुम्ही उगाच फार विचार करता अथवा चिंतातुर जंतू आहात – पन्नास ते साठ टक्के लोकांमधला निद्रानाश (इनसॉम्निया) हा कुठल्याही मानसिक विकारांमुळे झालेला नसतो. उलट निद्रानाशामुळे अनेकजणांना चिंता (अँग्झायटी) असते. त्यामुळे ट्रेक्विलायझर गोळ्या घेणे हा दूरदर्शी उपाय ठरू शकत नाही.
हे सदर इथेच थांबतंय, परंतु तुमचे झोपेचे प्रश्न सुटून शांत झोप लागो, हीच प्रार्थना.(समाप्त)