सहिष्णुता-असहिष्णुतेच्या मुद्दयावर स्पष्टपणे आपले मत मांडणारे अभिनेता अनुपम खेर यांनी शनिवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. असहिष्णुतेच्या विषयावर टेलिग्राफने आयोजित केलेल्या चर्चासत्रात अनुपम बोलत होते.
आपल्या देशात खरे सहिष्णु कोण असतील तर ते काँग्रेस पक्षातील लोक आहेत. कारण, ज्या माणसाला ते सहन करत आहेत त्यालाच पंतप्रधान बनवण्याची त्यांची इच्छा आहे. जर ते राहुल गांधींना सहन करू शकतात, तर ते जगातील कोणतीही गोष्ट सहन करू शकतात या शब्दात अनुपम यांनी काँग्रेसची खिल्ली उडविली. पुढे खेर म्हणाले की, आपल्या प्राथमिक गरजा कशा पूर्ण होतील याची चिंता असलेल्या सामान्य माणसाला सहिष्णु-असहिष्णुतेच काहीही पडलेलं नाही. विरोधी पक्षाकडे काहीच नसल्यामुळे त्यांनी असहिष्णुतेचा मुद्दा उचलून धरला आहे. मोदी सरकारच्या गेल्या २२ महिन्यांच्या कार्यकाळात एकही भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षाकडे सरकारविरुद्ध बोलण्यासाठी असे काहीच नाही. याउलट यूपीच्या काळात भ्रष्टाचारावरचं चर्चा होत असे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा सूड उगवण्यासाठी हे सर्वकाही  सुरु असल्याचा आरोपही अनुपम खेर यांनी केला.
अनुपम खेर यांनी यावेळी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, १० वर्षे गप्प बसून राहिलेल्या पंतप्रधानाला तुम्ही सहन कलेत. आजचे पंतप्रधान परदेशात जाऊन केवळ चांगले बोलतचं नाहीत तर ते भारतात होणा-या बदलाबाबत तेथे चर्चाही करतात. मोदींनी दोन वर्षात एकही सुट्टी घेतलेली नाही. बहुमताने निवडून आलेल्या मोदी सरकारला चुकीचे ठरविण्यासाठीच हा असहिष्णुता शब्द पुढे आणण्यात आला.