तरुणाशी मैत्री केल्याच्या रागात आईकडूनच मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीची आई, दोघे भाऊ, काका आणि गाव प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक तरुणाशी केलेल्या मैत्रीमुळे तरुणीची हत्या करण्यात आली. कुटंबाने तरुणीला वारंवार सांगूनही ती ऐकत नव्हती. मुलीच्या आईने डोक्यावर काठीने वार केल्याने तिचा मृत्यू झाला. अटक केलेल्या पाचही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या तीन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. ११ मे रोजी तरुणीची हत्या करण्यात आली होती. पण पोलिसांना १४ मे रोजी याची माहिती मिळाली. झाडीत कपड्यांचे काही तुकडे मिळाल्याची माहिती शेजारील गावातील एका गावकऱ्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी शोध घेतला असता तरुणीचा मृतदेह सापडला.

‘स्थानिकाने पोलिसांना शेजारील गावातील काही जणांना आपण या परिसरात पाहिल्याचं सांगितलं. यानंतर पोलीस पीडित तरुणीचा फोटो घेऊन शेजारील गावात पोहोचले. यावेळी गावकऱ्यांनी तिची ओळख पटवली. काहीजणांनी तिने विष पिऊन आत्महत्या केली असल्याचं सांगितलं’, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

शवविच्छेदन अहवालात तरुणीच्या डोक्यावर वार केल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. ‘आम्ही बराच वेळ मुलीच्या आईची चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला. कुटुंबाने तरुणासोबत मैत्री करण्यास विरोध केला होता. पण अनेकदा सांगूनही ती मैत्री तोडण्यास तयार नव्हती. ११ मे रोजी ती त्याच मित्राशी फोनवरुन बोलत होती. यावेळी रागाच्या भरात आईने मुलीच्या डोक्यावर काठीने वार केला ज्यानंतर ती बेशुद्द पडली’, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

‘मुलीला जेव्हा जाग आली तेव्हा ती वारंवार उलट्या करत होती. कुटुंबीयांनी गावात मुलीने विष प्राशन केल्याची अफवा पसरवली. त्याच रात्री तिचा मृत्यू झाला. मुलीचा छोटा भाऊ आणि गाव प्रमुखाने मृतदेह दुचाकीवरुन शेजारच्या गावात नेला. तिची आई, काका आणि मोठा भाऊदेखील मृतदेह पुरण्यासाठी पोहोचले होते’, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.