देशाला सध्या व्यवस्था परिवर्तनाची गरज असल्याचे स्पष्ट करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपला पाठिंबा बुधवारी जाहीर केला. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. यावेळी स्वतः ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित होत्या.
अण्णा हजारे म्हणाले, कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे मी मागेच म्हटले होते. त्या मतावर आजही ठाम आहे. चांगले चारित्र्य आणि सामाजिक काम असलेल्या व्यक्तीला आपण पाठिंबा देऊ असे मी सांगितले होते. त्याप्रमाणेच ममता बॅनर्जी यांच्या नावाला मी पाठिंबा देतो आहे. ममता बॅनर्जी यांच्यापुढे ठेवलेल्या १७ मागण्यांना त्यांनी सहमती दर्शविल्याने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय मी घेतला. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला ५४३ जागा मिळाल्या नाहीत तरी हरकत नाही. त्यांच्या पक्षाला १०० जागांवर विजय मिळाला, तरी त्या देशाचे नेतृत्त्व करू शकतात.
आतापर्यंतचे ममता बॅनर्जी यांचे आयुष्य अत्यंत संघर्षमय आहे. अनेक आव्हानांचा त्यांनी समर्थपणे सामना केला आहे. देशाला सध्या व्यवस्था बदलाची गरज आहे आणि ममता बॅनर्जी व्यवस्थेत बदल करू शकतात, असे सांगत त्यांनी ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले.