जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन देशभरात निषेध आणि संताप व्यक्त होत आहे. राजकीय नेत्यांनीही निषेध व्यक्त केला असून यावेळी मोदी सरकारच्या धोरणावंर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. देशाचे संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे.

‘संपूर्ण देश शहिदांच्या पाठीशी उभा आहे, मात्र राजकारण करण्याची ही वेळ नाही. पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला चिंताजनक आहे. ज्या मार्गावर दहशतवादी हल्ला झाला आहे तो इतरांशी तुलना करत सुरक्षित परिसर आहे. इतकी वर्ष आपली वाहने या मार्गावरुन जात आहेत’, असं शरद पवार यांनी सांगितलं.

वाहनं या रस्त्याने जाणार असल्याची माहिती दहशतवाद्यांना होती आणि ही चिंतेची गोष्ट आहे असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. पूर्ण तयारीनिशी हल्ला करण्यात आला असून खबरदारी कितपत घेतली याबाबत शंका असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्यांवरुन मागील सरकारवर केलेल्या टीकेची आठवण करुन दिली.

सध्या परिस्थिती बिकट आहे. नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेप्रमाणे आम्ही टीका करणार नाही. सध्या शहीद आणि जखमी जवानांच्या कुटुंबियांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आदिल दार असे आत्मघातकी हल्ला चढविणाऱ्या अतिरेक्याचे नाव आहे. तो दक्षिण काश्मीरमधील काकेपुराचा आहे. २०१८मध्ये तो जैश ए महम्मदमध्ये सामील झाला होता.

सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला. जवानांच्या ताफ्यावर गोळीबारही झाला आणि क्षणार्धात स्फोटक भरलेला ट्रक त्या ताफ्यात धडकल्याने भीषण स्फोट झाला. त्यात ७६व्या बटालियनच्या वाहनाच्या चिंधडय़ा उडाल्या. अन्य काही वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. काही वाहनांवर गोळीबाराच्या खुणा आहेत. त्यामुळे परिसरात काही अतिरेकी लपून बसले असावेत आणि त्यांनी हा गोळीबार केला असावा, असा तर्क आहे. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरहून ३० कि.मी.वर आहे.