करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका देशातील कामगार व मजूरांना बसला. रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात अडकलेल्या मजुरांची अवस्था या काळात अत्यंत वाईट झाली होती. अखेरीस केंद्र सरकारने या मजूरांना आपल्या घरी जाण्याची परवानगी दिली, रेल्वे विभागाने या मजुरांसाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस गाड्यांचीही सोय केली. मात्र रोजगार तुटलेल्या काही मजुरांसाठी संघर्ष संपलेला नाही. मिळेल त्या वाहनाचा आधार घेत हे कामगार आपल्या गावाकडे निघाले आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये १५ वर्षीय ज्योती कुमारीच्या संघर्षाची कहाणी आली होती.

लॉकडाउन काळात गुरुग्राममध्ये कामासाठी राहत असलेल्या ज्योतीने आपल्या वडिलांसह सायकलने प्रवास करत बिहार गाठायचं ठरवलं. वडिलांना मागच्या सीटवर बसवत १५ वर्षीय ज्योतीने गुरुग्राम ते बिहार हे १२०० किलोमीटरचं अंतर अवघ्या ७ दिवसांत पूर्ण केलं. तिने घेतलेल्या या अपार कष्टाचं फळ आता तिला मिळण्याची शक्यता आहे. ज्योती कुमारीची कहाणी ऐकल्यानंतर सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावलं आहे. “ज्योतीने Trials यशस्वीपणे पूर्ण केली, तर Nation Cycleing Academy च्या कॉम्प्लेक्स मध्ये Trainee म्हणून तिची निवड होऊ शकते.” सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी पीटीआयला माहिती दिली.

Nation Cycleing Academy ही ‘साई’च्या (Sports Authority of India) अत्याधुनिक सुविधेपैकी एक मानली जाते. आम्ही ज्योतीशी बोललो, लॉकडाउन संपल्यानंतर आम्ही तिला दिल्लीला बोलावलं आहे. तिच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च संघटनेतर्फे केला जाईल. तिला आपल्यासोबत कोणाला घेऊन यायचं असेल तरीही आम्ही त्याला परवानगी देऊ. आम्ही बिहारमधील आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत, आणि लॉकडाउन संपल्यानंतर तिला दिल्लीला चाचणीसाठी कसं पाठवता येईल याची चर्चा सुरु आहे. ओंकार सिंह यांनी ज्योतीच्या जिद्दीचं कौतुक केलं.

१२०० किलोमीटरचा प्रवास एका व्यक्तीला मागे बसवून करणं ही सोपी गोष्ट नाही. मला खात्री आहे की तिची शरीररचना सायकलिंगसाठी योग्य असणार. दिल्लीला आल्यानंतर आम्ही तिची शास्त्रीय पद्धतीने चाचणी घेऊ. सायकलिंग फेडरेशनच्या सहा ते सात निकषांमध्ये ती पूर्णपणे बसत असेल तर तिची नक्कीच निवड होईल. यानंतर तिला कशाचीही चिंता करायची गरज राहणार नाही. देशातील नवीन तरुणांना सायकलिंगकडे वळवालं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो असंही ओंकार सिंह म्हणाले. ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवत होते. लॉकडाउन काळात एका छोट्या अपघातात ते जखमी झाल्यामुळे त्यांचा रोजगार तुटला. यानंतर ज्योतीने सायकलवर आपल्या बाबांना पाठीमागे बसवत बिहार गाठण्याचा निर्णय घेतला. १० मे रोजी ज्योती आणि तिच्या वडिलांनी गुरुग्राम सोडलं यानंतर १६ मे रोजी ते बिहारमधील आपल्या गावी पोहचले.