योजना यादव
हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या ‘मिस वर्ल्ड’ सौंदर्यस्पर्धेतून माघार घेत ‘मिस इंग्लंड’ मिला मॅगी मायदेशी निघून गेली, मात्र जाताना तिने केलेले आरोप एकूणच या स्पर्धेतील व्यापारीकरणाकडे बोट दाखवतानाच बाईच्या शरीराकडे बघणाऱ्या उपभोक्तावादी नजरेकडेही लक्ष वेधतात. अर्थात मिलाच्या आरोपांवर आक्षेप आहेत; त्यातली सत्यासत्यता काळच ठरवेल, पण पुरुषांच्या नजरेनं बाईला असुरक्षित वाटणं, हे अनादी काळापासूनचं वास्तव आहे. सौंदर्य निर्भेळ नजरेनं बघता येतं का हा त्यातला खरा प्रश्न आहे…
मला वेश्येप्रमाणे वागवल्यासारखं वाटलं…’ हे वाक्य वाचल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? विशेषत: तुम्ही बाई असता तेव्हा. अशा वेळी आपल्या आत दडवलेले काही छुपे प्रसंग डोकं वर काढू शकतात. कधी एखाद्या बहिणीनं अनुभवलेला, कधी मैत्रिणीनं, कधी काकू, मामी, मावशी, आई, किंवा आणखी कुणीही. एक प्रचंड हतबल शिरशिरी अंगभर व्यापली जाते. आपल्या शरीराला गृहीत धरलं जातं, यातली हतबलता अनुभवणं ही पहिली भावनिक प्रतिक्रिया. जे शरीर मिरवावंसं वाटावं, त्याबाबतच घृणा वा लज्जा वरचढ व्हावी ही हतबलता.
तर हेच वाक्य उच्चारत ‘मिस इंग्लंड’
मिला मॅगीनं भारतात आयोजित केलेल्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतून माघार घेतली आणि आपला मायदेश गाठला. मिला मॅगीच्या या विधानाबाबतच्या पहिल्या प्रतिक्रियेच्या पुढे गेलं की मात्र असंख्य संमिश्र भावनानुभवांचं एक जाळंच समोर येतं. त्यात ‘शो बिझनेस’ मधल्या बाईच्या शरीरासंबंधीचा उपभोक्तावाद ते सामाजिक जडणघडण, या विविध पातळ्यांवर याकडं पाहावं लागतं. तर सौंदर्य आणि लैंगिकता यातल्या निर्विवाद गुंत्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? ‘मिस वर्ल्ड’सारख्या स्पर्धांनी सौंदर्य स्पर्धांना सामाजिक बांधिलकीचं परिमाण दिलं, हे खरं असलं तरी हेच वाक्य ‘मिस वर्ल्ड’नं सामाजिक बांधिलकीला सौंदर्याचं परिमाण दिलं- असंही होऊ शकतं. त्यातूनच एक व्यवस्था उभी राहिली. त्यात व्यापारानं उघड प्रवेश केला. अर्थात बाईच्या शरीराकडे आकर्षणारी इच्छाच या बाजाराला खतपाणी घालत गेली. ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतल्या बिकनी राऊंडच्या समावेशानं उठलेलं वादळही याच व्यवस्थेचं दुसरं रूप होतं. त्या बिकनीवर नंतर कपड्यांचे निरनिराळे थर जमत गेले. पण मुळात बाईचं शरीर आणि त्या शरीराभोवती फिरणारी भावनिक वलयं हेच एखाद्या गोष्टीचं केंद्रस्थान असेल, तिथं उपभोक्तावादी नजरा कशा टाळायच्या?
भारतातील आयोजनाबाबत मिलानं जे आक्षेप नोंदवले त्यांचं आयोजकांनी पूर्णत: खंडन केलं आहे. त्याची पडताळणी गरजेची आहेच, पण ते नाकारता येईल का? मिलानं केलेल्या आरोपानुसार देणगीदारांना खूश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सौंदर्यवतींना अशी वागणूक मिळत असेल तर ते अनेक पातळ्यांवर लज्जास्पद आहे. यातून भारतीय व्यवस्थेतील स्त्रीदेहाबद्दलची संकुचित धारणा तर अधोरेखित होतेच, पण त्याचं थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर उघडंनागडं प्रदर्शन होतं, हेही अस्वस्थ करणारं आहे.
आपल्याकडच्या अशा अनुभवांची भरमार पाहता हे घडलंच नसेल, असंही आपण छातीठोकपणे म्हणू शकतो का? स्पर्धेच्या आयोजकांनी भलेही हे नाकारत वेगवेगळी कारणे सांगितली असली तरी, ज्याला इथल्या पुरुषी मानसिकतेची, नजरेची जाण आणि अनुभव आहे, त्याला परिस्थितीचा अंदाज नक्कीच बांधता येऊ शकतो. आपणच अशा किती गोष्टी रोज पाहतो, वाचतो, अनुभवतोच की. तेच एका वेगळ्या वातावरणात, वेगळ्या पार्श्वभूमीवर घडलंय, असंच अनेकांना वाटेल. आणि कदाचित त्यात नवं काहीच नाही असं वाटावं, इतकं बोथटपणही आपल्यात आलं असेल.
या सगळ्यावर आपण आकांत करू, पण या सगळ्याकडं पाहताना आरोपीच्या पिंजऱ्यात कुणाला बसवायचं? पुरुषांना?मानसिकतेला? जडणघडणीला? की व्यवस्थेला? याचं एक सरधोपट उत्तर असूच शकत नाही. अशा प्रश्नांकडे पाहताना जेसिका स्टर्नचं ‘डिनायल, अ मेमॉर ऑफ टेरर’ हे पुस्तक फार महत्त्वाचं वाटतं. पंधरा वर्षांची जेसिका आणि तिच्या चौदा वर्षांच्या बहिणीवर बलात्कार झाला. जेसिकाच्या आयुष्यातील कैक वर्षं त्या धक्क्यानं बरबाद केली. पण यावरचा उतारा म्हणून तिनं आपल्या बलात्काऱ्याचीच मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून तिला जे साध्य झालं त्यात पुरुषी मानसिकतेच्या अनेक छटांचं दर्शन होतं. हेच पुरुषी मानसिकतेच्या छटांचं दर्शन प्रत्येक बाईला येणाऱ्या अनुभवांशी जोडलं जाऊ शकतं. तेच कदाचित मिला मॅगीनंही अनुभवलं.
खरा मुद्दा याचं पुढे काय होईल, याचा आहे. किंवा काहीच होणार नाही, याचा आहे. कालांतरानं आणखी एखाद्या स्पर्धेत असाच वाद उफाळून वर येईल, तसाच दुर्लक्षिला जाईल. ‘शो बिझनेस’चं हे वास्तव त्यातल्या घटकांनीही मान्य केलं आहे. म्हणूनच अमेरिकी फॅशन डिझायनर आयरिस एपफेल एका वाक्यात जणू या मानसिकतेचा समाचार घेते. ती म्हणते, ‘ A woman is as old as she looks, but a man is never old until he stops looking.’ अर्थात बाई तिच्या दिसण्यातून म्हातारी वाटू शकते, पण पुरुषाची नजर जो वर अबाधित आहे, तो म्हातारा होणार नाही. अशीच पुरुषाची नजर बाईला तरुण बनवू शकते, वयस्कर बनवू शकते ते तिथून अगदी तिला वेश्येसारखंही वाटायला लावू शकते.
मुळात सौंदर्य स्पर्धा आणि बाईचं वस्तुकीकरण ( Objectification) या दोन वेगळ्या काढता येण्याजोग्या गोष्टीच नाहीत. सौंदर्य स्पर्धांमध्ये बाईच्या सर्वांगीण सादरीकरणाविषयी कितीही बोललं गेलं, तरी त्यातली सौंदर्याची विशिष्ट परिमाणं, सौंदर्याच्या विशिष्ट व्याख्या नाकारता येण्याजोग्या नाहीतच. या परिमाणांनीच तिचं वस्तुकीकरण केलेलं आहे. तिथं एखादी कमी उंचीची, नाकी-डोळी नीट नसलेली, थोडी स्थूलतेकडं कललेली, पण प्रखर बुद्धिमत्ता असलेली बाई स्पर्धेत प्रवेश तरी मिळवू शकेल का? इथूनच उपभोक्तावादी मानसिकतेची सुरुवात होते. ती नाकारणं त्या व्यवस्थेलाच शक्य नाही. बरं हे फक्त एका विशिष्ट उपभोक्तावादापुरतंही मर्यादित नाही, तर आजवर त्यातलं गलिच्छ राजकारणही समोर आलं आहे. ऐश्वर्या राय, सुश्मिता सेन, युक्ता मुखी, प्रियांका चोप्रा, डायना हेडन यासारख्या भारतीय सौंदर्यवतींनी या स्पर्धांमध्ये बाजी मारली, तेव्हा उपस्थित झालेल्या शंकाही त्या राजकारणाकडे सहज बोट दाखवतात.
अगदी अलीकडेच ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल’चा किताब जिंकणारी पहिली भारतीय रेचल गुप्ता हिचा अनुभवही तितकाच अस्वस्थ करणारा आहे. रेचलनं हा किताब स्त्रीदेहाच्या वस्तुकीकरणाच्या मुद्द्यावरच परत केला आहे. तिच्याशी झालेलं असभ्य वर्तन, नकोसे स्पर्श आणि किताब जिंकल्यानंतरही वजनासंदर्भात केल्या गेलेल्या टिप्पण्या इतक्या विखारी होत्या की तिला हा सर्वोच्च सन्मानही अर्थहीन वाटला. तिनं तब्बल तासाभराच्या व्हिडीओ क्लिपमध्ये स्पर्धेच्या आयोजकांचे वाभाडे काढले. पण यावर आयोजकांकडून आलेली उत्तरं पुन्हा तिच्या सन्मानाला नख लावणारीच होती. रेचलनं पद सोडताना थेट आरोप केला होता की, ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन’ स्त्रियांना ज्या पद्धतीने वागवते त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं शक्य नाही. या आरोपातच सौंदर्य स्पर्धांचं वास्तव लपलं आहे, ज्याकडे सोयीने डोळेझाक केली जाते.
मिला मॅगीच्या आरोपांवरही अनेक आक्षेप आहेत. तिचे आरोप नाकारले गेले आहेतच. त्यातली सत्यासत्यता काळच ठरवेल. पण पुरुषांच्या नजरेनं बाईला असुरक्षित वाटणं, हे अनादी काळापासूनचं वास्तव आहे. तो एखाद्या सौंदर्य स्पर्धेच्या व्यासपीठापेक्षाही आपल्या आसपासच्या फुटपाथवरही रोज न चुकता अनुभवास येतो. त्यासाठीचा कायमस्वरूपी इलाज शोधायचा तर बाईला पुन्हा जोखडांकडे पाठवलं जाईल. त्यामुळं बाईनंच आपल्या मानसिक बळाच्या आधारे अशा नजरांना प्रत्युत्तर देण्याची क्षमता विकसित केली तर? फरकच पडू न देण्याचं कौशल्य कमावलं तर? किंवा एखाद्या उलट्या जळजळीत कटाक्षानं समोरच्याची नजर भेदून टाकण्याचं बळ मिळवलं तर? ज्या प्रश्नांची उत्तरं बाहेरच्या भवतालात मिळत नाहीत, ती हमखास आपल्यातच दडलेली असतात. स्त्रीपुरुष संबंधांतून उद्भवलेल्या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं कदाचित आपल्यातच दडलेली असतात. अर्थात समन्यायावर आधारलेल्या प्रगल्भ समाजाची आस ठेवणं आणि त्यासाठी प्रयत्न करणंही तितकंच गरजेचं आहे. मग ते वैयक्तिक पातळीवर असो, वा चळवळींमधून. फक्त हा संघर्ष हाताळताना आपल्या भूमिका, आपली विचारधारा विवेकवादाच्या कठोर निकषांवर तपासून पाहायला हवी.
सर्वात आधी स्वत:कडं निर्भेळ नजरेतून पाहता यायला हवं. आपल्याला कसं वाटायला हवं, हे आपलं आपल्यालाच ठरवता आलं तर किती सहज होऊन जाईल सगळं!
yojananil@gmail.com