डॉ. अंजली जोशी
एकुलती एक लेक आईबाबांची लाडकीच! त्यामुळे तिनं आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आई-बाबांना सांगणं, त्यांचा सल्ला घेणं साहजिकच. मुलीचं लग्न झाल्यावरही तिचं आपल्या आई-बाबांची सतत चौकशी, काळजी करणं, हेसुद्धा समजण्यासारखं. पण जेव्हा प्रेमाचं हे नातं मुलींच्या संसारात सततची, अति ढवळाढवळ करतं तेव्हा?.. अशा स्थितीतल्या नवऱ्याची व्यथा म्हणजे ‘काहीही बोललं तरी भांडणास कारण,’ अशीच! यावर सापडेल का उपाय?
बेल दोनदा वाजवूनही दरवाजा उघडला नाही, तेव्हाच कळून चुकलं की तन्वी व्हिडीओ कॉलवर आईबाबांशी गप्पा मारण्यात मग्न आहे. ऑफिसमधल्या गमतीजमती तन्वीशी शेअर करण्याची आलेली ऊर्मी क्षणार्धात विरून गेली. पूर्वी तन्वीच्या माहेरी सततच्या फेऱ्या असायच्या, आता त्या कमी झाल्या तर भरपाई करायला फोन! तन्वीचे आईबाबाही फोनवर बोलण्यासाठी मी ऑफिसमधून घरी येण्याचाच मुहूर्त नेमका शोधून काढतात. माझा अगदी तिळपापड झाला.
लॅच-कीनं दरवाजा उघडून मी थेट बेडरूममध्येच शिरलो. वेगळं राहत नसतो, तर आईबाबाबांनी कसं हातातलं काम बाजूला टाकून स्वागत केलं असतं. आईनं चहाचा कप हातात ठेवला असता! या बाईसाहेबांना मात्र मी घरात आलो काय, नाहीतर घराबाहेर गेलो काय, काहीच फरक पडत नाही. स्वत:च स्वत:शी बोलायचं, स्वत:च सगळं करायचं! मग थांबायचं तरी कशाला घरात? वॉकिंग शूज चढवत मी बाहेर पडलो. मनात विचारांची गर्दी उसळली होती. तन्वीला अनेकदा सुचवूनही पाहिलं, की मी येतो त्याचवेळी आईबाबांना फोन करू नकोस म्हणून! त्यावर ती फणकारली, ‘‘यश, अरे आईला ऑफिसमधून आल्यावर फक्त तेवढाच वेळ मोकळा असतो. तू का नाही धीर धरू शकत? लगेच पळतोस बाहेर!’’
‘‘म्हणजे तू बिझी असलीस तरी मी दुसरं काहीही न करता हातावर हात ठेवून तुझा फोन संपण्याची प्रतीक्षा करत राहायची? हेही आईबाबांनीच सांगितलं असेल तुझ्या!’’ मी वैतागून म्हणालो.
‘‘हे बघ, माझ्या आईबाबांना यात ओढू नकोस. आणि तुझ्या आईबाबांचं सांगू का? पूर्वीच्या बायकांसारखं नवरा ऑफिसमधून आला की सजून-धजून स्वागत करायचं आणि चहाचा कप हातात ठेवायचा, असल्या जुनाट कल्पना अजूनही त्यांच्या डोक्यात आहेत. तू का नाही त्यांना त्या सुधारायला सांगत?’’ तन्वीचा तोफखाना सुरूच होता. तन्वी कितीही फणकारली तरी माझा तिच्यावर जीव आहे. पण ती सारखं ‘आई-बाबा’ करत बसते, ते मात्र माझ्या डोक्यात जातं. तिचे आईबाबा तन्वीपाशी खोदून खोदून चौकशा करत राहतात. मग
तन्वी खाण्यापिण्यापासून ते कोण काय बोललं, इथपर्यंत घरातली प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट त्यांच्याशी शेअर करत राहते. नुसतं शेअर करण्यावर हे थांबत नाही, तर ते तिला नको ते सल्ले देत बसतात. मी इनव्हेस्टमेंट कुठे करावी हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात यांना ढवळाढवळ करण्याची गरज काय? तन्वीला सांगण्याचा प्रयत्न केला तर ती लगेच म्हणाली, ‘‘माझे बाबा बँकिंग क्षेत्रातलेच आहेत ना? त्यांच्या सल्ल्यानं इनव्हेस्टमेंट केली तर आपली बचत नाही का होणार? बाहेरच्या माणसांकडून पैसे भरून गुंतवणूक करण्याबद्दल सल्ला घेण्यापेक्षा घरातलीच व्यक्ती चांगली नाही का?’’ नक्कीच तिच्या आईबाबांनीच ही पट्टी पढवली असणार. ‘यशच्या घरी तेल फारच सढळपणे वापरतात,’ असं सांगून तन्वीची आई तिचे कान भरते आणि मग थेंबभर तेल घालून तन्वीनं केलेलं कोरडं थालीपीठ माझ्या घशाखालीही उतरत नाही. पण बोलता येत नाही. नुसता तोंड दाबून बुक्क्याचा मार! ज्यात त्यात नाक खुपसून तन्वीच्या आईबाबांनी अगदी उच्छाद मांडलाय. तन्वीला समजावून सांगण्याचा मी प्रयत्नही केला. त्यावर ती म्हणाली, ‘‘तूच माझ्या आईबाबांबद्दल भलतेसलते ग्रह करून घेतले आहेस! आणि सांगू का, तुझ्याही डोक्यात तुझे आई-बाबा असतात. फक्त तू बोलून दाखवत नाहीस. मी बोलून दाखवते, एवढाच फरक.’’
‘‘हो, पण कुठे थांबायचं आणि काय सांगायचं, याची सीमारेषा मला कळते. तुझ्यासारखं नाही, की उचलला पाय, चालली माहेराला!’’ मी टोला हाणला.
‘‘यश, माझं आणि आईबाबांचं अगदी युनिक रिलेशन आहे. आई तर मला मैत्रिणीसारखी आहे. मी तिच्यापासून काहीच लपवत नाही. माझ्या मैत्रिणींची त्यांच्या आईबाबांबरोबर किती धुसफूस चालायची! तशी माझी एकदाही झाली नाही. मैत्रिणी म्हणतात, तुझे आईबाबा ग्रेट आहेत. पण प्रत्यक्ष नवरा मात्र त्यांचा दुस्वास करतो, याचं किती वाईट वाटतं मला!’ ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली. मग मी विरघळलो. पण मनात आलं, ‘एवढे तुझे आईबाबा ग्रेट आहेत, तर भावनिक स्वावलंबन त्यांनी तुला शिकवलं नाही का? त्यांचा ‘इगो’ जागता राहाण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून राहण्याची सवय लावलीय त्यांनी तुला!’ पण मनातले शब्द मी ओठांवर आणले नाहीत. कारण अजूनच भडका उडाला असता. तरी कशा ना कशावरून तरी, वादाच्या ठिणग्या पेटतच राहिल्या आणि वादाचा केंद्रबिंदू असायचा, तन्वीचे आईबाबा!
मध्ये एकदा तन्वी म्हणाली, ‘‘आई पुढच्या महिन्यात रिटायर्ड होतेय. तिला फंडाची चांगली रक्कम मिळणार आहे. त्यात बाबांच्या निवृत्तीफंडाची भर घालून ते पैसे जागेत गुंतवावेत असा त्यांचा विचार आहे. आता राहतात ती जागा जुनी झाली आहे. नवीन जागा एवीतेवी घ्यायचीच असेल, तर ती तुमच्याच जवळच घेऊ,’’ असं आई म्हणत होती. हे ऐकून माझा मस्तकशूळच उठला. मी चिडून म्हटलं, ‘‘जवळपास कशाला? आपल्या घरातच राहाण्याचं आमंत्रण दे ना त्यांना! नाही तरी तू सदानकदा माहेरी पळतच असतेस. म्हणजे चोवीस तास तुला आईबाबा भेटतील.’’ मग नेहमीप्रमाणे तिनं हुकमाचं पान बाहेर काढलं, ‘‘मी लग्नाआधीच सांगितलं होतं ना, की मी आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांची काळजी मला घ्यायलाच लागणार!’’ ‘‘अगं, मी कुठे नाकारलंय ते? तुझ्या आईबाबांची जबाबदारी पुढे घ्यायला लागेल, ही तुझी अट मी मान्य केलीय ना! जर ते परावलंबी असतील तर तो प्रश्न येतो. आता धडधाकट असताना नाही. आणि जबाबदारीचा अर्थ असा नव्हे, की घरातली प्रत्येक लहानसहान गोष्ट तू आईबाबांना सांगावीस. मग ते त्यावर सल्ले देणार. म्हणजे तुझे आईबाबा रिमोट कंट्रोलवरुन आपल्या घरी ढवळाढवळ करणार!’’ मी पण चिडीला पेटलो.
मग अनेक दिवस आमच्यात अबोला होता. एक दिवस ऑफिसमधून घरी आलो, तर तन्वीचे आईबाबा भेटायला आले होते. तिची आई म्हणाली, ‘‘यश, अरे तन्वी आमची एकुलती एक मुलगी आहे. तिला बोलावसं वाटलं तर ती आमच्याशिवाय कुणाशी बोलणार? ’’ मग मीही मनातलं बोलून टाकलं. मुलीच्या संसारात किती लुडबूड करावी याची मर्यादा त्यांना कळत नसेल, तर मी तरी खोटय़ा सौजन्याचा आव कशाला आणू? मग ते म्हणाले, ‘‘आमच्यामुळे तुझ्यात आणि तन्वीत भांडणं होत असतील तर तन्वीच्या माहेरच्या फेऱ्या कमी कशा होतील ते आम्ही पाहतो.’’ तेव्हापासून तन्वीचं माहेरी जाणं कमी झालंय. पण त्याऐवजी सकाळ-संध्याकाळ फोन चालू झाले आहेत. म्हणजे एकूण एकच! प्रत्यक्ष जाणं नाही, पण मनानं तिथेच असते. आणि त्याबद्दल काहीही म्हटलं की माझ्यावर सोडायला ठेवणीतलं अस्त्र आहेच- ‘‘मी बघ कसा माझ्यात बदल केलाय!’’ तन्वीचं आणि माझं खरंतर अनेक गोष्टींत जुळतं. आम्हाला एकमेकांचा सहवास आवडतो. आम्हाला एकमेकांबरोबर घालवायला वेळ मिळतो, पण मिळालेला वेळ आम्ही ‘क्वालिटी टाइम’मध्ये परिवर्तीत करू शकत नाही. कारण कुठलंही बोलणं सुरू केलं की तिच्या आईबाबांवर हमखास घसरतं. आमच्या दोघांच्या नात्याबाबत सुसंवाद होत नसेल, तर ते नातं फुलणार कुठून?
नवरा-बायकोचा एक खासगी अवकाश असतो. तो खास असतो. त्यावर पालकांनी अतिक्रमण केलं, तर तो विस्कळीत होतो. तन्वी स्वत:ला आईवडिलांपासून वेगळं काढू शकत नाही. तिला वाटतं की त्यांच्याशी तिची किती घट्ट जवळीक आहे! तिचं इतकं ब्रेनवॉशिंग झालंय, की दैनंदिन गोष्टी शेअर न करताही अनेक पातळय़ांवर आपण पालकांशी जोडले जाऊ शकतो, हे तिला समजत नाही आणि हे तिला कसं सांगायचं हे मला उमगत नाही..घरी पोहोचलो, तर तन्वी फुरंगटून बसली होती. ‘‘यश, माहेरी कमी जाण्याचा दिलेला शब्द मी पाळलाय. पण तू मात्र माझ्या आईबाबांबद्दलचा आकस कमी करत नाहीस. म्हणजे तू स्वत:त काहीच बदल करत नाही. मी मात्र त्यांच्याशी नातं संपवावं असं तुला वाटतं.’’
‘‘नातं संपवायला नाही, तर ते बदलायला सांगतोय. तू त्यांच्या एवढय़ा प्रभावाखाली आहेस की स्वतंत्र विचार करू शकत नाहीस. ज्यात त्यात आई-बाबा करत बसतेस.’’ ‘‘मी आई-बाबा करते, म्हणून मला नावं ठेवतोस, पण तू काय करतोस? ज्यात-त्यात माझ्या आईबाबांचा संबंध शोधत बसतोस. तुला खरंतर काउन्सिलिंगची गरज आहे, हे आईबाबा म्हणतात ते बरोबरच आहे.’’ आता मात्र माझा राग ओसंडून वाहू लागला. ‘‘तुझ्याच आईबाबांना पहिल्यांदा पाठवलं पाहिजे काउन्सिलरकडे, मुलीच्या संसारात लुडबूड करू नये याचे धडे घ्यायला!’’ मी चिडून खोलीत निघून गेलो. पण मला मोठय़ानं ओरडून सांगावंसं वाटत होतं- ‘‘लग्न झालेल्या आणि लग्न होणाऱ्या मुलींच्या समस्त मात्यापित्यांनो, तुमची मुलगी कितीही लाडकी असली तरी तिला तुमच्या हातातलं कळसुत्री बाहुलं बनवू नका! तिला निर्णय घ्यायला समर्थ बनवा, तुमच्यावर अवलंबून राहण्याची सवय मोडून काढा. तुमच्या हस्तक्षेपशिवाय नवरा-बायकोचं नातं फुलायला अवकाश द्या. तुम्हाला स्पेसची गरज नसेल कदाचित, पण जावयाला आहे हे लक्षात घ्या. म्हणून म्हणतो- वेळेवर निवृत्त व्हा. फक्त नोकरीतून नाही, तर लाडक्या लेकीशी अतिजोडलं जाण्यातूनही!’’