अनेक स्त्रिया एखादी गोष्ट सतावत असेल, तर अगदी बसमधल्या सहप्रवासिनीजवळही पटकन मन मोकळं करू शकतात. पुरुष मात्र बहुतेक वेळा आतल्या आत कुढत बसतात. कणखर असण्याचं, कर्तेपणाचं अति ओझं असेल, मुलांशी भावनिक जवळीक नाही म्हणून वाटणारी खंत असेल किंवा जोडीदार दुरावल्याचं दु:ख… अनेक पुरुष, तेही वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर का असतात एकटेएकटे?…

एकदा माझ्या मुलाखतीतल्या एका छोट्या भागाचे ‘रील्स’ तयार करून मी समाजमाध्यमावर पोस्ट केले होते. त्यात मी, ‘स्त्रियांना आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्या निर्णय घ्यायला सक्षम आहेत,’ असं सांगत होते. त्यावर आलेल्या असंख्य प्रतिक्रियांमध्ये पुरुषवर्गानं, ‘पुरुषांना निर्णय घेऊ दिले जातात असं सर्रास घडतं का?… बायका पुरुषांना त्रास देत नाहीत का?’ असं विचारलं होतं. मला त्यांचा उद्वेग त्या प्रतिक्रियांमध्ये जाणवत होता. ‘आम्हालाही अडचणी आहेत, पण त्याकडे कोण लक्ष देणार?’ हा प्रत्यक्ष न विचारलेला प्रश्न ऐकू येत होता.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

हेही वाचा…माझी मैत्रीण : अस्पष्ट रेषा!

खरंच आहे ते! मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत थोडा दुर्लक्षित असा हा वर्ग आहे. मी विचार केला, की निदान या सदराच्या निमित्तानं आपण तरी आपली लेन्स त्यांच्यावर ‘झूम’ करून बघू या. हे पाहू या, की आपल्याला पुरुषांमधला एकटेपणा कधी कधी दिसतोय ते.

लहान मुलं आणि स्त्रियांकडे समाज सहानुभूतीनं बघतो. पुरुषांना मात्र ही सहानुभूती कधीच मिळत नाही. मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत विचार केला, तरी मुलं आणि स्त्रियांना काही झालं की लगेच मदत मिळते. तिथे पुरुषांना मात्र ‘इतका कसा हा कमकुवत? थोडं स्ट्राँग असायला नको का?’ असं म्हटलं जातं. आपल्याला काय होतंय ते समजूनही आणि समजलेलं नीट सांगता येण्याची क्षमता आणि शब्दसाठा दोन्ही असूनही पुरुष वर्गाला आपल्या भावना व्यक्त करण्यापासून कोण थांबवतं? कोणाजवळच मन मोकळं न करता ते आतल्या आत कुढत राहतात.

हेही वाचा…माझी मैत्रीण : जीव लावणारी ‘ती’

खरं तर या गोष्टीची बीजं लहानपणातच आढळतात. आमच्या घरी एका कार्यक्रमात माझ्या मुलीची आणि ओळखीच्या एका मुलाची मारामारी सुरू झाली. तिच्यापेक्षा एका वर्षानंच मोठा असलेला तिचा मावसभाऊ ते बघत बाजूला उभा होता. एका क्षणी त्याला समजलं, की आता मोठ्यांच्या हस्तक्षेपाची गरज आहे. त्यानं पळत पळत येऊन घडलेल्या प्रसंगाची कल्पना दिली. नंतर माझी बहीण त्याला म्हणाली, ‘‘मग तू काय करत होतास तिथं? राखी बांधते ना ती तुला? तू वाचवलं नाहीस तिला?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘…आणि त्यानं मलाच मारलं असतं तर?’’ आम्ही सगळे खूप हसलो, कदाचित उपहासानंच. मुलगा असून मारामारीला घाबरतो म्हणजे काय! त्याच वयाच्या मुलीनं घाबरलं तर ठीक आहे, पण मुलांनी असं करून कसं चालेल?… अशा प्रकारच्या प्रसंगांतून ही बीजं रोवली जातात. रडायचं नाही, घाबरायचं नाही, वाईट वाटलेलं दाखवायचं नाही. पडल्यावर लागलं तरी रडायचं नाही. रडलं नाही की शाबासकी मिळते, हे लक्षात आलं की आवर्जून रडू दाबून टाकलं जातं. मोठं होईपर्यंत हे वागणं हा स्वभावाचा भाग होतो. मग मोठं झाल्यावर कितीही संकटं आली किंवा दु:ख झालं, तर ते दाबून टाकून सगळं आलबेल असल्याचं नाटक करत राहायचं. सगळ्यांमध्ये राहूनही अशा पद्धतीनं अनेक पुरुष त्यांच्या दु:खासोबत एकटेच असतात. पुरुषांनी आपल्या भावना दाखवणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे, ही चुकीची धारणा आहे. तीच पुरुषांच्या एकटे- पणाच्या कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे.

वेदा आणि मिहीर पदवीच्या शेवटच्या वर्षाला होते. पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी एकच जागा होती आणि त्या जागेसाठी या दोघांमध्ये चुरस होती. एके दिवशी गप्पांमध्ये मिहीर पटकन म्हणाला, ‘‘तुला स्कॉलरशिप नाही मिळाली तरी तुझ्या कुटुंबाचं काही नुकसान नाही होणार. पण मला तर माझं घर चालवायचं आहे आणि त्यासाठी मला चांगली कमाई करावीच लागेल.’’ वेदाच्या मनात आलं, मुलगी असल्याचे दहा तोटे असले, तरी अपवादात्मक परिस्थिती सोडता मुलींना प्रथम ‘मिळवती व्यक्ती’ (bread winner) होण्याचं दडपण असतंच असं नाही. थोडा नीट विचार केला, तर किती मोठी जबाबदारी आहे ती! एक तर महागाई प्रचंड आहे आणि त्यात कुटुंबासाठीच्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडण्याची पहिली जबाबदारी ही पुरुषाची आहे अशी समाजाची दृढझालेली धारणा आहे. एखाद्या स्त्रीनं नोकरी करणार नाही असं ठरवलं तरी चालू शकतं. (आजही असंख्य स्त्रिया पूर्णवेळ गृहिणीपद सांभाळतातच.) कारण तिची घर सांभाळण्याची, चालवण्याची निश्चित अशी भूमिका आहे. अशा परिस्थितीत ज्या मुलांना नोकरी मिळायला वेळ लागतो किंवा जे ‘गेट’, ‘यूपीएससी’, ‘एमपीएससी’सारख्या परीक्षांची तयारी करत राहतात, त्यांना सतत आपल्याबरोबरचे खूप पुढे गेले आहेत आणि आपण मागे पडलो आहोत असं वाटतं.

हेही वाचा…जिंकावे नि जगावेही : त्रिसूत्री!

मित्रांचे विषय नुसते ‘सॅलरी’, ‘इन्क्रिमेंट पॅकेज’, ‘ऑफिस पॉलिटिक्स’, ‘शेअर बाजार’ आणि नव्या खरेदीवर अडकलेले असतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना या गप्पांमध्ये सहभागी होता येत नाही. हळूहळू मित्र लांब जातात. कदाचित हा एकटेपणा कायमचा टिकणारा नसेल, पण मुलांच्या आयुष्यातला हा काळ खूप मोठ्या एकटेपणाची जाणीव करून देणारा असतो. पालकांवर किती काळ ओझं होऊन राहायचं, ही भावना सतत त्रास देत राहते. ही झाली तिशीच्या आतल्या मुलांची गोष्ट.

आयुष्यात मस्त ‘सेटल’ झालेल्या चाळिशीच्या आजूबाजूच्या पुरुषांच्या एकटेपणाची कारणं वेगळी असतात. त्यांची मुलं साधारण १२ ते १६ या वयोगटातली असतात. बायको नोकरी करणारी असली किंवा नसली तरी या पुरुषांचा घरातला सहभाग मर्यादित असतो. मुलांना काय हवं-नको, खाण्यापिण्याचे नखरे, अभ्यासाचे ताण, इतर उपक्रम, या सगळ्यांत आईचा सहभाग जास्त असतो. आईशी मुलांचे संबंध खूप अनौपचारिक असतात. राग आल्यावर आईच्या अंगावर ओरडणारी मुलं प्रेम वाटल्यावर गळ्यातही आईच्याच पडतात. वडिलांशी बोलताना काय बोलायचं, काय नाही, याचा नीट विचार करून बोललं जातं, मर्यादा पाळल्या जातात. इथपर्यंत सगळं ठीक असतं. पण जेव्हा मुलं आपली गुपितं, आपल्या भावना फक्त आईला सांगतात किंवा बाहेरगावी शिकायला गेलेला मुलगा फक्त आईलाच फोन करतो, तेव्हा वडिलांना प्रचंड बाहेर फेकलं गेल्याची भावना येते. बहुतेक सगळ्या घरांत आई आणि मुलांचा ग्रुप असतो. आई-बाबा दोघंही भल्यासाठी ओरडतात. पण मुलं आईकडे परत येतात आणि बाबांचा मात्र अनेकदा दुस्वास करायला लागतात. बाबांना आतून कितीही वाईट वाटलं, तरी ते, ‘तुझ्याकडून कळतेय ना मला त्याची खुशाली! तो आनंदात आणि व्यवस्थित असला म्हणजे झालं.’ किंवा ‘बेचैन दिसतोय का आजकाल?’ अशी आईकडे विचारपूस करत राहतात. मनाची समजूत काढायला हे सगळं जरी बरं असलं, तरी आपलं पोटचं पोर आपल्यापासून दूर आहे, आपल्याबरोबरचे त्याचे संबंध औपचारिक आणि कामापुरते आहेत, ही भावना त्यांना एकटेपणा देऊन जाते.

हेही वाचा…मनातलं कागदावर : शेवटचे घरटे माझे…

मुलांची लग्नं होतात. आयुष्याच्या संध्याकाळी कोणी तरी जाणार आणि कोणी तरी मागे राहणार हे तर नक्कीच असतं. पण जेव्हा नवरा जग सोडून जातो आणि बायको माघारी राहते, तेव्हा सर्वसाधारणपणे तिचे मुलांशी असलेले नातेसंबंध पक्के असल्यामुळे ती फारशी एकटी पडत नाही. जोडीदाराची उणीव राहणारच, पण घरात कामं करत राहण्यानं, नातवंडांना सांभाळताना तिचं उपयोगिता मूल्य टिकून राहतं. पण आयुष्यभर बायकोच्या पुलामुळेच ज्या नवऱ्याचा संसार जोडलेला राहतो, तो पूलच तुटला, तर मुलं, त्यांचा संसार एका किनाऱ्यावर राहतो आणि वडील दुसऱ्या किनाऱ्यावर राहतात. आयुष्यभर नोकरी केल्यामुळे फक्त त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते सामाजिक संबंध पक्के झालेले असतात, नोकरीत व्यावसायिक संबंध तयार झालेले असतात. एकदा निवृत्ती झाली की हे संबंध काही दैनंदिन आयुष्यात कामाला येत नाहीत. मग साठीच्या पुढचे पुरुष अशा परिस्थितीत दीर्घकाळ नीरसपणे, एकटेपणानं आयुष्य घालवत राहतात.

माझ्याकडे एकानं पुरुषांच्या एकटेपणाचं वर्णन केलं, ते असं- ‘दर वेळेस ‘मै हूँ ना’ असं सगळ्यांना दाखवणं शक्य नाही होत. कुटुंबाला योग्य दिशा दाखवणं आणि योग्य निर्णय घेणं ही जबाबदारी खूप मोठी वाटते. शिवाय आम्ही घडून गेलेल्या गोष्टींबद्दल किंवा भावनिक गोष्टींचा खूप तार्किक पद्धतीनं विचार करतो. उपायांचा विचार करतो. त्यामुळे खूप खोल मनातले विचार कोणाला दाखवून काही उपयोगच नाही. म्हणून आम्ही बोलतही नाही. या दोन्ही गोष्टींमुळे आपण एकटेच सगळ्या गोष्टींना जबाबदार आहोत अशी भावना असते कायम!’

हेही वाचा…‘ती’च्या भोवती..! जगण्याची खोल समजूत

अशा प्रकारे संवादच कमी असल्यामुळे अनेक पुरुषांची मैत्री दीर्घकाळ टिकत नाही. काही मित्रांचे ग्रुप टिकतात, पण जवळचा घनिष्ठ मित्र असेलच असं नाही. (अर्थातच याला अपवाद आहेत.) स्त्रिया मात्र शेजारणीलासुद्धा मैत्रीण करून मोकळ्या होतात. ‘ऐकून काय करायचंय?’ हा प्रश्न स्त्रियांना नसतोच मुळी. मैत्रीण किंवा बहिणीनं फोन करून त्रागा व्यक्त केला की समोरच्या स्त्रीनं ‘हो का गं?… किती दगदग होतेय तुझी! काळजी घे गं!’ असं बोलून तिला थोडी सहानुभूती दाखवली, तरी तिला ते पुरेसं असतं. हे स्त्रियांना माहीत असतं, पण पुरुष मात्र ‘सांगून काय उपयोग आहे?’ याचा विचार करून व्यक्तच होत नाहीत. ‘हार्ट टू हार्ट’ संवादच झाला नाही, तर मग जवळचे मित्र तयारच कसे होतील? पुरुषाचा एकटेपणा हा खूप गुंतागुंतीचा विषय आहे. कधी परिस्थितीतून, कधी सामाजिक धारणांमधून, तर कधी नातेसंबंधांमधून तो आलेला आहे.

यावर मात करायची असेल, तर अशा पुरुषांना हे लक्षात ठेवावं लागेल, की जरी तुम्ही ‘भरभक्कम’, ‘स्ट्राँग’, ‘खूप विचारी’ वगैरे असाल, तरी तुम्हालाही भावना आहेत. त्या जपण्याचा, व्यक्त करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. वेळच्या वेळी मदत घेण्यानं कोणी लहान होत नाही. समाजाच्या धारणा चुकीच्या असतील तर समाजाला बदलावं लागेल. त्यासाठी तुम्ही त्या धारणांना पूरक वागण्याची गरज नाही.

हेही वाचा…सांदीत सापडलेले.. ! भावना पालकत्वाची!

तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप जबाबदाऱ्या पार पाडता, पैसा कमावता. उत्तम मानसिक स्वास्थ्य, कुटुंबाचं प्रेम, निखळ मैत्री मिळणं हा तुमचाही हक्क आहे. पण त्यासाठी हात तुम्हालाच पुढे करावा लागेल. आणि तोही मुलं अगदी लहान असल्यापासून जाणीवपूर्वक नातं वाढवावं लागेल. मग तुम्हीही कुटुंबाच्या गटात नक्की सहभागी होऊ शकाल.

trupti.kulshreshtha@gmail.com