पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. मोदी सरकारकडून राजीव महर्षी यांची नियंत्रक आणि महालेखापालपदी (कॅग) नियुक्ती करण्यात आली आहे. महर्षी यांनी गुरुवारी केंद्रीय गृह सचिवपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच त्यांची नियंत्रक आणि महालेखापालपदी नियुक्ती करण्यात आली. १९७८ च्या केडरचे आयएएस अधिकारी असलेले महर्षी शशिकांत शर्मा यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. राजीव महर्षी ३० वर्षांपासून अधिक काळापासून प्रशासकीय सेवेत आहेत. राजीव महर्षी यांच्यानंतर राजीव गऊबा यांच्याकडे केंद्रीय गृह सचिवपदाची जबाबादारी असेल. महर्षींनी व्यवसाय व्यवस्थापन विषयात स्ट्रॅथक्लाइड बिझनेस स्कूलमधून पदवी घेतली आहे. त्यांनी इतिहास विषयात नवी दिल्लीतील सेंट स्टिफन्स महाविद्यालयातून बीए आणि एमए केले आहे. राजीव महर्षींनी आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. केंद्रात आणि राजस्थान सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. राजस्थान सरकारचे मुख्य सचिव, राजस्थानचे मुख्य निवासी आयुक्त, अर्थखात्याचे मुख्य सचिव, इंदिरा गांधी नहर बोर्डाचे सचिव, बिकानेरचे जिल्हाधिकारी या पदांवर काम करण्याचा अनुभव महर्षींना आहे. याशिवाय केंद्रात अर्थसचिव, खते विभागाचे सचिव या पदांवर त्यांनी काम केले आहे. राजीव महर्षींची ३१ ऑगस्ट २०१५ रोजी केंद्रीय गृह सचिवपदावर नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रीय गृह सचिव पदावरुन निवृत्त होण्याच्या काही दिवसआधी महर्षींनी पाकिस्तानला लक्ष्य केले होते. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य गुन्हेगार दाऊद इब्राहिमला पाकिस्तानकडून आश्रय दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. बॉम्बस्फोटातील आरोपींना भारतात आणण्याच्या प्रयत्नांना पाकिस्तानकडून खीळ घातली जात असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला होता.