भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी लेहचा दौरा केला. लडाखमधील वादग्रस्त नियंत्रण रेषेजवळ नेमकी काय परिस्थिती आहे, ते त्यांनी फिल्ड कमांडर्सकडून समजून घेतले. लष्करप्रमुखांच्या कुठल्याही दौऱ्याची लष्कराकडून आधी माहिती दिली जाते. पण यावेळी कुठलीही माहिती दिली नाही किंवा फोटो सार्वजनिक करण्यात आले नाहीत.

लष्करप्रमुख नरवणे यांनी फॉरवर्ड भागांना भेट दिली नाही. पण १४ कॉर्प्सच्या मुख्यालयामध्ये त्यांनी फिल्ड कमांडर्सबरोबर अनेक तास चर्चा केली. उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय.के.जोशी त्यांच्यासोबत होते. लडाखमधील चार भागांमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये प्रामुख्याने संघर्ष आहे. कुठल्याही परिस्थितीची चीनची दादागिरी सहन न करण्याची भारताची रणनिती आहे. त्यानुसार चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जात आहे.

आणखी वाचा- भारताच्या ‘त्या’ चार भागांवर ड्रॅगनची नजर, तिथेच घडल्या घुसखोरीच्या ८० टक्के घटना

भारताच्या ‘त्या’ चार भागांवर ड्रॅगनची नजर
चीनकडून होणाऱ्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर त्यामध्ये एक समान पॅटर्न दिसून येतो. भारत आणि चीनमध्ये लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत ३,४८८ किलोमीटरपर्यंत सीमारेषा आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

२०१५ पासून चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीच्या घटनांवर नजर टाकली तर ८० टक्के घुसखोरीच्या घटना या चार भागांपुरता मर्यादीत आहेत. यातले तीन भाग हे पश्चिम सेक्टरमध्ये येणाऱ्या पूर्व लडाखमधले आहेत. काही दिवसांपूर्वी पॅनगाँग टीएसओ तलावाच्या भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली होती. त्यात दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले होते.

आणखी वाचा- करोना संकटकाळातही चीननं केली डिफेन्स बजेटमध्ये वाढ

घुसखोरीच्या एकूण घटनांपैकी ट्रिग हाइटस आणि बुर्त्से या लडाखमधील दोन भागांमध्ये चीनकडून घुसखोरीच्या दोन तृतीयांश घटना घडल्या आहेत. २०१९ पासून चीनने दमचिलीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या दोलीटँगो या नव्या एका भारतीय भागामध्ये घुसखोरी सुरु केली. २०१९ मध्ये चीनने इथे ५४ वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याआधीच्या चार वर्षात चीनने तिथे फक्त तीन वेळा घुसखोरी केली होती.