– डॉ. गीताली वि. मं.
वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या अनेक प्रश्नांना जन्म देणारी, काहींचा नव्याने विचार करायला लावणारी आहे. पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्थेमुळे विवाह संस्थेची झाडाझडती घेण्याची वेळ आली आहे का? पुरुषांना मिळणाऱ्या या सत्तेमुळेच चांगला माणूस होण्यात त्यांना अडथळे येत आहेत का? पारंपरिक पुरुषत्वाच्या पुरुषप्रधान कल्पना आणि स्त्रियांच्या बदललेल्या अपेक्षा यांच्यामुळे पुरुष गोंधळले आहेत का? त्यातून निर्माण झालेल्या असुरक्षिततेतून ते अधिक आक्रमक होत आहेत का? स्त्रिया शिकल्या, मिळवत्या झाल्या तरी त्या छळ सहन का करतात? असा प्रश्न बळी असलेल्या स्त्रियांनाच का विचारला जातो? पुरुषांना का नाही?
आपल्या सर्वांवर भांडवली उपभोगवादी बाजारू मूल्यांचा प्रभाव खोलवर पडू लागला आहे. त्यामुळे हल्ली भपकेबाज, चकचकीत, झगमगाटी आणि दणदणाटी पद्धतीनं होणाऱ्या लग्न सोहळ्यांचं वेड गर्भ श्रीमंतांपासून ते अगदी वस्ती पातळीवरील सगळ्यांनाच लागलेलं दिसतं. गैरव्यवहारातून मिळवलेला अफाट पैसा उधळणाऱ्यांचीही आज समाजमनात ‘हिरो’ ही प्रतिमा होते आहे. त्यामुळे कर्जात पार बुडून गेलो तरी चालेल, पण माझ्या मुलीचं लग्न थाटामाटातच करणार अशी ‘मर्दुमकी’ गाजवणारे बापही निर्माण होत आहेत. अर्थात मग इतका पैसा खर्च केल्यावर मुलीनं लग्नरूपी त्या मौल्यवान चकचकीत घटाचा स्फोट करून कसं चालेल? तो घट जपायलाच हवा, मग भले मुलीचा प्राण घेतला गेला, तिला तिचा प्राण द्यावा लागला तरी बेहत्तर! नुकतीच झालेली वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या हे या मानसिकतेचं एक भयावह ज्वलंत उदाहरण आहे. या आत्महत्येला प्रत्यक्षपणे तिचा छळ करणारी सासरची मंडळी जशी जबाबदार आहेत तशीच सासरी छळ होतो हे सांगितल्यावरही मरणाच्या दारात परत पाठवणारे माहेरचे लोकही जबाबदार आहेत. आणि… आपण समाजही, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अशा सोहळ्यात सामील होणारे… घटस्फोटित स्त्रियांना कमी लेखणारे, लग्नावर आधारित सौभाग्यवती, विधवा आदी उच्च-नीच उतरंड मानत त्यांच्यात भेदभाव निर्माण करणारे पुरुषप्रधान मानसिकता जोपासणारे सर्वच!
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, विद्योचे माहेरघर म्हटलं जाणाऱ्या पुण्यनगरीमध्ये गेल्या तीन वर्षांत बेचाळीस विवाहितांनी आपली जीवन यात्रा संपवली. हुंड्यासाठी आजही असंख्य विवाहितांचा छळ चालूच आहे. दारू पिऊन बायकोला मारहाण करणं हा तर नवऱ्याचा हक्कच आहे हे अशा ‘मर्दां’च्या मनात रुजलेलं आहे. सुनांना छळण्याचा वारसा आपल्या संस्कृतीचा अभिन्न भाग झाला आहे? हुंडाबंदी कायदा येऊन युगं लोटली. हुंडाबळी झाल्यावर निदर्शनं, आंदोलनं, चर्चासत्र, मुला-मुलींनी हुंडा घेणार नाही-देणार नाही, अशा शपथा घेणं असा माहोल तीसएक वर्षांपूर्वी जागोजागी होता. ‘स्त्री मुक्ती संघटने’चं ‘मुलगी झाली हो’, हे नाटक घराघरांत पोहोचलं. त्यावर चर्चा झडू लागल्या. हुंडा म्हणजे पैशांचीच फक्त देवाणघेवाण नाही, वस्तू स्थावर-जंगम मालमत्ता या स्वरूपातही तो छुप्या पद्धतीने होतो आहे हे लक्षात आल्यावर कायद्यात बदल होत गेले. समाज परिवर्तनासाठी कायदे होण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु कायदे झाले, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी अनेकदा पोलीस यंत्रणा, न्याय संस्थेत होणं खूप कठीण असतं. तसंच त्या कायद्याचं महत्त्व आम जनतेला कळून त्यांनी तो कायदा पाळणं यासाठी मानसिकता घडवणं हे तर महा कर्मकठीण आहे. सरकार नियम, कायदे बनवू शकतं, पण त्यासाठी लागणारं मानस बदलण्याचं काम परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्ते आणि चळवळीलाच करावं लागतं. मात्र अशा चळवळींना बदनाम करण्याचं पुरुषप्रधान राजकारण केलं जातं.
मनाची जडणघडण हा अतिशय गहन आणि गुंतागुंतीचा व्यवहार आहे. हजारो वर्षं चालत आलेल्या पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेला बळकटी मिळेल अशा प्रकारची स्त्री-पुरुष मानसिकता आजवर घडवली गेली. या व्यवस्थेची पाळंमुळं राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण आणि अर्थकारण यामध्ये खोलवर रुजलेली आहेत. वैष्णवी आणि इतर विवाहितांच्या आत्महत्या, वाढते हुंडा बळी, आजही सुनेचा सासरी होणारा छळ बघून काळाची चाके पुन्हा उलटी फिरवण्यात जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण जबाबदार आहे का?,असा प्रश्न मनात येतो. आणि नवउदारमतवादात ठासून भरलेल्या अतिरेकी व्यक्तिवाद, बळी तो कान पिळी ही वृत्ती आणि खुल्या बाजार पेठेच्या मूलतत्त्ववादामुळे तसंच बहुसंख्याकवादी राजकारणातून होणारा धार्मिक विद्वेष, यातून होणारा हिंसाचार, सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली स्त्रियांना पुन्हा घरात ढकलण्याचा विचार हे सर्व भयचकित करणारं समाज वास्तव निर्माण झालं आहे का, असा उद्वेगजनक प्रश्न मनात उभा राहतो. या सगळ्याला समाजाचा मूलभूत घटक कुटुंब किती जबाबदार आहे? विवाहातून कुटुंब तयार होतं म्हणूनच विवाह संस्थेची झाडाझडती पुन्हा एकदा घेण्याची वेळ आली आहे, असं वाटतं.
या विषयावर अनेकदा बोलले गेले आहे तरीही हे मान्यच करायला हवं की, विवाह होणं ही नैसर्गिक घटना नाही तर ती एक मानवनिर्मित संस्था आहे. स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधांचं नियमन करणं आणि पुरुषाला पितृत्व देणं हे विवाह संस्थेचे दोन हेतू आहेत. पिता निश्चित करण्यासाठी मग स्त्रीच्या योनीशुचितेचं अवडंबर माजवत तिच्या विचार, संचारावर बंधन घालत तिचं माहेराहून विस्थापन करून सासरी तिच्यावर कडक पहारा ठेवला जातो. या व्यवस्थेत घरकाम आणि बालसंगोपन स्त्रियांनीच करायचं आणि त्याला वेतन नाही आणि त्यामुळे प्रतिष्ठा नाही. यातून स्त्री पुरुषावलंबी झाली आणि तिचं दुय्यमत्व ठळक होत गेलं. सासरी होणाऱ्या सुनेच्या छळाला आणि हुंडाबळीसाठी ही दोन कारणे आहेत.
स्त्रिया शिकल्या, मिळवत्या झाल्या तरी त्यांचा छळ होतो. त्या तो का सहन करतात? असा प्रश्न बळी असलेल्या स्त्रियांनाच का विचारला जातो? याचं उत्तर पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था हेच आहे. कारण ‘एकट्या’ स्त्रीकडे समाज संशयी नजरेने, तिच्यात काही तरी कमी आहे अशा भावनेतूनच बघतो. तिच्याकडे वाईट नजरेनेच बघितलं जातं त्यामुळे स्त्रिया अनेकदा लग्नात राहून छळ सहन करतात. अशा स्त्रियांसाठी संसार आग नाही तर फुफाटा असतो हे लक्षात घ्यायला हवं. मात्र स्त्री चळवळीमधल्या अनेक झुंजार कार्यकर्त्यांनी लग्नातली अन्यायाची आग सहन न करता एकटं राहून फुफाटा सोसला तेव्हा त्यांना घरं फोडणाऱ्या, स्वैराचारी वगैरे दूषणंही दिली गेली. मात्र त्यामुळे अन्याय सोसणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या चळवळीचा आधार वाटला तसंच अन्याय करणाऱ्यांना त्यांचा धाक वाटला, हिंसाचार थोडा कमी झाला. गरिबीचा खरा चेहरा पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे स्त्रीचा ठरतो आहे. तसेच सामूहिक आणि कुटुंबाअंतर्गत हिंसा याच्या बळी जगभरातल्या स्त्रिया आहेत. हे दोन्ही प्रश्न जागतिकीकरणानंतर तीव्र झाले आहेत. स्त्रियांवरचे लैंगिक अत्याचार, बलात्कार वाढत आहेत. हे स्त्री चळवळीत मांडलं गेलं. जन्मापासून मरेपर्यंत माणसाबरोबर असणाऱ्या लैंगिकतेकडे आपण कसं बघतो, हा कळीचा मुद्दा आहे. लैंगिक संबंधाविषयी ‘अळीमिळी गुपचिळी’ असणारा आपला समाज दांभिक आहे. पुरुषांनी लैंगिक सुख घ्यायचं आणि स्त्रियांनी ते द्यायचं आणि नाही दिलं तर तिच्यावर बलात्कार करायचा ही पुरुषप्रधान मानसिकता घातक आहे, हे पुरुषांना समजावून सांगायला हवं. बलात्कार हा बलात्कारच असतो त्यामुळे विवाहांतर्गत बलात्कार हा गुन्हा मानला जावा, यावरही अनेक वादविवाद झडले आहेत. आज तो गुन्हा नाही याचा अर्थ लग्नामुळे पतीला पत्नीवर बलात्कार करता येतोे. या व्यवस्थेत पुरुषांना मिळणाऱ्या अशा प्रकारच्या सत्तेमुळे चांगला माणूस होण्यात अनेक अडथळे आहेत. पुरुषत्वाच्या कल्पना हिंसकतेकडे झुकणाऱ्या आहेत. आणि आता तर पैसे मिळवण्याचं प्रचंड दडपण त्यांच्यावर दिसतं आहे.
गेल्या ५० वर्षांत स्त्री चळवळ, शिक्षण आणि नोकरी यामुळे अनेक स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्या लग्न, मूल जन्माला घालावं की नाही, कधी-किती मुलं जन्माला घालावी या संदर्भात पुढाकार घेऊन निर्णय घेऊ लागल्या आहेत. जोडीदाराविषयी त्यांच्या काही स्पष्ट कल्पना आहेत. तसा जोडीदार मिळाला नाही तर त्या लग्न न करता स्वतंत्रपणे एकट्या राहत आहेत. लग्नात अन्याय होतो आहे असं दिसलं तर घटस्फोट घेऊन स्वतंत्र होतात. पारंपरिक पुरुषत्वाच्या पुरुषप्रधान कल्पना आणि स्त्रियांच्या बदललेल्या अपेक्षा यांच्यामुळे पुरुष गोंधळले आहेत, काहीसे घाबरले आहेत. लग्न होईल की नाही झालं तर टिकेल की नाही या असुरक्षिततेतून ते जास्त आक्रमक होऊन हिंसक होत आहेत का, याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. पुरुषांची झालेली ही कोंडी त्यांना समजावून सांगत ती फोडण्यासाठी मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यासाठी घरातली पुरुषांची दडपशाही दूर करून कुटुंबात लोकशाही रुजवायला हवी. मात्र पुरुषी अहंकारामुळे अनेकदा ते पुरुषांना कळतं, पण वळत नाही अशी त्यांची गोची झाली आहे. हे लक्षात घेऊन पुरुषांनी वेळीच मदत घेऊन ही कोंडी फोडायला हवी. त्यात स्त्रियांकडून मदत घेताना कमीपणा मानू नये. त्यातच त्यांचं, कुटुंबाचं आणि पर्यायाने समाजाचं भलं आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेत होणारा अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी स्त्रियांना पुरुषांची बरोबरी करत पुरुषीपद्धतीनं वागावं लागणं ही शोकांतिका टाळण्यासाठी सर्वांनी स्त्रीच्या नजरेतून जगाकडे पाहायला हवं, असं स्त्री चळवळ सांगते आहे, हे समाज स्वास्थ्य जपणारं आहे.
अन्याय सहन न करता घटस्फोट घेऊन स्वतंत्र राहणाऱ्या तरुणींना आजही त्यांनाच तडजोड करायला नको, त्या आत्मकेंद्री, सुखलोलुप झाल्या आहेत आदी दूषणं दिली जातात. जणू काही पुरुष खूप तडजोड करतात. म्हणजे काही केलं तरी स्त्रीच दोषी! स्त्री चळवळ ही पुरुषविरोधी नाही तर ती पितृसत्ताक, पुरुषप्रधान व्यवस्थेविरोधात आहे. विषमतेवर आधारित बाईपणा, पुरुषपणा आणि इतरपणा ओलांडत माणूसपणाचा सर्वांचा प्रवास सुकर व्हावा अशी स्त्री चळवळीची धडपड आहे. हे सर्वांनी मनापासून समजून घ्यायला हवं.
आज समाजमाध्यमात तुफानी वेगाने अंदाधुंदपणे आदळणाऱ्या खऱ्या-खोट्या बातम्या, त्यावरच्या प्रतिक्रिया यामुळे स्त्री-पुरुषांचा विवेकी विचार भोवंडून गेला आहे. या माध्यमातल्या तीव्र विद्वेष आणि विखाराखाली सर्वसामान्य माणसाचं शहाणपण आणि सद्भाव दडपला जातो आहे. ते शहाणपण आणि सद्भाव जागा करण्यासाठी स्त्रीवाद मदतीचा हात देईल असा विश्वास वाटतो. स्त्रीवादात ‘स्त्री’ हा शब्द असला तरीही तो फक्त स्त्रियांपुरता मर्यादित नाही. लोकशाही, विविधता, सहिष्णुता, अहिंसा आणि माणुसकी हा स्त्रीवादाचा गाभा आहे. सर्व वंचित, शोषितांवर होणाऱ्या शोषणाला, अन्यायाला तो विरोध करतो. संघर्षापेक्षा संवादावर स्त्रीवादाचा भर आहे. शांतीची मागणी करणारा स्त्री वाद ही एक राजकीय भूमिका आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीचं राजकारण, राजकीय पक्षात वाढणारी गुन्हेगारी, पैशांच्या माजावर त्यांना मिळणारी प्रतिष्ठा, नैतिकतेचा होणारा ऱ्हास, लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा होणारा संकोच आणि त्या संदर्भात बुद्धिजीवी माणसांची फक्त हळहळ, संताप व्यक्त करत वाढत जाणारी उद्विग्नता आणि त्यातून येणारी हताशा, राजकीय निष्क्रियता भयावह आहे. त्यामुळे आज कधी नव्हती इतकी स्त्रीवादी राजकारणाची गरज आहे, असे वाटते. यात ‘स्त्री’ हा शब्द असला तरी ते फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीसुद्धा करायला हवं. स्त्रीवादी राजकारणात सत्तेचं विकेंद्रीकरण करत लोकशाही पद्धतीनं सर्व दलित, वंचित, शोषितांवरच्या अन्याय अत्याचाराचं निवारण हे अग्रस्थानी असतं. त्यासाठी पुरुषप्रधान राजकारण बाजूला ठेवत विधानसभा, लोकसभा जिथे धोरणं ठरवली जातात तिथे स्त्रियांच्या राखीव जागांसाठीची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी.
आज विवाह संस्थेचा पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था हा पाया आहे त्या जागी स्वातंत्र्य, समता आणि मैत्रभाव यावर आधारलेली विवाह संस्था आली तर समन्वय, संवाद, परस्पर सामंजस्य यावर आधारलेलं सहजीवन शांत आणि समाधानी असेल. त्यातून स्वास्थ्यपूर्ण समाज निर्माण होईल आणि वैष्णवीसारख्या तरुणींच्या ‘हुंडाहत्या’ होणार नाहीत… त्यासाठी व्यक्तीच्या आणि समाजाच्या परिवर्तनाची नितांत गरज आहे. म्हणून सर्व जण विषमतेवर आधारित बाईपणा, पुरुषपणा आणि इतरपणा ओलांडत माणूसपणाची वाटचाल हातात हात घेऊन करण्याचा संकल्प करू या.
यातून हे परिवर्तन आपण घडवू शकतो या विश्वासासह दोस्ती जिंदाबाद!
saryajani@gmail.com