गेले सात दिवस सहा हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या शुक्रवारी सुमारे साडेसात हजारांनी वाढली. गेल्या चोवीस तासांमध्ये ७,४६६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ७९९ झाली आहे.

जगभरातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या दहा देशांमध्ये भारत नवव्या क्रमांकाचा देश ठरला आहे. गेल्या आठवडय़ात तो दहावा होता, आता देशातील रुग्णांची संख्या तुर्कीपेक्षाही (१ लाख ६० हजार ९७९) जास्त झाली आहे.

मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून ते ४२.८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. ७१,१०५ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये ३,४१४ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. देशातील मृत्यू झालेल्यांची संख्या ४,७०६ झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये १७५ मृत्यू नोंदवले गेले. मृत्यूची संख्या चीनमधील मृत्यूंपेक्षाही जास्त आहे. चीनमध्ये आतापर्यंत ४,६३८ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईनंतर दिल्ली

दिल्लीत पहिल्यांदाच एका दिवसात एक हजारहून अधिक नवे रुग्णे आढळले. गेल्या चोवीस तासांमध्ये दिल्लीत १,०२४ रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या आता १६,२८१ झाली आहे. मृत्यूचा आकडाही ३१६ झाला असून चोवीस तासांमध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील १३ शहरांमध्ये सर्वाधिक करोनाचे रुग्ण आहेत. त्यातही मुंबईत सर्वात जास्त ३६ हजार रुग्ण असून आता दिल्ली दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. शहरात रुग्णवाढीचा दर ४.८९ टक्के (प्रतिदिन वाढ) असून देशाची सरासरी ५.०२ टक्के आहे. देशाच्या तुलनेत दिल्लीत रुग्णवाढीचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर ५.४४ टक्के आहे. बिहार, आसाम, केरळ या राज्यांमध्येही देशाच्या सरासरीपेक्षा रुग्णवाढीचा दर अधिक आहे.

राज्यांमधील रुग्णांची संख्या

महाराष्ट्र (५९,५४६), तमिळनाडू (१९,३७२), दिल्ली (१६,३७२), गुजरात (१५,५७२), राजस्थान (७,९५४), मध्य प्रदेश (७,४५३)