साधना तिप्पनाकजे

गावासाठी २ कोटी ३६ लाखांची मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणणं असो, जिल्हा परिषदेची शाळा अद्ययावत करणे असो वा सरकारी निधीमधून विज्ञान साहित्य, संगणक टॅब, विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था करणे असो, आज त्यांच्या गावातील प्रत्येक मूल जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश घेत आहे. याशिवाय कायमस्वरूपी अंगणवाडीसाठी जागा, पाण्यासाठी व्यवस्था, गावाची वेस घालणं असो. पुण्यातल्या शिरुर तालुक्यामधील पिंपरी दुमाला गावच्या सरपंच गायत्री चिखले  यांनी गावसहभागातून अनेक कामे करत गावात एकोपा निर्माण केला; त्यांच्याविषयी..

शिक्षणाची गरज माहीत असणे आणि त्यासाठी स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करून गावाला प्रगतिपथावर नेणे, हे काम कुणा आस्थेवाईक कार्यकर्त्यांचंच. त्या शिक्षण कार्यकर्त्यां. गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सशक्त शिक्षणपद्धती राबवणाऱ्या आणि मातृभाषेतील शिक्षणावर ठाम विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यां. याच कामाला बळ देण्याकरता त्यांनी पुण्यातल्या शिरुर तालुक्यामधील पिंपरी दुमाला गावची ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि सरपंचपदी बिनविरोध निवडूनही आल्या. त्या गायत्री चिखले यांनी अनेक उपक्रम, योजना राबवत गावाला समृद्धीच्या वाटेवर आणलं.

पिंपरी दुमाला हे गाव डोंगरात वसलेलं आहे. महागणपतीचं स्थान रांजणगावापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. गायत्रीताई

२६ वर्षांपूर्वी लग्न करून या गावात आल्या, त्यावेळी गाव पायवाटेने मुख्य रस्त्याशी जोडलेलं होतं. एकदा चुलत बहिणीसोबत गावात चालत येताना त्या चुकून दुसऱ्या गावात गेल्या. गावाला वेसही नव्हती, त्यामुळे त्या दोघींचा गोंधळ उडाला. गायत्रीताईंना तेव्हाच जाणीव झाली, की कोणत्याही गावासाठी रस्ते, पाणी आणि शिक्षण या तीन गोष्टी पाठीच्या कण्यासारख्या आहेत. या गोष्टी असतील तरच गाव उभा राहील आणि तेच त्यांनी गावची सूत्रं हाती घेतल्यावर प्राधान्याने केलं.

त्यातच आणखी एक बाब त्यांना खटकू लागली. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवण्याचं लोण सगळ्याच गावांमध्येही पसरलं होतं. पिंपरी दुमालाही याला अपवाद नव्हतं. १०० टक्के शेतीवर अवलंबून असणारं हे गाव! इंग्रजी माध्यमाची शाळा गावापासून पाच कि.मी. अंतरावर आहे. पालक हौशीने मुलांना इंग्रजी माध्यमात घालत होते. पण मुलांचा अभ्यास घरी घ्यायला त्यांच्याकडे वेळच नव्हता. पालकांनी सर्व जबाबदारी शाळेवरच टाकली होती. कारण सुगीच्या दिवसात पालक शेतात आणि मळ्यात खूपच व्यग्र असतात. यात मुलांचं खूप नुकसान होऊ लागलं. शाळेत एक भाषा. घरी एक भाषा. या गोंधळात बरीचशी मुलं अभ्यासात मागे पडू लागली. गायत्रीताईंना गावातल्या मुलांचं होणारं नुकसान अस्वस्थ करू लागलं. त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक चतुरसर यांची भेट घेतली.

११ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. चतुरसरांसोबत गायत्रीताईंनी जिल्हा परिषद शाळा सुधारण्याचं ठरवलं. याच शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी डॉक्टर, आय.पी.एस, कलेक्टर  झाले होते.

शाळेचा हाच वारसा त्यांनी पुढं न्यायचं ठरवलं. जिल्हा परिषदेची ही शाळा चौथीपर्यंत आहे. अंगणवाडी कधी चावडीवर तर कधी कोणाच्याही घरात भरत असे. अंगणवाडीला कायमस्वरूपी जागा नव्हती. १९५३ पासून सुरू झालेल्या जिल्हा परिषद शाळेची इमारतसुद्धा मोडकळीस आली होती. गायत्रीताईंनी सुरुवात केली ती शाळेच्या ग्रंथालय निर्मितीपासून. त्यांनी शाळेला ५०० पुस्तकं आणि ती ठेवण्यासाठी कपाटं भेट दिली. अंगणवाडीला विविध चित्रांचे तक्ते, फळा आणि खेळणी दिली. या पहिल्या पावलामुळे बच्चे कंपनीला शाळेबाबत गोडी निर्माण झाली. दर १५ दिवसांनी शाळेत खाऊ वाटप सुरू केलं. ११ वर्षांपूर्वी हे सर्व त्यांनी स्वखर्चाने सुरू केलं. विद्यार्थ्यांकरता वक्तृत्व स्पर्धा, चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहन देणं असे उपक्रम सुरू केले. पण चार इयत्तांकरता शाळेत फक्त दोनच शिक्षक होते. त्यामुळे चारच वर्ग असले तरी एकेका इयत्तेवर लक्ष केंद्रित करणे शिक्षकांना जमत नव्हते. यावर तोडगा म्हणून गावकऱ्यांशी बोलून गायत्रीताईंनी एक खासगी शिक्षक शाळेत नियुक्त केला. त्याचा पगारही गायत्रीताईच द्यायच्या. आयटीसी कंपनीनेही विद्यार्थ्यांच्या अभ्यास सरावाकरता एका शिक्षकाची नेमणूक केली. आता शाळेत चार शिक्षक झाले. मुलंही मन लावून अभ्यास करू लागली. गायत्रीताई सांगतात, मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेतल्याने मुलांचा गोंधळ उडत नाही. त्यांच्या संकल्पना स्पष्ट होतात आणि त्यांच्या मेंदूचा विकास चांगला होतो. जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारण्याकरता त्या झटत होत्या. त्यांच्या मुलालाही याच शाळेत प्रवेश दिला. हळूहळू शाळेचं चित्र बदलू लागलं. मुलांमध्ये प्रगती दिसू लागली. गावातली मुलं आता पाच किमी अंतरावरील इंग्रजी शाळेत जाण्याऐवजी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत, मराठी माध्यमात येऊ लागली. गायत्रीताईच्या ‘घराजवळ शाळा आणि मातृभाषेत शिक्षण’ या प्रयत्नांना यश मिळू लागलं. त्यांनी स्वत:चे पावणेपाच लाख रुपये शाळेला खर्च केले. परिस्थितीमुळे त्यांना बारावीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही, परंतु त्यांनी आपली इच्छा या मुलांना चांगलं शिक्षण देऊन पूर्ण केली जणू.

दरम्यान, २०१५ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली. सरपंचपद खुल्या प्रवर्गातील स्त्रियांसाठी राखीव होतं. गायत्रीताईचा पुतण्या गावात सामाजिक कामात अग्रेसर होता. त्यांनी गायत्रीताईंनाही निवडणूक लढवण्यास सांगितलं. पण गायत्रीताईंना राजकारणात रस नव्हता. त्यांनी नकार दिला. मग गावातील आणखी काही मंडळी येऊन गायत्रीताईंना भेटली, ती म्हणाली, ‘‘तुम्ही कोणत्याही पदावर नसताना आवड म्हणून सुरू केलेल्या कामाने शाळेचा चेहरामोहरा बदललात. पदावर आल्यावर तुम्ही गावाकरता आणखीही बरंच काही करू शकता.’’  शेवटी लोकांचा आग्रह गायत्रीताईंना मोडवेना. त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरला. सरपंचपदीही त्या बिनविरोध निवडून आल्या. ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांनी कार्यभार स्वीकारला.

सर्वात प्रथम त्यांनी गावाकरता दोन अंगणवाडय़ा मंजूर करून घेतल्या. एक जिल्हा परिषद शाळेजवळ आणि एक गावापासून जरा लांब अंतरावर असणाऱ्या वस्तीमध्ये. जिल्हा परिषदेकडून निधी मिळवून स्मशानभूमी बांधली. यापूर्वी शेतातच अंत्यसंस्कार केले जायचे. पण पावसाळ्यात शेतात अंत्यसंस्कार करणं अवघड असायचं. याकरिता सर्वात पहिले काम स्मशानभूमीचं केलं. गायत्रीताईंनी सर्व गावाशी संवाद साधायला सुरुवात केली. गावात एकोपा असेल तर कोणतंही काम करायला अडचण येणार नाही हे त्यांनी ताडलं. लोकांचा विश्वास संपादन करायचा, न दुखवता काम करायचं या गृहीतकाचा वापर करायचं त्यांनी ठरवलं. त्यामुळे आपोआपच त्यांनी एखादा विषय मांडल्यावर त्यावर ग्रामपंचायतीत आणि ग्रामसभेत सविस्तर चर्चा होते.

गायत्रीताई लग्नानंतर सासरी येताना केवळ गावाची वेस आखली न गेल्याने वाट चुकल्या होत्या, त्या अनुभवातूनच त्यांनी गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून घेतलं. गावातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचे बांधकाम वर्षांनुवर्षे रखडलं होतं. पिंपरी दुमालात कांद्याचं विक्रमी पीक निघतं. सोबत मोसंबी, सीताफळही आहेतच. कांद्याच्या मोसमात दिवसाला ३० गाडय़ा भरून पीक शेतातून बाहेर काढलं जातं. चांगला रस्ता नसल्याने हा माल बाहेर काढताना खूप त्रास व्हायचा. गायत्रीताईंनी पंतप्रधान कार्यालयाशीच थेट संपर्क साधला. गावासाठी २ कोटी ३६ लाख रुपयांची मुख्यमंत्री ग्रामसडक योजना मंजूर झाली आणि ती पूर्णही झाली. शेतातून मुख्य रस्त्याला जोडणारे चांगले रस्ते तयार झाले.

जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे धोकादायक झाली होती. गायत्रीताईनी त्यांच्या आवडीच्या कामाकडे परत मोर्चा वळवला. इमारत संपूर्ण दुरुस्ती आणि अद्ययावत करण्याकरिता खूप मोठय़ा निधीची आवश्यकता होती. ग्रामपंचायतीचे उत्पन्न मर्यादित होतं. गायत्रीताईंनी हरितग्राम या कंपनीशी संपर्क साधला. इमारत दुरुस्ती, डिजिटल वर्ग, संरक्षण कुंपण, शैक्षणिक व क्रीडा साहित्य, खेळणी, लेझीम आणि ढोल या कामाकरता ३० लाख रुपयांचा निधी लागला. यातील ८० टक्के रक्कम हरितग्राम कंपनीने दिली; पाच टक्के लोकवर्गणीतून आणि १५ टक्के रक्कम स्वत: गायत्रीताईंनी दिली. जिल्हा परिषदेची ही शाळा एकदम अद्ययावत झाली आहे. त्यानंतर चौदाव्या वित्त आयोगातील निधीमधून विज्ञान साहित्य, संगणक टॅब, विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था या गोष्टीही करण्यात आल्या. आज गावातील प्रत्येक मूल या जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश घेते. पालकांना आपल्या शाळेचा अभिमान वाटतो. पाचवीनंतरच्या शिक्षणाकरता वाघाळे किंवा रांजणगाव इथे विद्यार्थी जातात.

गावात लोकवर्गणीद्वारे तीन मुख्य कामे झाली. शाळा अद्ययावत झाली. त्यानंतर गावची वेस बांधण्यात आली. या वेशीकरता सहा लाख रुपयांची लोकवर्गणी जमवण्यात आली. गावातील रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्वारही २५ लाख रुपये  लोकवर्गणीतून जमवूनच करण्यात आला.

गायत्रीताईंनी गावात एकोपा साधून लोकवर्गणीतून काम करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये प्रेरणा जागवून लोकांना एकत्र आणलं. गावात दारुबंदी आहे. रात्री दहानंतर गावातील एकही तरुण गावात फालतू वेळ घालवत बसलेला आढळणार नाही, असं गायत्रीताई खूप अभिमानाने सांगतात. संध्याकाळी गावात कधीतरी कीर्तन, प्रवचन असतं. त्यात सर्व गावकरी सहभागी होतात. त्यांच्या गावापासून एम.आय.डी.सी. अवघ्या नऊ किलोमीटरवर आहे; पण गावातील १०० टक्के लोक शेतीच करतात.

गाव शेतीवर अवलंबून आहे. पण पाण्याचा प्रश्नही इथे आहेच. या भागात पाऊस फारसा पडत नाही. गावाच्या दक्षिणेकडून पाट वाहतो. गाव उंचावर आहे. वरच्या भागात उत्तेरकडे दोन तळी आहेत. पाऊस पडला तरच या तळ्यांमध्ये पाणी साचतं. पाट आणि गाव तळ्यात जोडणी नसल्याने त्याचा काहीच फायदा गावाला होत नाही. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. जलयुक्त शिवार योजनेतून ओढा खोलीकरण करण्यात आलं. आठ के.टी. बंधारे बांधले, त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचे हाल झाले नाहीत. चासकमान प्रकल्पातून येणारे पाट गावाजवळून जातात. सप्टेंबरदरम्यान या पाटातील अतिरिक्त पाणी वाहून वाया जातं; जर पाटातून पिंपरी दुमालाला उचल मिळाली तर वरची दोन्ही तळी भरतील. एकदा का तळी भरली की, गावच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. पाटबंधारे खात्याकडून ही परवानगी मिळवण्यासाठी गायत्रीताई खूप प्रयत्न करत आहेत. कारण पाणी वर्षभर मिळेल आणि गावची अर्थव्यवस्था तग धरेल. गावात शोषखड्डे आहेत. ओला कचऱ्यापासून शेणखत बनवलं जातं, तर प्लास्टिक आणि इतर घनकचरा साठवून आठवडय़ातून एकदा भंगारवाल्याला देण्यात येतो. गावात शुद्ध पाण्याकरता गायत्रीताई आर.ओ. (रिव्हर्स ऑरमोसीस वॉटर फिल्टर) बसवत आहेत.

लोकसहभाग वाढावा याकरता गायत्रीताई एक चांगली कल्पना राबवत आहेत. त्यांनी गावात ‘ग्रामरत्न’ पुरस्कार द्यायला सुरुवात केली. गावविकासाची उत्कृष्ट योजना मांडणाऱ्या, पुढाकार घेऊन काम करणाऱ्या गावकऱ्याला या पुरस्काराने गौरविण्यात येतं. गायत्रीताईंच्या या लहानशा पण महत्त्वाच्या कल्पनांमुळे गावकऱ्यांचे चांगले सहकार्य त्यांना मिळते. सात सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत चार सत्ताधारी आणि तीन विरोधी गटाचे असं संख्याबळ असलं तरी हे सात जण एकोप्याने काम करतात.

गायत्रीताई सरपंच व्हायच्या आधीच गावात १०० टक्के शौचालये झाली होती. पण त्यांचा वापर होत नसे. गायत्रीताईंनी लोकांना म्हटलं, ‘‘आपण दुसऱ्यांच्या लेकी लग्नानंतर गावात आणतो. त्यांना उघडय़ावर बसवणं बरं आहे का?’’’ त्यांनी गावकऱ्यांचं शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रबोधन केलं आणि त्यात १०० टक्के यशस्वी झाल्या. तीन घरकुलं मंजूर झाली आहेत; १६ घरकुलांचा प्रस्ताव दिला आहे.

गायत्रीताई म्हणतात, ‘‘संसार आणि गाव म्हटलं की, नवनवीन कामं येतच असतात. आपण जेवढं करू तेवढं थोडं.’’ त्यांना गावातील स्त्रियांकरता घरगुती व्यवसाय सुरू करायचा आहे. गावात पर्यटनस्थळ विकसित करून गावाचं उत्पन्न वाढवण्याचा मानस आहे. देवळाजवळ शौचालये बांधायची आहेत. गावात चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळण्याकरता सुरू झालेल्या त्यांच्या जिद्दीला आता आणखी मोठी झेप घ्यायची आहे.

sadhanarrao@gmail.com

chaturang@expressindia.com