सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनं सुदृढ समाजमन गरजेचं आहे, म्हणून समूहानं ठरवलेली प्रत्येक गोष्ट वाईट नक्कीच नसली, तरी समूहाची मानसिकता समजून वागता यायला हवं. आपण आपल्याही नकळत एका सामुदायिक मेंदूचा, सामूहिक विचाराचा भाग झालेले असलो, तरीही आपल्या जिवापेक्षा, विचारांपेक्षा, नीतिमूल्यांपेक्षा, आपल्यावरच्या संस्कारांपेक्षा, एका जमावाचा निर्णय आपल्याला अनेकदा मोठा का वाटतो?
असं म्हणतात की, हिटलरनं त्याची राजकीय कारकीर्द फार अभ्यासपूर्वक, जाणीवपूर्वक घडवली. ‘हिटलर- एक करियर’ यासारख्या असंख्य माहितीपटांमधून हे दिसतं. त्या काळात समाजमाध्यमं नव्हती. सामान्य माणसासाठी दळणवळणाची साधनंही मोजकीच होती. तरीही त्या विशिष्ट कालखंडात प्रचंड मोठ्या समुदायानं हिटलरच्या विचारसरणीचं अंधानुकरण केलं. हे त्यानं कसं घडवून आणलं, तर म्हणे जिथे सभा असायची, त्याच्या आदल्या दिवशी हिटलरची माणसं त्या त्या भागातल्या दारूच्या गुत्त्यांमध्ये जाऊन बसायची आणि आजूबाजूला बसलेल्यांचं बोलणं ऐकायची. तिथे बसलेली माणसं हमखास आपल्या आयुष्यातल्या असंख्य लहानमोठ्या प्रश्नांबद्दल बोलायची, चर्चा करायची, त्यावर त्यांच्या दृष्टीने योग्य उपाय सुचवायची. हिटलरची माणसं हे सगळं त्याला सांगायची आणि दुसऱ्या दिवशीच्या जाहीर सभेत हिटलर हेच सगळे मुद्दे मांडायचा.
लोकांना वाटायचं हा कुणीतरी द्रष्टा माणूस आहे, याला आपली दु:ख, आपले विचार, आपलं आयुष्य कळलं आहे. हाच माणूस आपला नेता, आपला मार्गदर्शक म्हणून योग्य आहे, आपण याचं ऐकावं आणि हा सांगेल तसं करावं. आणि मग पुढे जेव्हा त्यानं प्रचंड नरसंहार केला तेव्हा त्याच्या विचारांवर विश्वास असलेल्यांनी डोळे झाकून तेही केलं. त्यांच्यापैकी एकालाही यात आपलं काही चुकतंय असं वाटलं नाही. जमावाची मानसिकता, संघटनेची शक्ती, समूहाचा एकत्रित विचार, या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, हे हिटलरला कळलं होतं.
‘समूहात बसून गाणी ऐकावीशी वाटली तर त्यात काय चूक आहे, शब्दांचं नादरूप असं मिळून भोगणं ही प्रत्येकाची अटळ अशी भूक आहे…’ आनंदयात्री कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणून गेले आहेत आणि हे खरंच आहे. सगळ्यांनी मिळून, एकत्र, समूहाने, घोळक्याने, गाणी ऐकणं, गाणं, जाहीर कार्यक्रमांचा आस्वाद घेणं, आवडत्या खेळाच्या मॅचेस बघणं, याची मजा काही और असते. कुटुंब, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, समविचारी, यांच्याबरोबर एकत्रितपणे काहीतरी साजरं करण्याची संधी आपण सगळे कायम शोधतच असतो. तुडुंब भरलेलं प्रेक्षागृह, गजबजलेल्या घरातले सणवार, सांस्कृतिक कार्यक्रम, सहली, या सगळ्यात ‘भरभरून जगणं’ हेच अभिप्रेत असतं. आपल्या अवतीभवती आपल्या विचारांची माणसं असणं यात सुरक्षितता असते. पण आपल्याही नकळत आपण एका सामुदायिक मेंदूचा, सामूहिक विचाराचा भाग झालेले असतो. एखादं विनोदी नाटक बघताना, ‘फारसं आवडत नाहीये पण सगळे हसतायत’ म्हणून हसणारे आपण, त्या जमावाच्या मानसिकतेचा एक भाग झालेले असतो.
गॅब्रियल टार्डे, सिग्मंड फ्रॉइड यासारख्या विचारवंतांनी आणि अभ्यासकांनी, गर्दीचा स्वभाव, समूहाचं मानसशास्त्र यावर खूप अभ्यास केला आहे. माणूस कळपात राहणारा प्राणी आहे. गुहेत राहणाऱ्या माणसाला, इतर वन्य प्राण्यांपेक्षा त्याची शारीरिक क्षमता कमी आहे याची जाणीव झाली असावी. लढायची वेळ आली तर आपला एकट्याचा निभाव लागणार नाही, एकापेक्षा दोघं आणि मग दोघांपेक्षा समूह असेल तर स्वत:चा बचाव करणं सोपं असं त्याला वाटलं असेल. कळप आला म्हटल्यावर हळूहळू त्याचे नियम आले, कायदे आले, संस्था आली, व्यवस्था आणि व्यवस्थापन आलं आणि मग अर्थातच, त्यात स्तर आले, श्रेणी आली. कोणे एके काळी माणसाला सोयीचा वाटलेला समूह इथपासून आताचा समाज… इथपर्यंत आपण आलो आहोत.
गर्दी अस्ताव्यस्त असते. पण माणसं काही कारणानं एकत्र आली की त्यांचे गट, समुदाय, चमू, जमाव, समूह, टोळी, झुंड, यातलं काहीतरी होतं. यांचाच समाज होतो. समाज हा त्या समूहाचा आचारविचार आणि संस्कृति या सगळ्याचा आरसा होतो.
पण गेला काही काळ… किंवा मी हा विचार करायला लागल्यापासून मला एकूणच जमावाची थोडी भीतीच वाटायला लागली आहे. जमावाचं, घोळक्याचं, समूहाचं मन आणि त्यातल्या उलाढाली एकेकट्या माणसांपेक्षा वेगळ्या असतात. माणसाला सद्सद्विवेकबुद्धी आहे असं आपण गृहीत धरतो. किंबहुना इतर प्राण्यांपेक्षा माणूस वेगळा ठरतो, त्याच्या बुद्धीमुळे आणि विवेकी विचारामुळे. पण जमावाला विवेक असतोच असं नाही.
२०१२ मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या ‘निर्भया’ प्रकरणानं मी अत्यंत व्यथित झाले होते. कुणीही व्यथित व्हावं अशीच ती बातमी होती. राहून राहून सतत मला एक प्रश्न भेडसावत होता, की त्या सहा गुन्हेगारांपैकी एकालाही त्या वेळी, त्या क्षणी, त्या परिस्थितीत ‘आपलं काहीतरी चुकतंय’ असं वाटलं नसेल? एकाच वेळी सगळ्यांचे कान इतके बंद झाले असतील की त्यांना त्या मुलीच्या किंचाळण्याचे, वेदनेचे आवाज ऐकू आले नसतील? त्यानंतर पाहिलेल्या ‘बीबीसी’च्या माहितीपटामध्ये त्यांनी ज्या शांतपणे उत्तरं दिली होती त्यावरून त्यांना तसं वाटलं नव्हतं हे उघड दिसलंच. १९७८ मध्ये अमेरिकेत जिम जोन्स नावाच्या एका तथाकथित गुरूच्या सांगण्यावरून त्याच्या९१८ अनुयायांनी एकाच वेळी आत्महत्या केली. स्वत:चं शील वाचवण्यासाठी जोहार केलेल्या राण्या नव्हत्या त्या, किंवा स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता लढलेले वीर नव्हते ते. स्वैराचाराचं समर्थन करणाऱ्यांचा कळप होता तो. बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्याकांडाच्या वेळी आरोपींनी हसत हसत काढलेले फोटो बघून तर अक्षरश: मेंदू बधिर झाला.
कोणतीही ‘ट्रू क्राइम सिरिज’ बघा. ‘गँग’ने केलेले गुन्हे खूप असतात. समाजमाध्यमांवर अनेकदा असंख्य स्वघोषित गुरूंच्या समोर हजारोंच्या संख्येनं बसलेली माणसं दिसतात. उपचारांच्या नावाखाली अतिशय हिडीस प्रकार चालू असतात. हे सगळं बघून नेहमी असं वाटतं की एकाच वेळी एकाहून अधिक माणसांचे मेंदू संमोहित झाल्यासारखे विचारशून्य आणि अविवेकी का होत असावेत. स्वत:च्या जिवापेक्षा, नीतीमूल्यांपेक्षा, संस्कारांपेक्षा, एका जमावाचा निर्णय का मोठा वाटतो. एकदा सोलोमन या शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला. या प्रयोगात सहभागी माणसांना त्यानं काही रेषा दाखवल्या आणि त्या रेषांची लांबी मोजायला सांगितली. तात्पर्य हे निघालं की, अनेकांना योग्य उत्तर येत असूनसुद्धा, केवळ इतरांच्या उत्तराशी आपलं उत्तर जुळावं म्हणून अनेकांनी चुुकीचं उत्तर दिलं. माणसं, आपल्या विचारांवर विश्वास नाही म्हणून, समूहाच्या दबावाला बळी पडून किंवा आपण वेगळे पडू या भीतीनं, आपले विचार बदलतात. विचार करण्यापेक्षा अनुकरण करणं सोपं असतं. इतिहास हेच सांगत आला आहे की काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतांश पुढाऱ्यांना स्वत:हून विचार करणारी माणसं नको असतात. येनकेनप्रकारेण ते जमावाला आपल्या काबूत ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि जमाव ते स्वीकारतो. टोळीच्या विरोधात जाणं यात जिवाची भीती असते. त्यामुळे प्रसंगी मन मारून का होईना पण लोक जमावाचा एक भाग होतात. शिवाय जमावात कुणा एकावर जबाबदारी घेण्याची वेळ येत नाही. लपता येतं, दुसऱ्यावर जबाबदारी ढकलता येते. कातडीबचाऊपणा करता येतो.
संधीचा फायदा घेऊन आपला राग, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करता येतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे समाजमाध्यमावरचं ‘ट्रोलिंग’. चेहरे नसलेली तिथली माणसं कुणालाही काहीही बोलू शकतात. दहा जण एकाला वाईट बोलत असतील तर अकरावा पुढे सरसावतो, त्याला संपूर्ण संदर्भसुद्धा माहीत नसला तरी वाहत्या नदीत हात धुऊन घेतो. ज्या वेगाने मोबाइल फोनवरून अफवा पसरतात, ते बुद्धी बाजूला ठेवून प्रवाहात वाहत जाण्याचंच लक्षण आहे.
समूहाच्या मानसिकतेत भावना एक तर अतिटोकदार किंवा पूर्ण बोथट होतात. समूहात माणसाची धैर्य किंवा शक्तीची जाणीव प्रमाणाबाहेरची असते. आपण संख्येनं अधिक आहोत, त्यामुळे आपल्याला आता काही भीती नाही, असं वाटत असल्यामुळे, मनाला असलेली नैतिकतेची, चांगुलपणाची, सगळी बंधनं गळून पडतात. गंमत म्हणजे जी ओळख कमावण्यासाठी आपण आयुष्यभर प्रयत्न करतो तीच आपण या गर्दीत हरवून बसतो. आपण कुण्या एका गटाचे सदस्य म्हणून ओळखले जातो. त्या विचारधारेशी आपण सहमत आहोतच असं गृहीत धरलं जातं. तुलनासुद्धा, व्यक्तीची व्यक्तीशी नाही, गटाची गटाशी होते.
कधी कधी आपल्यासारखाच विचार करणारे अनेक आहेत, याचं कुठे तरी समाधानही असतं. अन्याय होतोय हे कळत असलं तरी तो होणारा मी एकटा नाहीये, राग येणारा, भीती वाटणारा, हतबल होणारा मी एकटा नाहीये, हा विचार आश्वस्तही करतो. समविचारी माणसांनी एकत्र येण्यात काहीच गैर नाही. त्यातली लोकशाही टिकून राहणं महत्त्वाचं आणि अवघडसुद्धा असतं. एकट्याचा विरोध प्रभाव पाडणार नाही, मोर्चा संघटित असला तर मात्र तो परिणामकारक असण्याची शक्यता जास्त. वेगवेगळ्या कारणांनी लोक आपापले गट तयार करतात. एकाच वर्गात जाणाऱ्या मुलांचे पालक, शेजारी, छंदवर्गात भेटणारे, व्यायामशाळेत जाणारे, काहीतरी समान असणारे भेटले, आणि सातत्याने भेटत राहिले, की आपसूक एक गट तयार होतो आणि मग त्या गटाचा एक स्वभाव घडून जातो. चुकून एखादा त्या स्वभावाशी मेळ न खाणारा त्या गटात असलाच, तर त्याला इतरांशी जुळवून घेणं त्रासदायक होतं पण त्यातून सुटणं जमतंच असं नाही. आणि मग ही अशी ‘सुटता न आलेली’ माणसं वर्षानुवर्षं इतरांशी खोटं वागत त्या गटात जगत राहतात.
आपल्या रोजच्या जगण्यात, आपण आपल्या विचारांनी किती चालतो, आणि ‘चार माणसं म्हणतायत म्हणून’ किती गोष्टी करतो, याची एक यादी केली तर आपला आपल्यालाच धक्का बसेल. समूहानं ठरवलेली प्रत्येक गोष्ट वाईट असं नक्कीच नाही, शेवटी सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनं सुदृढ समाजमन गरजेचंच आहे. पण आपल्याला ‘लाखात एक’ व्हायचं आहे का ‘लाखातला एक’, आपला विचार कुठे संपतो आणि समूहाचा कुठे सुरू होतो, केवळ संख्याबळामुळे आपला आवाज, आपली मतं, दडपली जाणार आहेत का… याचा विचार करायला हवा. समूहाची मानसिकता समजून वागता आलं पाहिजे. पाडगावकरांची कविताही पुढे हेच म्हणते, ‘डोळे मिटून मनोमय तालावर आपल्याच मनात, नाचता आलं पाहिजे!’
आपलं मन, आपला मेंदू, समूहाला गहाण टाकणं म्हणजे आपल्या अस्तित्वाचा अंतच नाही का!