मनोहर परब
मी एकदा सकाळीच एका आडवळणी गावातील बाजारात जायला निघालो होतो. सकाळच्या अंधूक प्रकाशात गावातील स्त्री-पुरुष वस्तू विकण्यासाठी त्या टोपलीत भरून लगबगीनं बाजारात चालले होते. काहींच्या डोक्यावर वस्तूंनी भरलेल्या टोपल्या, तर काही टोपलीवर टोपली घेऊन चालत होते. काहींनी डोक्यावर लाकडाची मोळी घेतली होती. एक कमरेत वाकलेली आजी, आधाराला एका हातात दांडा व डोक्यावर हिरापासून केलेली केरसुणीची मोळी घेऊन चालत होती. तिच्यापासून काही अंतरावर एक काका नारळांनी भरलेली गोणी घेऊन चालले होते. ही सर्व दृश्यं पाहून मन हेलावलं. आपलं घर चालवण्यासाठी गावातील लोक काय काय करतात आणि किती मेहनत घेतात हे पाहिलं. खरं तर पाहातच आलो आहे.
आठवडा बाजारात पोहचलो. सकाळची वेळ असल्याने गर्दी तुरळक होती. गावातून आलेली माणसं आपापलं छोटं दुकान लावत होती. यात अधिकतर स्त्रिया होत्या. मी हे सर्व बघत एका चहाच्या खोपटात घुसलो. खोपटापासून काही अंतरावर एक मुलगी व मुलगा आणलेल्या वस्तू एका गोणपाटावर लावून बसले होते. केळफुलं, भेंडी, नारळ, केळी, पपई, कंदमुळं इत्यादी वस्तू त्यांनी मांडलेल्या होत्या आणि बाजूलाच एका टोपलीत कोंबडी व कोंबडा विकण्यासाठी ठेवले होते. त्या टोपलीजवळ तो लहान मुलगा बसला होता. अधूनमधून तो त्या कोंबड्याकडे पाहात होता आणि तो कोंबडाही सारखा काकरत त्याच्या जवळ येत होता. त्याच्या बाजूलाच आजीबाई केरसुणी विकण्यास बसली होती.
बाजार भरत चालला होता. माणसांची वर्दळ वाढली होती. मासळी बाजार पूर्ण भरला होता. मी मासे घेऊन बाहेर आलो. तर त्या मुलाच्या कोणत्याही वस्तू विकल्या गेलेल्या दिसत नव्हत्या. म्हणून मी त्याच्याजवळ गेलो. ही सर्व मंडळी उन्हातच रस्त्यावर बसली होती. मी त्याच्या वस्तू पाहिल्या. मुलगी १५/१६ वर्षांची असेल. प्रत्येक वस्तूची किंमत विचारली. त्याप्रमाणे तिने मला किमती सांगितल्या. मी कोणत्याही वस्तूची किंमत कमी न करता. पपई, केळी, नारळ, कंदमुळं इत्यादी गोष्टी विकत घेतल्या व त्याप्रमाणे पैसे दिले. हसतच तिने ते पैसे घेतले आणि विकण्यासाठी ठेवलेल्या इतर वस्तूला लावून, कपाळाला लावले. नंतर ते पैसे आपल्या बटव्यात ठेवले.
तिच्या बाजूला बसलेल्या मुलाकडे बोट दाखवून ‘‘हा कोण तुझा?’’ प्रश्न केला. ‘‘माझा लहान भाऊ!’’ ती म्हणाली. मी त्याला विचारलं, ‘‘कसे दिले रे कोंबडी किंवा कोंबडा?’’
तो म्हणाला, ‘फक्त दोनशे रुपये कोंबडी व तीनशे रुपये कोंबडा!’ आणि माझ्याकडे बघत राहिला. त्याच्या एकंदर राहणीमानावरून ते जास्तच गरीब वाटत होते.
मी घेण्याचा विचार करत उभा असताना तिनं विचारलं, ‘‘काका, काय झालं? तुम्हाला दोन्ही घ्यायची असतील तर सांगा.’’
‘‘काय ते तूच सांग.’’ मी म्हणालो. तसा तो म्हणाला ‘‘दोन्ही घेत असाल तर, मला ४५० रुपये द्या.’’ बरं म्हटलं नि दोघांना विचारलं, ‘‘काय करता तुम्ही?’’ तशी मुलगी म्हणाली, ‘‘मी बारावीला आहे. आणि हा आठवीत आहे.’’ तसा मी ‘‘व्वा! शिकून खूप मोठे व्हा!’’ म्हणालो. मुलाला पाचशे रुपये दिले व कोंबडा-कोंबडी विकत घेतली. तसं त्यानं ते पैसे टोपलीला व कपाळाला लावले आणि बहिणीकडे दिले. तिने पन्नास रुपये परत केले. दोघांनी मला हात जोडून नमस्कार केला. बाजूला बसलेली आजी माझ्याकडे बघत होती.
सर्व सामान घेऊन मी घरी जाण्यास निघालो. तेव्हा मला बाबांची आठवण झाली. त्या मुलाकडून जेव्हा कोंबडा घेतला तेव्हा तो सारखा त्याच्या अंगावरून हात फिरवत होता. जेव्हा मी त्याच्या डोळ्याकडे बघितलं तेव्हा त्याचे डोळे झरझरू लागले होते. मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला व जवळ घेतले. आपण जेव्हा एखाद्या प्राण्यावर, पक्ष्यावर, झाडांवर जिवापाड प्रेम करतो, त्यावेळी तेही आपल्यावर विश्वास ठेवून तेवढंच प्रेम करतात.
घरी गेल्यावर माझ्या बाबांची ती घटना मला आठवली, एकदा घरातील कोंबडीने पिल्लं दिली. बाबा पिल्लांना पिठाचे दाणे करून भरवत. ज्या हातात पिठाचा गोळा असे, त्या हातावर एक सफेद पिल्लू बसून पिठावर चोच मारत असे. बाबांनी त्याला कधी खाली उतरवले नाही. त्यामुळे त्याला बाबांचा व बाबांना त्याचा लळा लागला. आणि कालांतराने ते पिल्लू मोठं होऊन, त्याचं छान सफेद कोंबड्यात रूपांतर झालं. तो बाबांसोबत राहू लागला.
बाबा गावांत कुठेही गेले तरी तो त्यांच्या सोबत असे. हे मी पुष्कळ वेळा बघितलं होतं. एक दिवस मी माझ्या आई-बाबांना न कळवता अचानक गावी गेलो. बाबा समोरच बसले होते आणि तो कोंबडा त्यांच्या बाजूलाच बसला होता. दुसरा दिवस रविवार. घरातल्या मंडळींचा अगोदरच बेत ठरला असावा. त्यामुळे चमचमीत जेवण! दुपारी जेवणाची वेळ झाल्यामुळे आईने मला जेवण वाढलं, मात्र नेहमीप्रमाणे माझ्यासोबत बाबा नव्हते. म्हणून मी आईला विचारलं. तेव्हा ती म्हणाली ‘ते सदाशिवकडे गेलेत.’ सदाशिव हे बाबांचे जिवलग स्नेही. मी माझं जेवण आटपून त्यांची वाट पाहात झोपाळ्यावर बसलो. ते आले. पण बरोबर कोंबडा नव्हता. तेव्हा काय घडलं ते मला समजलं आणि खूप वाईटही वाटलं. आता मी जे जेवलो होतो तो बाबांचा कोंबडाच होता. माझा राग अनावर झाला. आईला रागातच ‘पुन्हा असे करू नका.’ सांगितलं. तीही समजून गेली. बाहेर बाबा गप्प बसून ऐकत होते. त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
मला त्या मुलाची प्रकर्षाने आठवण झाली आणि मी ठरवलं, आपण त्याचा कोंबडा परत करायचा. मी पुढच्याच आठवडी बाजारात त्या कोंबड्याला घेऊन बाजारात गेलो. मला पाहून दोघांनी नमस्कार केला. मुलगी हसत म्हणाली ‘‘काय घेणार काका?’’
‘‘मी तुम्हाला भेटायला आलो आहे.’’ मी म्हणालो. बाजूला चहावाला किटली घेऊन फिरत होता. आम्ही तिघांनी चहा घेतला. मुलगा सारखा माझ्या पिशवीत बघत होता. मी पिशवीत हात घालून, त्याचा कोंबडा परत त्याच्या हातात दिला. तेव्हा ती दोघं प्रश्नार्थक मुद्रेने माझ्याकडे पाहात राहिली. मुलगी मला म्हणाली, ‘‘काका काय झालं?’’ ‘‘काही नाही, तुझ्या या भावाला माझ्याकडून ही भेट. ती देण्यासाठी आलो. आता सांभाळ रे बाबा याला!’’
ती मुलगी माझे पैसे परत करू लागली. तेव्हा तिला म्हणालो, ‘‘अगं! ही माझ्याकडून भेट आहे. भेटीचे पैसे नसतात.’’ मी निघालो. लांब गेल्यावर मी वळून त्यांच्याकडे पाहिलं, तो मुलगा त्या कोंबड्याचे मुके घेत होता आणि त्याची ताई त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती…
manoharparab64@gmail.com