शोभना कसबेकर
सकाळी सकाळीच दरवाजात सुहास आणि प्रियाला पाहून मी दचकलेच. दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून काही तरी गंभीर प्रकरण असावं हे जाणवलं.
सुहासची आई मालू माझी खास मैत्रीण. गेल्याच आठवड्यात मालू घरात पाय घसरून पडली, नि तिच्या कमरेची दोन हाडं मोडली. एवढ्या उतारवयात शस्त्रक्रिया करणं धोक्याचं असल्याचं डॉक्टरांना वाटत होतं. त्यामुळेच आधाराशिवाय सध्या तरी त्यांना काहीच करता येणार नाही, असं त्यांनी निदान केल्यावर घरचे सर्व जण अस्वस्थ झाले. खरं तर मालूमुळेच तिच्या सुनेची, श्रेयाची नोकरी आणि छोट्या नातीचं, स्पृहाचं संगोपन व्यवस्थित चाललं होतं. आणि अचानक हे संकट उभं राहिलं होतं. पुढं काय करायचं? हा प्रश्न मनाला सतावत होता. यासाठीच ती दोघं आज माझ्याकडे सल्ला घ्यायला आली होती.
‘‘मावशी, आम्ही दोघांनीही खूप विचार केला गं! मी एकुलता एक मुलगा असल्यानं दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाही आम्हाला. आम्ही आईला वृद्धाश्रमात, पनवेलला ठेवायचं ठरवलं आहे. दूर असली तरी सगळी जबाबदारी आम्ही घेऊ,’’ एका दमात सुहासनं आपलं अपराधी मन मोकळं केलं. हे ऐकताना मात्र प्रियाचा बांध फुटला होता. तिला रडू आवरत नव्हतं. तिला जवळ घेऊन मी शांतपणे दोघांना समजावलं. ‘‘हे बघा, तुम्ही दोघांनी हा जो निर्णय घेतला आहे तो सगळ्या गोष्टींचा विचार करूनच. कारण तुम्ही दोघं नोकरदार. किती दिवस सुट्टी घेणार? मात्र लक्षात ठेवा, मालूचे हाल होत नाहीत ना हे बघण्याचं तुमचं कर्तव्य आहे. यासाठी शरीरानं जरी शक्य नसलं तरी मनानं मात्र तिच्या जवळ राहायचं आहे.’’ हे आश्वासन देत दोघांनी माझा निरोप घेतला. आणि मी समाधानानं सुस्कारा सोडला.
‘पालकत्व’ या प्रश्नाने आता गंभीर वळण घेतलंय. मुलं एकेकटी असल्याने त्यांना आपल्या वयस्कर पालकांचं ‘पालकत्व’ घ्यावं लागत आहे. अनेकदा तर ते परीक्षा घेणारं ठरत आहे. यापुढे तर कामाच्या व्यग्रतेत काळानुसार ते शक्य होईल का हा प्रश्नच आहे, याला कारण धावपळीचं जीवन आणि ज्येष्ठांचं वाढत चाललेलं आयुष्यमान. त्यामुळे नाइलाजाने अनेकदा वृद्धाश्रमाचे पर्याय स्वीकारावे लागतात.
हल्लीच आम्हा मैत्रिणींना एका वृद्धाश्रमाला भेट देण्याची संधी मिळाली. खरं तर जाताना मनावर दडपणच होतं. सर्वांचा प्रतिसाद कसा मिळेल ही मनाला धास्तीही होती. पण प्रत्यक्षात मात्र वेगळाच ह्रदयस्पर्शी अनुभव घेऊन आम्ही परतलो. धन्य झालो. तिथे पोचल्या पोचल्या सगळ्यांनी अगदी उत्साहानं टाळ्या वाजवत आमचं स्वागत केलं. आम्ही सर्वांसाठी खाऊ घेऊन गेलो होतो. ते पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे फुललेले भाव पाहून आम्ही अवाकच झालो. कुणी तरी आपल्यासाठी आठवणीने काही घेऊन आलंय याचा तो आनंद असावा. काहींच्या घरच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या असाव्यात. भावूक झाली मनं त्यांची. तरीसुद्धा अगदी मजेत सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत फराळाचा आस्वाद घेतला हे विशेष. आमचेही डोळे पाणावले. सगळ्यांसाठीच हा सुखद अनुभव आत्मविश्वास वाढवणारा होता. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या गप्पांनी वातावरण हलकंफुलकं झालं होतं. त्यात कमालीचा समंजसपणा, एकतेची भावना होती. अर्थात काहींचे तक्रारीचे सूरही ऐकू येत होते. स्वातंत्र्य गमावल्याची खंतही दिसत होती. असं असलं तरी त्या सगळ्यामध्ये जुळवून घ्यायची जी मनाची ताकद होती ती जगण्यासाठी पुरेशी होती.
‘संवादा’च्या तासाला शांताकाकूंनी आपला जीवनप्रवास खडतर असूनही शांतपणे सांगितला. काका-काकींनी ऐन पन्नाशीत आपल्या एकुलत्या एक पंचवीस वर्षांच्या मुलाला अपघातामध्ये गमावलं होतं. एवढं मोठं दु:ख बाजूला सारून त्या दोघांनी आपलं उर्वरित आयुष्य समाजसेवेत घालवलं. काका गेल्यानंतर ठरल्याप्रमाणे गेल्या वर्षी त्या या वृद्धाश्रमात राहायला आल्या. इथे आल्यावर जीवनमान बदललं तरी चेहऱ्यावरचं समाधान मात्र द्विगुणित झालं होतं. कुणाकडून कसली अपेक्षा नाही, वर्तमानाला जुळवून घ्यायची मनाची ताकद कौतुकास्पद होती. इथंही त्यांनी समाजकार्य चालूच ठेवलं होतं. वृद्धाश्रमातल्या सर्वांनाच शांताकाकूंचा केवळ आधारच नव्हे, तर अभिमानही वाटत होता. त्यांनी जपलेल्या स्वत:च्या तब्येतीमुळेच हे त्यांना शक्य होतं. जड मनानं आम्ही सर्वांचा निरोप घेतला तो हा क्षण मनात जपून ठेवण्यासाठी. आमच्या ज्ञानात भर पडली होती, व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अभ्यासण्याची, आत्मनिरीक्षण करण्याची संधी आम्ही मिळवली होती.
‘बागवान’ हा चित्रपट २००३मध्ये प्रदर्शित झाला तो जबरदस्त प्रतिसाद मिळवतच. विषय हाच, घरातल्या ज्येष्ठांचं स्थान. २० वर्षांपूर्वी आजच्यासारखं वृद्धाश्रमात जाणं सहज नव्हतं, हे लक्षात घ्यायला हवं. या चित्रपटात पालकांना स्वत:च्या मुलांनी दिलेली कठोर वर्तणूक सगळ्यांच्याच मनाला झोंबली होती. पण दत्तक मुलानं दिलेला मदतीचा हात लक्षात राहून गेला होता. मुलगा हा वंशाचा दिवा मानणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीला शंकांनी घेरलं. आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या पालकांनी मुलांवर अवलंबून राहावं का? या प्रश्नानं मनात नकारात्मक भावना तयार झाली. एक मात्र नक्की की कुठे तरी हा विषय सगळ्यांना स्पर्शून गेला.
मला वाटतं, जीवनात प्रचंड मौज आहे. या जीवनात बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य ही तीन दालनं आहेत. या दालनात आपल्या वाट्याला सुख-दु:ख येणारच. अशा वेळी रडत बसण्यापेक्षा सुखाचे क्षण आठवले तर जीवनाचा खरा आनंद उपभोगू शकू.
shobhana.kasbekar@gmail.com